Welcome...

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..

Labels

Showing posts with label मीराची डायरी. Show all posts
Showing posts with label मीराची डायरी. Show all posts

4/11/24

रत्नागिरी

मीराच्या प्रवासातील पहिला मुक्काम सांगली होता. ती सांगली सोडते आणि प्रवास पुढे सुरू होतो, तेव्हा पुढे तिला काही बऱ्यावाईट गोष्टींना तोंड द्यावं लागणार होतं. बरेच धक्के पचवावे लागणार होते. हे लेखक म्हणून मला माहिती असल्यानं, पुढे कोणतं गाव निवडावं या विचारासरशी डोक्यात कोकण आलं.
कोकण का...तर अर्थात समुद्र.....
मीरेचा कादंबरीतील प्रवास हा फक्त बाह्य नाही, तर अर्थात आंतरिकसुद्धा आहे. आंतरिक प्रवासात प्रत्येकच व्यक्तीला, मग कोणतेही जेंडर असो, एका टप्प्यावर अस्वस्थतेचा, एकटेपणाचा शाप हा भोगावाच लागतो. ही घालमेल, तडफड अनुभवत असताना, मी स्वतः नेहमी निसर्गाचा आधार घेते. 
2015 मध्ये खूप अस्वस्थतेतून जात असताना, कोकणात पहिल्यांदाच मी एकटीने ट्रीप मारली होती. स्वारगेटला गेले. समोर चिपळूणची बस दिसली, बसले. मग खेड, दापोली, हर्णे, आंजर्ले इथे कधी बसने तर कधी चालत एकटीनेच फिरलेले. हर्णेच्या lighthouse खाली दुपारी झोपले होते. आंजर्ल्याच्या रिकाम्या समुद्र किनाऱ्यावर स्वतःला समुद्राच्या स्वाधीन केलेलं. वाटलेलं, समुद्र मनाच्या सगळ्या जखमा धुवून टाकतो. समुद्राच्या लाटा आपल्याला अंतरबाह्य निर्मळ करून टाकतात. समुद्र माणसाच्या अपुरेपणावर पांघरून घालत, मायेने पोटाशी धरतो.
समुद्राची हीच साथ मला मीरेला अनुभवायला द्यायची होती.
मग 2018 मध्ये कादंबरी लिहायची ठरवले तेव्हा नोकरीतून बिनपगारी रजा घेऊन दहा एक दिवस रत्नागिरीला मुक्काम ठोकला. दिवसाच्या वेगवेगळ्या क्षणी वेगवेगळ्या रुपातला समुद्र अनुभवला. समुद्रकिनारीच रिसॉर्टमध्ये राहून जे जे मनात येईल ते लिहित राहिले...तिथेच मीराची नवीन रूपं सापडली. तिची मल्हारबद्दलची आसक्ती. प्रेम. वाट पाहणं. एकटेपणातील भ्रम. सगळं.
कादंबरीत आलेलं रत्नागिरीजवळचं गाव सापडलं. तिथे जाण्याचा आतला आणि बाहेरचा रस्ता सापडला. 
समुद्र भरभरून देतो. आपली जितकी कुवत असेल तितकं घ्यावं. त्याच्यासारखीच काही माणसं पण असतात. प्रेम, माया, मैत्र, सोबत, सगळं सगळं देणारी या जगात खूप माणसे आहेत...आपल्याला आपलं मन शांत करत, ते समजून घेत, स्वीकारता आलं पाहिजे. 
जोपर्यंत ते जमत नाही, तोपर्यंत स्वतः च निर्माण केलेल्या मनाच्या वावटळीमध्ये आपणच भिरभिरत राहतो. मग मनाची भुणभुण थांबवून, मन बथ्थड व्हावे यासाठी एकतर दारू पीत राहायची, चंगळवादी जगत निब्बर व्हायचं, नाहीतर सतत जगावरच कचकच करत राहायची. 
म्हणून वाटतं, आयुष्यात प्रत्येकाने थोडा ठहराव आणावा. Pause घ्यावा. बसावं निसर्गासोबत, स्वतःला समजून घेत. या कादंबरीच्या आत आणि बाहेरही तो ठहराव मला समुद्र आणि हिमालय देत राहतात. 
Between विहिरीची मुलगी मधील सगळी पात्रे काल्पनिक आहेत. फक्त एकच पात्र अगदी खरंखुरं आहे. ते पात्र मला रत्नागिरीच्या रिसोर्टमध्ये भेटलेलं. ते म्हणजे जर्मन शेफर्ड प्रजातीची कुत्री डॉली. माझ्या तिथल्या मुक्कामात ती माझ्या मागे मागेच असायची. ती जशी खरी होती,  मी अगदी तशीच कादंबरीत,तिच्या चाळ्यांसकट लिहीली आहे. लॅपटॉपमध्ये जुने फोटो चाळताना तिचे फोटो सापडले. सोबत डकवते आहे.

