Welcome...

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..

12/28/16

स्वप्नांची किंमत काय ?

Being a Doctor as private consultant in your new clinic, waiting for patients, with professional & personal stress, night fired for admitted patient, ill health, bored mood,  broken heart and 4G internet connection makes you a poet !!

स्वप्नांची किंमत काय ?
माझ्या...तुझ्या...आपल्या दोघांच्या...
पूर्ण झालेल्या....
अर्ध्यातून सुटलेल्या..
आणि अशीही काही स्वप्ने...
जी सत्याचा प्रकाश पडताच हवेत विरून गेली..
आणि काही..डोळे उघडताच संपून गेली..
ही सर्व स्वप्ने जातात का कुठे ?
यांची किंमत काय.?
आणि कशामध्ये होते यांचे मोल ?
थोडे हसरे क्षण, काही आनंदाचे हेलकावे.
काही भावनांचे कल्लोळ..
बरेच सारे अश्रू..आनंदाचे..
आणि दुःखाचे....
आणि वेदनेचेही...
अशीच असते किंमत या स्वप्नांची...
पूर्ण झालेल्या..आणि भंगलेल्या..
आपण गोळा करत राहतो
हाताला येईल ते तुकडे..
आणि शिवत राहतो पुन्हा पुन्हा
आपणच स्वतः उसवलेली
हृदयाची काळीज शिवण.
हेच असते भागधेय
स्वप्ने पाहणाऱ्या
तुझे आणि माझे..