3/16/24

सांगली

 विहिरीची मुलगी या कादंबरीतील मीरेच्या प्रवासाची सुरुवात सांगलीपासून होते. याचं कारण सांगलीनं माझ्या मनात कायमसाठी हक्काचं स्थान मिळवलं आहे. MBBS नंतर माझे DGO हे PG झाल्यानंतर, मी 3 महिने सांगलीत होते. 2014 साली बहुतेक. सांगलीतील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. हेमंत लिमये सर यांना गडचिरोलीतील शस्त्रक्रिया शिबिरात कमी वेळात, कौशल्यपूर्ण सर्जरी करताना मी पाहिलं होतं. तेव्हाच ठरवलेलं की सरांकडे जाऊन गर्भपिशवी काढण्याची शस्त्रक्रिया म्हणजेच Hysterectomy, सरांच्या टेक्निकने शिकून घ्यायची. त्यासाठी मग तीन महिने मी सांगलीत मुक्काम ठोकलेला. सांगलीला शिकलेल्या शस्त्रक्रिया, पुढे जाऊन सास्तूर या ठिकाणी नियमित केल्याने मीही त्यात expert झाले. कारण त्या भूकंपग्रस्त भागात गरीब रुग्णांना अगदी माफक दरात NGO ने चालवलेल्या स्पर्श या जिल्हा रुग्णालयात चांगल्या सुविधा मिळायच्या. त्यामुळे गरजू रुग्णांची गर्दी असायची. पुढे छत्तीसगडला माझ्या रुग्णांचे जीव वाचायला ते कौशल्य खूप जास्त उपयोगी आले, तेव्हा मला लिमये सरांच्या प्रती कृतज्ञता वाटलेली. छत्तीसगड सोडताना, तिथल्या इतर स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांना ते कौशल्य शिकवून मला समाधान वाटले. सांगलीत आणि जयसिंगपूर, शिराळा अशा आजूबाजूच्या गावांत जाऊन शस्त्रक्रिया चालायच्या, त्यामुळे फिरणं व्हायचं. कुठं काय चांगलं खायला मिळतं हे सर आणि सोबतच्या सहकाऱ्यांमुळे डेमोसकट माहिती व्हायचं. काम संपल्यावर संध्याकाळी मी पूर्ण रिकामी असायचे. मग सायकल काढून भटकायला जायचे. कधी सांगलीतील नदीचा घाट तर अनेकवेळा हरिपूरला एकटीने जाऊन बसायचे. सुंदर प्रसन्न जागा पाहून वाटायचं की कोणी बॉयफ्रेंड असता तर त्याला इकडे तिकडे फिरवलं असतं. 2017 मध्ये कादंबरी लेखन सुरु झालं तेव्हा मीराचा पहिला मुक्काम कुठे पडावा या प्रश्नासरशी सांगली आठवलं आणि ते लिहिलं गेलं. सोबतच आला नायक मल्हार. मला आयुष्यात कधीही न भेटलेला. पण हे पात्र लिहिताना मीच त्याच्या प्रेमात पडत गेले. असा मल्हार खऱ्या वास्तवात नाहीये हे स्विकारायला जडच गेलं. काही पात्रं लेखकाचे बोलणे आज्ञाधारकपणे पाळतात, काही लेखकाला पारच धुडकावून लावतात. तर काही लेखकालाच मोहात पाडतात. Anywes तर मागच्या आठवड्यात कोल्हापूरला असताना, वाट वाकडी करून, मीरा मल्हारचे आवडते ठिकाण हरीपूर इथे जायचा मोह टाळता आला नाहीये. ती जागा आता खूप बदलली आहे, पण तिथल्या माझ्या आठवणी अजून तशाच जपलेल्या आहेत. इथे दोन नद्यांचा संगम, त्यांच्या वेगळ्या उठून दिसणाऱ्या प्रवाहांसोबत पहायला मिळतो. Between कादंबरी वाचून एका मित्राचा आज फोन आला. त्याच्या वाईट काळात साथ दिलेल्या प्रेयसीबद्दल बोलताना तो म्हणाला की "ती माझ्या आयुष्यात मल्हारसारखी आली." प्रेमाची भाषा अशी स्थळ काळ लिंग ओलांडून पोहोचते. कादंबरी घेण्यासाठी संपर्क New Era PublishingHouse 9373553349