11/28/16

उत्तराखंड भाग - २


उत्तराखंड - २

पहाडावरील त्या लाकडी घरात राहणे खूपच आनंददायी होते. लाकडाचे असल्याने त्याला वेगळेच देखणेपण लाभले होते. आजूबाजूला पूर्ण जंगल पसरलेले होते. त्या पूर्ण पहाडावर वेगवेगळ्या ठिकाणी घरे वसली होती. आरोहीचे ऑफिस व हॉस्पिटल पहाड उतरून गेल्यावर खाली पायथ्याजवळ होते.
आम्ही, म्हणजेच मी व हिमांशु सकाळी ९ ला निघायचो. कधीकधी माधुरी, जमाल हे आरोही सोबत काम करणारे volunteers भेटायचे. काधीकोणी foreigner visitor, medical student किंवा माझ्यासारखेच short time volunteer पण सोबत असायचे. बाहेर पडले की सुशील सरांचा डोरेमोन व आणखी एक कुत्रा आमच्या मागे मागे थोडे अंतर यायचे. त्यांची हद्द संपली की परत फिरायचे. रस्त्यात जाताना दूर दूर अंतरावर एखादे घर लागायचे. तिथे घराच्या आजूबाजूला विविध फळझाडे,फुलझाडे , भाज्या लावलेल्या असायच्या. मधेच कोणी शेतकरी गायी, बकऱ्या चरायला घेऊन जाताना भेटायचा. पहाडावर नैसर्गिकरीत्या खूप सुंदर, आकर्षक रंगाची फुले फुललेली दिसायची. ना कोणी लावलेली, ना कोणाची निगराणी असलेली ती जंगली फुले कुठल्याही बागेतल्या शोभिवंत फुलांपेक्षा सुंदर होती. विविध प्रकारचे मशरूम, शेवाळेही दिसायचे.
तिथे सर्वत्र दिसत होती ती पाईन जातीची झाडे. खरेतर त्या प्रदेशात पूर्वी मुबलक प्रमाणात देवदार व ओक वृक्ष होते. ते वृक्ष त्या त्या प्रदेशातील जमिनीमध्ये पाणी टिकवून ठेवणारे व हवेत ओलावा निर्माण करणारे आहेत. परंतु ब्रिटीश लोकांनी बऱ्याच प्रदेशातील ती झाडे पूर्णपणे तोडून टाकून पाईन लावले. पाईनचे फायदे हे की त्यापासून रंग, टर्पेनटाइन मिळते. परंतु त्यांचे तोटे असे की ते जमिनीतील पाणी जास्त वापरतात व हवामान उष्ण करतात. याचा परिणाम होऊन सतोली मधलेही पूर्वीचे नैसर्गिक थंड हवामान जाऊन तिथे उष्ण हवामान झाले आहे.
त्या रस्त्यावरून जाताना चढ उतार असायचा. मी पूर्ण थकून जायचे. मग मधे मधे ब्रेक घेत मी हॉस्पिटलमध्ये पोहोचायचे. संध्याकाळी ५- साडे ५ ला आम्ही परत निघायचो. कधी ६-साडे ६ वाजले तर अंधार पडायला सुरुवात होयची. मग घाई-घाईमध्ये आम्ही झपझप पाय उचलत चालायचो. कधी पाउस सुरु झाला की मग तर तारांबळ उडायची. पावसामुळे आणखी एक समस्या निर्माण व्हायची...जळवांची! पाउस पडला की जळवा बाहेर पडायच्या. त्या पायाला चिटकल्या व रक्त पिऊ लागल्या तरी बिलकुल दुखत नाही. त्यामुळे त्या पायाला लागलेल्या पण समजत नाही. मग त्या तशाच रक्त पीत राहतात व फुगून मोठय टम्म झाल्या की त्यांच्याच भाराने आपोआप गळून पडतात. अशीच एके दिवशी मी घरी परतले तेव्हा पाय धुवायला बाथरूममध्ये गेले. पायांकडे पाहिला तर काळे काळे ठिपके दिसले. मी पायांवर पाणी सोडले तरी ते जाईना. उलट ते लांब लांब होऊ लागले, वळवळू लागले. तेव्हा माझ्या लक्षात आले की ते दुसरे तिसरे काही नसून जळवा आहेत. मी आयुष्यात पहिल्यांदाच जळवा पाहत होते. मी घाबरून ओरडत बाहेर आले. पण नेमका हिमांशु जमालच्या घरी गेलेला. शेवटी पायाला लागलेल्या त्या ५-६ जळवा मी ओढून काढल्या. त्यानंतर २०-२५ मिनिटे तेथून रक्त येत राहते. त्याला मग कागद चिटकून टाकला. थोडा वेळाने हिमांशु परतला तेव्हा त्याने मला उपाय सांगितला की जळवा लागल्या की त्यांच्यावर मीठ टाकायचे म्हणजे त्या आपोआप गळून पडतात. ओढून काढल्या की मग महिनाभर त्या जागी खाज सुटत राहते. हाय !! त्याला म्हटलं , इतके दिवस सर्वांनी मला जळवांच्या स्टोऱ्या ऐकवल्या, पण एकाने पण इतका सोपा उपाय सांगितला नाही.