3/1/24

नवीन कादंबरी

माझी नवीन येणारी कादंबरी कशाबद्दल आहे ? 
तर एका बावीस तेवीस वर्षाच्या, मीरा नावाच्या बंडखोर मुलीची ही कहाणी. या वयात एक विश्वास असतो की मी म्हणेल ते बरोबर, माझ्या आयुष्याचा निर्णय मीच घेणार. तारुण्याच्या उत्साहात आपण आयुष्य घडवायला पाहतो. सगळं व्यवस्थित चाललं आहे म्हणतानाच अचानक सगळे गड किल्ले कोसळतात आणि सोबत आपणही भुइसपाट होऊन जातो. हे कोसळणे प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी घडतेच. पण या पडझडीनंतर पुन्हा स्वतःला उभं करताना, कोणती मूल्यव्यवस्था कामी येते, कोण आपल्याला आधार देतं आणि जगाला सामोरं जात असतानाच स्वतःला ही पुन्हा एकवार कसं समर्थ बनवायचं, अशा प्रकारची ही एका तरुणीची कथा आहे. तरुणीची यासाठी, कारण आपल्या समाजात पुरुष आणि स्त्री हा भेदभाव आजही पाहायला मिळतो. पुरुषांना जे अनेक प्रकारचे स्वातंत्र्य सहज मिळते, स्त्रीची मात्र प्रत्येक ठिकाणी अडवणूक केली जाते. कधी इतर लोक तिला बंधने घालतात तर कधी ती स्वतः च हरवलेल्या आत्मविश्वासामुळे स्वतः ला गमावून बसते. तर भेदभाव करणारी ही समाजव्यवस्था समजून घेत, तिच्यासमोर एक मुलगी कशी स्वतःचे विश्व घडवू शकते, या आत्मशोधाची ही कादंबरी आहे.  अनेक वर्षे पुरुष त्यांच्या नजरेतून आपल्याला स्त्रियांची कहाणी सांगत राहिले. पण या पुस्तकात मात्र स्वतः स्त्रीच्या नजरेतून नायिकेची कहाणी सांगितली आहे. तिच्या मनासकट आणि शरीरासकटसुद्धा. ज्या गोष्टी बोलायच्या नाहीत हे सांगितले जाते, त्याच गोष्टी बोलून, बदल घडवून आणायची आशा आहे.

या कादंबरीमध्ये मी या ब्लॉग वरचे अनेक तुकडे वापरले आहेत. कादंबरीमधील नायिका मीरा ही ब्लॉग लिहीत असते. फक्त ब्लॉगचे नाव मातीची मुलगी ऐवजी, विहिरीची मुलगी असे आहे. 

कादंबरीचे नाव - विहिरीची मुलगी.
प्रकाशक - New Era Publication, Pune
पृष्ठे 275
येत्या आठवडाभरात कादंबरी उपलब्ध होईल. 