सकाळी ७ ला उठून मी बाल्कनी मधे यायचे. समोर पाहिले तर मस्त धुक्याने भरलेली दरी दिसायची. घर पूर्ण धुक्यात हरवलेले असायचे. जसा दिवस सुरु होईल तसे तसे ते धुके निवळत जायचे. असेच एके दिवशी आम्ही खाली म्हणजेच हॉस्पिटलकडे जात असताना पूर्ण धुके निवळले व दूरवर डोळ्यांच्या लेवलला हिमालयाची बर्फाच्छादित शिखरे स्पष्टपणे नजरेस दिसू लागली. आम्ही दोघेही आनंदाने , भरल्या मनाने ती पाहू लागलो. हिमांशूने सांगितले की बऱ्याच महिन्यानंतर आज धुके निवळून ती शिखरे दृष्टीस पडली होती. तो उत्साहाने मला त्यांची नावे सांगू लागला.. त्रिशुल, नंदादेवी, पंचचौली. मला तर किती फोटो काढू आणि किती नको असे झाले होते. पुढे मी एक महिना तिथे असेपर्यंत रोज त्या शिखरांचे दर्शन होतच राहिले.
संध्याकाळी परत येताना तो रस्ता वेगळाच वाटायचा. पाईन वृक्षांच्या त्या जंगलातून जाताना मला सतत लॉर्ड ऑफ रिंग्ज या मूवीमधल्या जंगलाचाच भास होयचा. घरी पोहोचेपर्यंत ७ वाजलेले असायचे व बऱ्याच वेळा घर धुक्यामध्ये हरवून गेलेले असायचे. आमची हद्द सुरु होताच डोरेमोन व त्याचा मित्र आमच्या स्वागताला हजर असायचे. रस्त्यात आजूबाजूला राहणारे कोणीनाकोणी भेटायचे. एक वंदना आणि तिच्या २ लहान मुलांचे घर लागायचे. गप्पा मारत आम्ही यायचो. घरी पोहोचले की मी मस्त चहा बनवून बाल्कनीमध्ये खुर्ची टाकून बसायचे. खालच्या मजल्यावर हिमांशुचा गिटारचा रियाज चालायचा. त्याचे सूर कानावर पडायचे. कधी तो अर्जित सिंगची किंवा हरिहरनची गाणी लावायचा. ती सुरेल गाणी ऐकून मन प्रसन्न होऊन जायचे. घरचा किंवा मित्र-मैत्रिणीचा फोन आला की मी घराचा एक कोपरा पकडायचे. फक्त तिथेच रेंज चांगली असायची आणि मी व्यवस्थित बोलू शकायचे. रात्री कधी ब्रेड ओम्लेट तर कधी दाल खिचडी तर कधी कोणी मशरूम पास्ता बनवायचो. तिथल्या ४-५ घरांची मिळून जशी काही एक चाळच बनली होती. कधीही कोणीही कुणाच्याही घरी जाऊन खायचो, प्यायचो. सगळेजण तिथे मजेत असायचे. कोणी घाईमध्ये , टेन्शनमधे दिसायचे नाही. हिमान्शुचे यावर म्हणणे असे की पहाडावरचे भाज्या, फळे यातच एक प्रकारची शांत उर्जा असते, असे अन्न खाल्ल्याने आणि पहाडाच्या मोकळ्या हवेत राहिल्याने आपोआपच इथे राहणारी माणसेही शांत होऊन जातात.
रात्री झोपताना एक नवीनच समस्या उभी राहिली. तिथे खूप सारे मोठ-मोठ्या आकाराचे कोळी असायचे. रात्र झाली की ते किडे शोधात भिंतीवर यायचे. सुमारे १०-१२ मोठाले कोळी भिंतीवर फिरताना बघून माझी झोपच उडून जायची. एक तर सर्वात मोठ्ठा आणि जाडा, चांगला पंजाएवढा होता. भीतीने मी लाईट पण चालूच ठेवायचे. मी सुशील सरांकडे तक्रार केली त्या स्पाईडर्सची. तर त्यांचे म्हणणे की “They are so innocent. They also get scared because of us. Make friends with them!!” आणि खरेच तसे झाले. काही दिवसांतच माझी भीती जाऊन उलट मला त्यांची सवय होऊन गेली. म्हटलं , उलट आता परत गेल्यावर मी मिस करेन त्यांना.
कधीकधी मला मध्यरात्री जाग यायची. पाहते तर लाईट गेलेली असायची. सगळीकडे मिट्ट काळोख पसरलेला. अशा रात्री आपण पहाडावर एका जंगलाच्या मध्यात एका लाकडी घरात एकट्याच आहोत, या विचारानेच मला भीती वाटायची. काचेच्या खिडक्यांवर मी पडदे ओढून घेतलेले असायचे. परंतु वरती छतावर एक मोठा काचेचा चौकोन होता दिवसा प्रकाश आणि ऊन येण्यासाठी. पण रात्रीच्या वेळी फार भीती वाटायची. किती प्रकारचे प्राणी आपल्या घराच्या अवतीभवती , या छतावर यावेळी फिरत असतील अशा विचारांनी माझी झोप उडायची. मग टोर्च लावून तिच्या उजेडात भीती घालवायचा प्रयत्न करत मी कधितरी झोपी जायचे.
पण अशाच एका अंधाऱ्या रात्री विचार आला की माणसाला आगीचा शोध लागण्याआधी माणूस या पृथ्वीवर, कसा जगत असेल, हिंस्त्र प्राण्यांपासून स्वतःचा बचाव कसा करत असेल. आगीचा शोध म्हणजे APES च्या Evolution मधील किती महत्त्वाची पायरी अथवा Turning point होता हे पहिल्यांदाच जाणवले.


11/25/16

उत्तराखंड भाग १

कालच तर मी दिल्लीला पोहोचले होते. पहिल्यांदाच दिल्ली पाहिली. उत्साहात कुतुबमिनाराच्या आजूबाजूला फिरले, फोटोग्राफी केली. आज सकाळी दिल्लीवरून ट्रेनने ४-५ तासांचा प्रवास करून मी काठगोदामला उतरले. तिथे दिनेश Taxi थांबवून माझी वाटच पाहत होते. तेथून पुढे तीन तास प्रवास करून आम्ही सतोलीला पोहोचणार होतो.
या पूर्ण प्रवासात मी मनोमन आश्चर्य करत होते की हे सर्व घडलेच कसे. खरेतर १५ दिवसांपूर्वी माझा कन्याकुमारीला जायचा बेत होता. कन्याकुमारीच्या विवेकानंद आश्रमात मी योगा क्लासचे बुकिंग पण केले होते. फक्त आता विमानाचे तिकीट बुक करणे बाकी होते आणि अचानक मी डेंगूने आजारी पडले. तापाने मी बरीच खंगून गेल्याने माझा कन्याकुमारीचा कार्यक्रम आपसूकच रद्द झाला.
मी जुना जॉब नुकताच सोडला होता. जुन्या कामाच्या ठिकाणी माझी बरीच ओढाताण झाली होती, मानसिक त्रास झाला होता. त्यामुळे दूर कुठेतरी जाऊन मनन चिंतन करावे, महिनाभर शांत जागी जाऊन राहावे असे विचार मनात येत होते. घरी बसल्याबसल्या माझे कुठे जावे यावर गुगलिंग चालूच होते. अशातच whats app वर एक मेसेज येऊन थडकला. “ Urgently need a female gynecologist, who loves mountains and likes trekking, need to take health check camps in villages of Uttrakhand for 1 month, good salary “. हा मेसेज वाचताच मी तेथे जायचे नक्की केले. परंतु मला विश्वासच बसत नव्हता की हा मेसेज खराखुरा आहे. जसे काही मी स्वप्न पाहत होते. मला हवी ती गोष्ट अशी आश्चर्यकारक रित्या सत्यात उतरली होती. हा मेसेज आरोही या उत्तराखंडमध्ये काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेतर्फे पाठवला गेला होता. त्यांच्यासोबत नेहमी काम करणारी स्त्रीरोगतज्ञ एका महिन्यासाठी येऊ शकत नसल्याने त्यांना तातडीने दुसऱ्या स्त्रीरोगतज्ञाची गरज होती.
मेसेजला रिप्लाय करताच आरोही या NGO चे प्रमुख डॉ. सुशील शर्मा यांच्याशी फोनवर माझे बोलणे झाले. त्यांचा आवाज मला खूप आश्वासक वाटला व आमच्या अर्ध्या तासाच्या बोलण्यातच माझ्या सर्व शंका दूर होऊन पुढील आठवड्यातच माझे उत्तराखंडला जाण्याचे नक्की झाले व प्रवासाचे सर्व बुकिंगही झाले. आरोही ही N.G.O उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यातील खेड्यांमध्ये शिक्षण, रोजगार व आरोग्य या घटकांवर काम करते. सतोली या पहाडी गावात संस्थेचे मुख्य कार्यालय व दवाखाना असून आजूबाजूच्या ५०-६० गावात आरोहीचे काम चालते.
तर अशाप्रकारे गेल्या १५ दिवसात कन्याकुमारी ऐवजी मी दिल्लीला पोहोचले होते. उत्तरेला प्रवासाची ही माझी पहिलीच वेळ. पहाडी प्रदेश, पहाडी लोग हे फक्त ऐकुनच माहित होते. त्यामुळे डॉ. सुशील यांनी मला, तुला पहाडी भागात काम करायचे आहे, असे सांगितले असले तरी पहाडी भाग कसा असतो याची मला काहीही कल्पना नव्हती. गुगल map वर मी सतोली व काठगोदाम शोधले होते. आम्ही नैनिताल जिल्ह्यात असल्याने काठगोदाम रेल्वे स्थानकावर पर्यटकांची भरपूर गर्दी होती. आमचा काठगोदाम ते सतोली प्रवास सुरु झाला. जाताना बऱ्याच ठिकाणी नैनितालचे बोर्ड दिसत होते, ते नाव वाचूनच मी उल्हसित होऊन गेले. मग हळूहळू खरेखुरे पहाड नजरेस पडायला सुरुवात झाली. एक पहाड संपला की लगेच पुढचा. रस्ता पूर्ण वळणा-वळणांचा. रस्त्यात आम्हाला भीमताल गाव लागले. तिथे थोडावेळ आम्ही थांबलो. तिथल्या अत्यंत सुंदर तलावाच्या दर्शनाने मी भारावून गेले. ताल म्हणजे तलाव. इथे खूप सारे सुंदर नयनरम्य तलाव आहेत आणि त्यांच्या वैशिष्ट्यानुसार त्यांना विविध नावे दिलेली आहेत. तिथेच बाजूला दिनेश पाणी भरून घेत होते. कुठून पाणी येत आहे हे पाहिले तर ते नैसर्गिक रित्या डोंगरावरून खाली वाहत आलेले झरे होते. त्याचे पाणी अतिशय थंड असते.
तिथून पुढे आम्ही निघालो. आता मात्र खूपच जास्त पहाड दिसू लागले. मी खुश होऊन फोटो काढायला सुरुवात केली. पण काहीच वेळात माझा उत्साह ओसरू लागला. वळणा-वळणांच्या त्या घाटदार रस्त्याने पार मला दमवून टाकले. एक तासाने तर माझी फोटोग्राफी पूर्ण बंद झाली. थकव्याने कधी एकदा मी सतोलीला पोहोचेन असे झाले.
तेवढ्यात डॉ. सुशील यांचा फोन आला. तुला ट्रेकिंग आवडते ना, असे विचारून त्यांनी मला कल्पना दिली की Taxi चा रस्ता संपल्यानंतर पुढे मला अर्धा ते एक तास चढाई करायची आहे. माझ्यासोबत बरेच सामान होते. ते न्यायला कोणीतरी येईल. मी खरेतर प्रवासाने बरीच थकून गेले होते. त्यात आणखी चढाई म्हणजे मी थोडी घाबरलेच. Taxi ने मला तेथील एका आश्रमाच्या गेटवर उतरवले. तेथून पुढे कच्चा रस्ता असल्याने चालत जावे लागणार होते. तिथे अर्धा तास आम्ही आरोहीच्या माणसाची वाट पाहत उभे होतो. त्या अर्धा तासात मनात कितीतरी विचार येऊन गेले. मुख्य विचार हाच होता की सर्व सामान परत Taxi मध्ये भरावे आणि परत माघारी जावे.
एकदाची आरोहीची २ माणसे आली आणि त्यांना मला सामानासकट सुकूनला पोहोचवले. सुकून म्हणजे डॉ. सुशील यांची पहाडावरची ४-५ घरे मिळून बनलेली प्रायवेट प्रॉपर्टी. तेथील एका दुमजली घराच्या वरच्या मजल्यावर माझी राहण्याची सोय करण्यात आलेली होती. खालच्या मजल्यावर डॉ. हिमांशू राहत होता. त्याच्याकडेच सुशील सरांनी मला सर्व माहिती देण्याची व मदत करण्याची जबाबदारी सोपवली होती.
माझ्या रूमला वेगळे किचन होते. त्यात मी नाश्ता व जेवण बनवू शकणार होते. ते पहाडावरचे जंगलाच्या मध्ये असलेले असे, लाकडाचे सुंदररीत्या बनवलेले घर होते. माझ्या रूमला मस्त गच्ची होती. तेथून समोरची दरी आणि ढग दिसत होते. सुकूनमधे त्या संध्याकाळी मी एक वेगळीच शांती अनुभवली, जी बरेच वर्षे मी हरवून बसले होते. त्या शांतीच्या अनुभवाने अक्षरशः मला रडू आले.
हिमांशुसोबत कॉफी पिताना त्याने सांगितले की धुके निवळल्यावर समोर हिमालयाची बर्फाच्छादित शिखरे दिसतात. त्या रात्री सुशील सरांनी त्यांच्या घरी मला व हिमांशुला जेवणासाठी बोलावले. जेवण सुरु करण्यापूर्वी मला सुशील सरांना पहिले अगदी मनापासून Thank you म्हणावेसे वाटले.
“ I am so much grateful to you for you invited me here.”


6/15/16

पुरूष नेहमी पुरूषच असतो..!

पुरूष  नेहमी पुरूषच असतो 

दारू पिणारा,

शिवीगाळ मारपिट करणारा

बिड्या फुंकणारा ,

नपुंसक असला तरीही..

पत्ते कुटत,

बायकोच्या पैशावर मजा मारणारा

गावभर उकिरडे फुंकणारा

पुरूषच असतो !! 

पुरूष  नेहमी पुरूषच असतो 

फार फार तर मर्द म्हणवतो 

स्त्री ?