4/9/23

प्रश्न बनून राहिलेल्या मुली

(पूर्वप्रसिद्धी साप्ताहिक साधना) तीन प्रश्न भेटले आहेत आत्तापर्यंत निरागस हास्य चेहऱ्यावर लेवून. एक – सप्टेंबर २०१६ उत्तराखंडमध्ये मी ‘आरोही’ या समाजसेवी संस्थेमध्ये काही दिवसांकरिता स्त्रीरोगतज्ञ म्हणून काम करण्याकरिता गेले होते. उत्तराखंडच्या, नैनिताल जिल्ह्यातील कुमाऊ भागात पहाडी गावांत, फिरत्या दवाखान्यातर्फे गर्भवती महिलांची तपासणी व उपचार करणे, नंतरच्या काळात तेथील दाईना बाळंतपणाचे प्रशिक्षण देणे, अशी जबाबदारी माझ्यावर होती. शेवटचे दहा दिवस मेडिकल ट्रेक होता. आम्ही चार डॉक्टर्स, चार स्वयंसेवक, एक फोटोग्राफर व आमचे लीडर पंकज सर, जे वर्षातून दोन वेळा स्व-खर्चाने हा ट्रेक आयोजित करतात, अशी आमची टीम जमली होती. बालेश्वर या गावापासून आणखी पुढे जाऊन एका पहाडावरील रिसोर्टमधे आम्ही पहिल्या रात्री मुक्काम केला. रोज सकाळी सातलाच ट्रेक सुरु करायचा, अकरापर्यंत गावात पोहचायचे, तिथे कॅम्प लावून रुग्ण तपासणी करायची. छोटे गाव असेल तर जेवून आणखी पुढच्या गावी जाऊन तिथे पुन्हा कॅम्प लावायचा व मग मुक्कामाच्या ठिकाणी जायचे असा दिनक्रम होता. कधी गाव खूप दूरवर असले तर मग एकाच गावी जाणे होयचे. कधी गावातील शाळेत सर्व वयोगटातील मुला-मुलींच्या आरोग्यतपासणीसाठी जायचो. आम्ही डॉक्टर्स आरोग्य तपासणी करत असताना, बाकी स्वयंसेवक मुलांसाठी चित्रकला, वेगवेगळे खेळ असे प्रकार घ्यायचे. खूप मजा यायची आणि ट्रेकिंगने थकायलाही होऊन जायचे. रात्री थकून भागून मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायचो. पहाड चढताना प्रत्येकाची चालण्याची गती वेगवेगळी असायची. कोणी वेगाने जायचे, तर कोणी संथ. माझा हा पहिलाच हिमालयीन ट्रेक असल्याने आणि इतक्या उंचीवरच्या ट्रेकिंगची सवय नसल्याने मी सर्वात मागे असायचे. अशीच एकेदिवशी शाळेतील तपासणीनंतर मी एकटीच पहाड उतरणीच्या रस्त्याला लागले होते. शाळा सुटली होती. सर्व पोरे पोरीही त्याच रस्त्याने निघाले होते. पहाड उतरून गेले की त्यांचे गाव होते. आमचाही मुक्काम तिथेच होता. त्यातील एक चुणचुणीत, आठ वर्षांची पोट्टी माझ्यासोबत चालू लागली. आमची मग दोस्ती झाली. मी दमले आहे, हे लक्षात येऊन ती व तिच्या आणखी इटुकल्या मैत्रिणी माझी पाठीवरची bag मागू लागल्या. “दीदी, bag हमे देदो, आप थक जाओगे.” मला हसू आले आणि कौतुक पण वाटले त्यांच्या काळजीचे. खाली उतरून गेल्यावर अक्रोडाची दोन-तीन मोठी झाडे लागली. सर्व पोरे-पोरी अक्रोड वेचू लागले. शोधून, दगडाने फोडून खाऊ लागले. माझी छोटी मैत्रीणही त्यात सामील झाली. मी उभी राहून कौतुकाने ते पाहत होते. तर ती पोरगी सारे