ती कधी बाईमाणूसही म्हणवते 

नाहीच असे नाही

बर्याचदा 

जेवणात मीठ कमी पडले

तर ती हराम होते

पुरूषाने ठेवली की

रखेल होते

मूल न देऊ शकणारी

वांझोटी असते

कधी वेश्या असते

आणि नवर्याने टाकून दिली तर

गावजेवण होते

दुर्गा म्हणतात कधीकधी तिला

पण ती पुराणातच परवडते सार्यांना

जिवंत जाळली जाते सहजच

हलक्या चारित्र्याची म्हणून

किंवा भोगली जाते

तिच्या मर्जीविरूद्ध

बंद दाराआड

किंवा उघड्यावरच

ती छिनाल असते

पुरूषाला जाळ्यात फसवणारी

ती रांड असते

अशी तशी ती कोणकोण असते

फक्त माणूस तेवढी नसते

2/25/16

जातीचे रंग

खरेच जात आडनावात असते का ?

आपण भारतीय एवढे शिष्टाचार पाळणारे आहोत का ? कि नाव विचारून hello how are you, करून गप्प बसू ?

कामाच्या ठिकाणी एकटी मुलगी दिसली की लग्न झालं कि नाही असे थेट विचारणारे आपण. 

गाव कुठलं , या पाठोपाठ कोणत्या समाजाचे हा प्रश्न हमखास येतो.

मी डॉक्टर. निम्मे पेशंटतरी हमखास लग्न झालंय का आणि जात कोणती हे विचारतात.

गळ्यात मंगळसूत्र शोधणे व आडनावावरून जात ओळखण्याचे खेळ कोणीही करत नाही.

बोलायचा मुद्दा हा की जात काही आडनावात नसते. कपाळावरच्या टिळ्यात नसते. कि कपड्याच्या रंगात नसते.

जात दबा धरून बसलेली आहे आपल्याच मना-मनात.  सोयीनुसार आणि गरजेनुसार प्रकट होते वेळोवेळी.

जात आहेच आपल्या रोजच्या व्यवहारात.  

इतरांशी वागण्या बोलण्यात. छोट्या आणि मोठ्या गोष्टींत येतेच जात.

पण ती येते दोन्ही बाजूंनी.

जो अन्याय करतोय असं दिसतं त्याच्याही बाजूने आणि ज्यावर अन्याय होतोय असं वाटतं त्याच्याही बाजूने सुप्तपणे येतेच जात.

आजकाल आपल्या विचारांना, आवडी निवडींना, आवडत्या लेखकांना, संमेलनांना, विरोधकांना.......सगळ्याना चिकटून बसते आहे चिवट जात..

उठल्या उठल्या पहिले डोळ्यावर   आणि मेंदूवर जातीचा चष्मा घातला कि झालं . मग सोप्पं जातं चूक काय बरोबर काय, आपलं कोण परकं कोण ठरवायला.

 अशातच कोणी समर्थनाचा झेंडा घेऊन आणि कोणी विरोधाचा झेंडा घेऊन उभं राहतं लढायला. त्यांची नजर नेहमी विरूद्ध दिशेकडेच असल्याने स्वतःच्या झेंड्याचा जातीत रंगलेला गडद रंग दिसतच नाही. फक्त so called शत्रूवर मारा करणं इतकंच limited focus.

त्रयस्थाला दिसतात दोन्ही रंग. पण त्याच्यावरही विचार जबरदस्ती केली जाते एक बाजू निवडण्याची, मोठ्या आवाजातल्या घोषणा, इतिहासाचे दाखले, अन्यायाचे पुरावे, supporters ची  झुंड.. सगळं सगळं !

तटस्थतेने पाहणार्याला दिसतो एक देश..शतकांपासून जाती नुसार विभागून भांडणारा.

तर दुसरीकडे देशासमोरचे असांख्य प्रश्न ज्यांना जातीचा किंचितही वास नाही. , कदाचित त्यामुळेच त्यात कुणाला रस नसावा.

 दुष्काळ, बेकारी, पर्यावरणाचा ह्रास, प्रदूषण, चंगळवाद,  भू क, गरीबी, शहरातील वाढती लोकसंख्या,  लैंगिक शोषण,  इत्यादीना नाहीये कौणतीच जात.

ठरवलाच द्यायचा रंग त्यांनाही तर देता येऊ शकेल  आणि  मग छान रंगातील भांडणे.

समस्यांवरचे  उपाय ? तो शोधू नंतर निवांत. वेळ मिळाला तर.

इथे पहिले जातींचा खेळ आणि  राजकारण तर रंगू दे. 

11/23/15

शरीर व मन

     आपले शरीर आणि मन या एकदम जादुई गोष्टी आहेत या जमीनीवरच्या.
     हे शरीर आणि मन या चैतन्याने सळसळणार्या जिवंत गोष्टी आहेत. परंतु यांत्रिकतेने आयुष्य जगताना आपण हे वेळोवेळी विसरू पाहतो.
     वयाच्या २८ व्या वर्षी मी मनाने भयंकर निराश आणि शरीराने भरपूर जाडी झाले होते. अशा अवस्थेत मला जशी काही मी ५0 वर्षाची म्हातारी झाली आहे असे वाटू लागले होते. सर्व आशा संपलेली. आयुष्यावरची श्रद्धा संपून गेलेली. सौंदर्य शिल्लक नाही. काही करायची इच्छा उरली नाही. शेवटी ८३ किलो असे भयंकर वजन आणि निराशेच्या खोल गर्तेत अडकलेले मन यांत गुदमरून गेलेले मन यांना अचानक एका क्षणी जाग आली, कि अरे काहीतरी चुकतेय. असे जगून चालणार नाही. हे बदलायला हवे. It's now or never..!
            जर मी यावर काही उपाय शोधला नाही तर कदाचित आत्ता झालेली ही जाणीव अशीच पुसली जाईल. या असल्या सडलेल्या आयुष्याची सवयच होऊन जाईल आणि मग परत बदलावेच वाटणार नाही कदाचित कधी .
      मग खूप विचार केला कि ही अवस्था का आली ? काही वर्षांपूर्वी तर मी अशी मुळीच नव्हते.
       शरीराच्या या अवस्थेचे कारण तर obvious होते. मनाच्या नैराश्येमुळे शरीराची मंदावलेली हालचाल, काहीही व्यायाम नाही, मनात येईल तेव्हा हवे तितके काहीही विचार न करता अनियंत्रितपणे खाणे, याने वजन वाढून शरीर बेढब नाही होणार तर काय होणार ? उत्तर सापडले, मग उपाय पण ठरवला कि रोज व्यायाम, प्राणायाम व आहारनियंत्रण, योग्य खाणे.
  खरेतर शरीर व मन एकमेकांशी connected असतात. एक बिघडले कि त्याचा परिणाम दुसर्यावर होतो. तसेच उलट पण होते कि आपण एकाची काळजी घेतली कि दुसर्यावर पण परिणाम होतो. उदाहरण द्यायचे झाले तर, मन दुःखी असले कि शरीर मंदावते. काहींना भूक लागत नाही तर काहीजण दुःख झाले कि खूप जास्त खाऊ लागतात, junk food, sweets, chocolates अति खाऊन वजन वाढते. तसेच उलट पण होते. रोज न चुकता व्यायाम केल्याने, सकाळी उठून walk किंवा jogging केल्याने मनाचे नैराश्य दूर होऊन मन आतून आनंदी होते.
         शरीराचे उत्तर सापडले होते.
          मन इतके रसातळाला का गेले होते ? घटस्फोट झाला होता हे महत्वाचे कारण होतेच. पण तेवढे पुरेसे नव्हते. आणखी पण बरेच काही होते. त्यात पुन्हा divorce मुळे आलेलं नैराश्य.
        यातून बाहेर कसे पडायचे ?
  अशाच एका रविवारी 'सप्तरंग' वाचत होते. त्यातील नेहमीच मी सर्वप्रथम संदीप वासेलकरांचा लेख वाचते. त्या दिवशीच्या लेखाचा आशय होता कि आजच्या तरूणांनी फक्त भौतिक सुखसोईंमध्ये अडकून न पडता सामाजिक सुधारणांसाठीही झटले पाहिजे. त्यांचा प्रश्न होता आजची तरूणाई हरवली आहे भौतिक सुखाच्या मागे धावत. सामाजिक जबाबदारीचे भान कमी होते आहे आजच्या तरूंणामध्ये.
     मला ते कुठेतरी click झालं. अंधारात उजेडाची तिरिप पडावी तसं झालं. आयुष्यात पुढे काय करायचे ते अचानक उमजून आले. लक्षात आले की मी भौतिक यशाच्या मागे आंधळेपणाने इतकी धावत सुटले होते कि त्यात माझी जीवनमूल्येच मी हरवून गेले होते. दिशेविना रस्ता जसा भरकटतो तसेच Principles आणि श्रद्धा यांच्या शिवाय माझं आयुष्यच भरकटलं होतं. यावर उपाय काय ?
      तेव्हा आठवले, अकरावीत असताना वाचलेले डॉ. अभय बंग यांचे पुस्तक "माझा साक्षात्कारी ह्दय रोग". तेव्हापासून डोक्यात होते कि कधीतरी या Great व्यक्तीकडे जायचे. आता तो क्षण आला होता. निर्णय घेतला आणि गडचिरोलीजवळ असणार्या डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांच्या शोधग्राम येथील SEARCH च्या दवाखान्यात मी Medical Officer म्हणून रूजू झाले.
      तिथे रोज संध्याकाळी प्रार्थना असते. त्यानंतर नायना (डॉ. अभय बंग) हे सर्वांना मार्गदर्शन करतात. ते ऐकणे, दिवसभर campus मध्ये त्यांचे होणारे दर्शन, morning walk ला त्यांच्यासोबत गेल्यावर होणार्या गप्पा या सर्वातून मी घडत गेले. Principles आणि faith पुन्हा सापडले. तिथे माझ्यावर निरपेक्ष प्रेम करणारी, माझ्यातील विश्वास पुन्हा जागवणारी, जीव लावणारी, हक्काने रागवणारी, काळजी करणारी, अशी माणसे भेटली. भरभरून प्रेम केले सार्यांनी माझ्यावर. तेथे जसा पुन्हा नव्याने जन्म झाला माझा.
     तसेच तिथे मी नियमित व्यायाम सुरू केला. तिथे campus च्या आजूबाजूला जंगल पसरलेले आहे. खूप सुंदर वृक्ष , झाडे वेली व त्यावर असंख्य सुंदर पक्षी, मधेच तलाव असा सुंदर निसर्ग. Duty तून वेळ मिळेल तसे सकाळी चालायला जायचे व एखाद्या प्रचंड व सुंदर मोहाच्या वृक्षाखाली ध्यान करायचे असा नित्यक्रम बनून गेला. मग मी सायकल विकत घेतली गडचिरोलीवरुन. संध्याकाळी आजूबाजूच्या खेड्यात माझी सायकल रपेट होऊ लागली. त्याने शरीरावरची चरबी जशी वितळत गेली. आहार तर सुधारला होताच. तिथे junk food तर नव्हतेच. या सर्वामुळे वजन कमी झाले. पुन्हा मी पंचवीशीची दिसू लागले. त्यामुळे आत्मविश्वास वाढला व मन प्रसन्न राहू लागले.
       तेथे गेल्यावर नायनांना मी पहिला प्रश्न विचारला होता, नायना, माझी आयुष्यावरची श्रद्धा संपली आहे. काय करू ?
     "स्वतःच्या दुःखापेक्षा मोठं ध्येय समोर ठेव. स्वच्या पलीकडे जाणारं ध्येय ठेव."