अक्रोड गोळा करून मलाच आणून देऊ लागली. मी नको म्हणतेय तरी जबरदस्तीने माझ्या bag मध्ये टाकू लागली. बाकीच्या पोरांनाही मग मला अक्रोड द्यायला म्हणून रागावू लागली. अशारितीने भरपूर सारे अक्रोड गोळा झाले माझ्याकडे. मग आम्ही दोघी परत रस्त्याला लागलो. तिचे घर लागले, तसे मी तिला म्हटले, “तू दप्तर ठेऊन ये. आपण फिरायला जाऊ.” मीही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचले. थंड पाण्याने आंघोळ करून ताजीतवानी झाले. तेवढ्यात ती आलीच मला शोधत. मग आम्ही दोघीही गावात फेरफटका मारायला गेलो. एक लहानसे दुकान दिसले. तिच्या प्रेमाखातर मला तिला काहीतरी देऊ वाटत होते. त्या दुकानातून टूथपेस्ट, ब्रश, तेल, कंगवा, साबण अशा तिला रोज लागणाऱ्या वस्तू, काही बिस्किटे, थोडे चॉकलेट असे सामान तिला घेऊन दिले. ती खुश दिसली. मलाही तिचा आनंद पाहून समाधान वाटले. मग तिला मी घरी सोडवायला गेले. तिच्या घरात काही अक्रोड होते, तिला तेही मला द्यायची इच्छा होती, म्हणून ती पळत घरात शिरली. मी बाहेरच अंगणात थांबले. ती अक्रोड घेऊन बाहेर आली. तिच्यामागे आणखी लहान लहान मुले आली. तिचे अक्रोड माझ्या bag मधे ठेवत मी तिला विचारले, “कोण कोण आहे तुझ्या घरी ?” तेव्हा कळले, ती सर्वात मोठी मुलगी घरातील. तिला २ छोट्या बहिणी आणि २ छोटे भाऊ. असे ते पाच लोक. तिच्या मागे दूरवर उभे राहून, फाटक्या कपड्यातले ते बहिण भाऊ माझ्याकडे कौतुकाने पाहत होते. मी दिलेल्या सामानाची पिशवी घेऊन ती हसतच तिच्या भावंडाकडे गेली. त्या पिशवीत मात्र एकच ब्रश, एकच साबण होता. ते तिला स्वतःला तरी किती दिवस पुरणार होते ? तेथून परत येताना, त्या फाटक्या कपड्यातल्या भावंडांचे दृश्य माझ्या डोळ्यासमोरून हटत नव्हते. तेव्हा मला माझ्या त्या मुलीला त्या वस्तू घेऊन देण्यातील क्षणभंगुरता लक्षात आली. त्या रात्री, त्या पहाडी गावामध्ये, मी डायरीत लिहित राहिले, “पहाडातील या सर्वात दुर्लक्षित राहिलेल्या मुलीसाठी काय करू शकते मी ? दर वर्षी इथे असेच ट्रेकिंग करत यावे की सर्व सोडून कायमचे येऊन रहावे इथे ? की वर्षातील एक महिना नित्य नेमाने इथे येत जाऊन काहीतरी काम करावे या मुलींसाठी ? काय करू शकते मी या मुलीसाठी ?” हसऱ्या चेहऱ्याने मला निरोप देणारी ती अक्रोडवाली मुलगी कायमची प्रश्न बनून रुतून बसली आहे माझ्या मनात आणि आठवत राहते दररोज. दोन - फेब्रुवारी २०१८ पुणे रेल्वे स्टेशनवर मी वैतागून उभी होते. उद्यान एक्स्प्रेसची पावणे अकराची वेळ होती आणि ट्रेन दोन तास उशिराने येणार होती. त्या दोन तासात दमायला झाले वाट बघून. शेवटी एकदाची एक वाजता ट्रेन येण्याची सूचना आली व bag घेऊन मी फलाटावर