7/13/15

कोकण solo trip

     At some point of time, some roads need to be taken alone. Few things need to be done alone.
     तसे कोकणात दापोलीला job साठी एक हॉस्पीटल पहायला जायचेच होते. एक सर्जन मित्र त्याच्या कुटुंबासोबत चिपळूण जवळच्या गावात राहतो. त्यालापण भेटायचे ठरवलेले होतेच. त्यात आला माझा वाढदिवस. म्हटलं , कशी करावी स्वतःची वाढ स्वतःलाच सिद्ध ? मगा एक कल्पना सुचली. इतके वर्षै प्रत्येक वाढदिवसाला इतरांकडून Gifts स्वीकारले. यावेळेस मात्र, Being an adult, स्वतःच स्वतःला Gift द्यायचे. ठरवूनच टाकले मग, This kokan solo trip is gift to me by myself for my 29th birthday.
      घरच्यांना whats app वर message टाकला आणि निघाले. बसने स्वारगेटला पोहोचले तरी नक्की नव्हते होत जायचे की नाही. गेल्यावर थोडावेळ थांबताच चिपळूणची एस्.टी. आली. पूर्ण पँक. पण कंडक्टरने एकटी मुलगी म्हणून घेतले आणि ड्रायव्हर शेजारी बॉनेटवर बसवले. मस्त धमाल आली. बॉनेटवर बसून समोरचा धावता रस्ता पाहिला, मोठी चढण, घाट पाहिले, मध्येच डुलक्या  काढल्या. ड्रायव्हरसोबत Selfie पण काढली. शेवटचा चिपळूणच्या just अलिकडचा घाट तर जबराच होता. घट्ट धरून बसले होते. पण भारीच घाट होता तो. त्या घाटातच माझ्या trip चे सार्थक झाले. असं वाटलं, इथेच कष्ट फिटले सारे या यातायातीचे.
     चिपळूणशेजारीच एका छोट्या गावात मित्राचे घर होते . त्याची बायको पणा माझी मैत्रीणच. त्याच्या घरी गेले. मधली काही वर्षे आमचा बिलकुल संपर्क राहिला नव्हता. पण त्यांना भेटून तसे काही जाणवलेच नाही. अगदी आधीच्या जिव्हाळ्यानेच गप्पा झाल्या.
      दुसर्या दिवशी सकाळी उठून मग परत फिरस्ती. पहिले चिपळूण, मग खेड, तेथून दापोली.( इथे पुन्हा ड्रायव्हर शेजारी बोनेटवर.. मज्जा नुसती ! ) दापोलीचे हॉस्पीटल पाहून निघाले तेव्हा खरी trip ची रंगत सुरू झाली. माझा plan ठरला होता. हर्णे beach, हर्णे बंदर, मग आंजर्ले गावात रात्री मुक्काम, दुसर्या दिवशी सकाळी कड्यावरच्या गणपतीचे दर्शन व पुन्हा beach. मग return to Dapoli आणि back to Pune. रिक्षा वाल्याने अव्वाच्या सव्वा पैसे सांगितले तेव्हा मी एस्.टी. चा वसा घेतला, "वाट पाहीन पण एस्.टी.नेच जाईन." स्टँडवर गेले तर समोर पुणे गाडी. मोह झाला कि गाडीत बसू नि घरी जाऊ. कुणी सांगितलंय ऊन्हात भटकायला. पण भटकभवानीचे माझे पाय असे थोडीच मागे फिरणार ?  आळशीपणाला दटावत उभी राहिले तशी एक तासाने हर्णेची गाडी आली आणि आवघे  २६ रूपये देऊन मी मस्त खिडकीतून घाट पाहत हर्णे ला पोहोचले.
     दुपारचे रणरणते ऊन. त्यात चालत पूर्ण हर्णेचा किनारा मी पार करून हर्णे बंदर व तेथील Lighthouse ला पोहोचले. ऊन्हात beach, समुद्राचे पाणी चमचमत होते. बंदर मला फार फार आवडते. मच्छीमार्यांच्या होड्या , जहाजे याच्या मी प्रेमातच आहे. किनार्यावर मच्छीमार्यांची एकच लगबग चालली होती. कारण रोज ४ वाजता तिथे माश्यांचा लिलाव चालतो.  खार्या पाण्यात पाय भिजवत, selfie काढत ऊन्हाने मी दमून गेले. मग दीपस्तंभ चढून वरती गेले. तिथून तर खालचा जबरदस्त view दिसत होता. तिथे मी थोडी सावली शोधली नि मग मस्त ताणून दिली. तासाभराने कावळ्यांच्या कलकलाटाने जाग आली. तिकडे खाली बंदरात माश्यांचा लिलाव सुरू झाला होता आणि इकडे मासळी पळवू पाहणार्या कावळ्यांना चेव चढला होता.
     मी दिपस्तंभावरून उतरून खाली आले. वाटेत मुंगुस भेटलं. त्याचं नकटं नाक उडवत ते वळून वळून पाहत होतं.
     तेथून पुढे आंजर्ले ला जायचे होते. चौकशी केल्यावर कळले तेथून आंजर्ले फक्त ४-५ किमी आहे. मग म्हटले की चालतच जाऊ इतक्या जवळ आहे तर. निघाले पाठीवर सँक अडकवून. माझ्या डाव्या हाताला समुद्र आणि उजवीकडे डांबरी रोड. संध्याकाळ होत आलेली. सूर्य केशरी झालेला. उजवीकडे, रोडच्या पलीकडे, मोठ्या होड्यांची रांगच रांग. मच्छीमार आता ३-४ महिने समुद्रावर जाणार नसल्याने तेथील मोकळ्या मैदानात होड्या आणि जहाजे जणू Park करून ठेवलेली. त्याला कुंपण व छत बनवून संरक्षित केलेली. डाव्या हाताचे मावळते केशरीबिंब आणि उजवीकडील माझी आवडती जहाजं पाहत मी तो on foot प्रवास full enjoy केला. मधेच मच्छीमारांची वस्ती लागली. तिथे सर्वाप्रकारचे मासे पहायला मिळाले. लांबडे मासे तर सुकायला टाकले होते.
     ती वस्ती जाउन थोडे पुढे जाताच रस्ता संपला. समोर मुक्त निळाशार समुद्र. पलीकडे टुमदार, छोटेखानी, स्वप्नवत सुंदर आंजर्ले गाव. समोर खाडी होती. त्यात पलिकडच्या तीरावर पोहोचवायला होड्या होत्या. मावळतीच्या केशरी पार्श्वभूमीवर नावा वल्हवणारे नावाडी, असे ता इतके अप्रतिम दृश्य होते की मी प्रेमातच पडले त्याच्या. मीही सामील झाले मग त्या दृश्यात. पैलतीरावर जायला एका होडीत बसले. खाडीतील ती संध्याकाळ, होडीतील तो एकटा क्षण, ती वल्हवणारा नावाडी, हे सारं इतकं परिपूर्ण होतं कि त्या क्षणात जणू मी माझं आख्खं आयुष्य जगले. सगळं तिथेच थांबावं, तो क्षण तसाच रहावा असा मोह पडला. That was perfect frame of life. " here it is, here I am ! "
       होडीतून उतरून, अंधार पडल्याने पहिले मुकूकामाची जागा शोधली. एका घरमालकाकडेच पर्यटकांना रहायची सोय होती. कोकणात असे लोक खूप चांगले आदरातिथ्य करतात. आल्याचा गरम चहा पिला आणि तरतरी आली. बेडवर पडून मग सर्चमधल्या मित्र गोतावळ्याला कॉल करून गमती सांगितल्या. उकडीचा मोदक आणि बाकिचं मस्त जेवण जेवल्यावर  थकून लगेच झोपपण लागली.
             सकाळी ६ लाच उठून मी गणपती दर्शनाला निघाले. पायर्यांचा रस्त्याने डोंगरावर जायचे. शेजारी कडा. म्हणून कड्यावरचा गणपती. काही लोक डांबरी रस्त्याने कार घेऊन येतात. पण देवासाठी चालण्यातील कष्टाचे सुख आणि तेव्हा आपोआप दिसणारे निसर्ग सौंदर्य याची सर एसी कारला कशी यावी ? कड्यावरून खाली पाहिल्यावर तर अप्रतिम देखावा दिसत होता. आंजर्लेचं संपूर्ण सौंदर्य उठून दिसत होते. मधोमध हा डोंगर, त्याच्या बाजूला घरांची  टुमदार वस्ती, ती संपल्यावर नारळाची दाट झाडे, त्यापलीकडे स्वच्छ नितळ समुद्रकिनारा, लाटा, त्याच्याही पलिकडे अथांग निळाशार समुद्र ! समुद्रात तळपणारा सुवर्णदुर्ग. तिथेच बसून Meditation केलं. तो अनुभव विलक्षण होता. मला जड देहातून मुक्त करून चैतन्याचे दर्शन घडवणारा होता. एक अनोखे स्वातंत्र्य बहाल करणारा होता .
    " Yesterday I cried out of my loneliness, Today I celebrate my Aloneness.. ! "
    " Free of past, I am reborn in present. Unaware of future, I rejoice in present. "
          सरसर डोंगर उतरून किनार्यावर धाव घेतली आणि बिलगले माझ्या प्राणप्रिय सखा समुद्राला. त्याला भेटण्यासाठी तर केला सारा अट्टाहास. मनसोक्तपणे समुद्राच्या लाटांमध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून देत, लाटा डोक्यावरून अंगावर घेत खेळले, लोळले, न्हाले. लाटांमध्ये चिंब होत समुद्राशी एकरूप झाले. तन आणि मन समुद्रमय होऊन गेले.
" I am daughter of Sea,
  I am made of Earth,
   I have wings of sky "

" My mind is full of peace, Heart is full of Love and Soul is dancing with joy . "

परतून आल्यावर बरेच दिवस माझे whats app status होते , I wish to buy a ship and go for long long, deep deep sea waters...