उभी राहिले रूळाकडे डोळे लावून. एक भिकारीण, तिच्या दोन-तीन पोरा-टोरांसोबत भीक मागत माझ्यासमोर आली. भिकाऱ्यांना भीक द्यावी की नको या प्रश्नावर मनात खूप काथ्याकुट करूनही अजून त्याचे निश्चित उत्तर मला सापडलेले नाही. त्यामुळे ते काम मी मूडवर सोपवते. पोरे असलेली बाई, म्हणून त्या बाईच्या हातावर काही पैसे टेकवले. ती पुढे निघून गेली. पण तिच्या सोबतची फाटक्या मळक्या कपड्यातील पोर माझ्यासमोरच थांबली. “मुझे भी दो.” ट्रेन येण्याकडे लक्ष असणाऱ्या माझी चिडचिड झाली, “आगे जाव.” मी रागाने तिच्याकडे पाहत बोलले. तिने हट्टाने मान मुरडून, “उंहू” केले. ती सहा-सात वर्षे वयाची शेंबडी पोर पाहून मी विरघळले. मनात विचार आला, माझा भाचा जेव्हा काही मागतो, तेव्हा मी लाडाने त्याला देते. ही सुधा तर छोटी पोरच आहे. इतक्या कोवळ्या जीवाला मी भिकारी या चष्म्यातून पाहून हिडीस फिडीस करणे योग्य आहे का ? मग सावकाशपणे मी पर्स उघडली. चिक्कीचे पुडे ठेवलेले होते, ते तिला देऊन टाकले. खुशीने ते घेऊन ती पुढे गेली. पाच मिनिटांनी मी पुन्हा तिच्याकडे पहिले. दूरवर गेलेली ती अजूनही तो पुडा दाताने उघडायचा प्रयत्न करत होती आणि दुरूनही माझ्याकडे पाहत होती. मी विचारात पडले. समाजात अशा स्टेशनवर फिरणाऱ्या, बालपण उपभोगण्याऐवजी भिक मागत फिरणाऱ्या या मुलींप्रती माझी काय जबाबदारी आहे ? मीही हिच्या या परिस्थितीला, हिच्या ‘भिकारी असण्याला’ समाजाचा एक भाग म्हणून काही अंशी तरी नक्कीच जबाबदार आहे. हिच्यासाठी मी काय करू शकते ? असा हा रेल्वे फलाटावर भेटलेला शेंबडा आणि हट्टी प्रश्न. त्याला हुसकावले तरी ‘उंहू’ करत बसून राहतो मानगुटीवर. तीन. कुटरु अनाथालय. मार्च, २०१८. छत्तीसगड. बिजापूर जिल्हा. भैरमगड प्रभाग. कुटरु खेडे. त्यातील पंचशील नावाचा अनाथाश्रम. दहा एक वर्षांपूर्वी झालेल्या नक्षलवाद्यानविरुद्ध आदिवासींनी केलेल्या सशस्त्र लढ्यामध्ये मारल्या गेलेल्या आदिवासींच्या अनाथ मुला-मुलींसाठी ‘मधुकर राव’ या आदिवासी नेत्याने बनवलेला हा आश्रम. रविवारी या गावात मी तेथील रूग्णालयामधे गर्भवती महिलांच्या तपासणीसाठी गेले की मुलींच्या आश्रमात चक्कर होतेच. अधीक्षकांची विनवणी असते की तेथूनच काही अंतरावर असलेल्या मुलांच्या आश्रमालाही भेट द्या. पण मुलींकडून पायच निघत नाही आणि अजून मी मुलांच्या आश्रमाकडे फिरकलेही नाही. माझा मुंबईवरून मित्र आला होता मकरंद दीक्षित, त्याने माझ्या या मुलींना ओरिगामी शिकवले. दोनवेळा कुटरुला गेला, दोन्ही वेळी मुलींच्याच आश्रमात. मुलांकडे नाहीच. मुली जीवच लावतात तितका. मधे महिनाभर रजा घेऊन काही कामानिमित्त मी महाराष्ट्रात, गुजारतमधे गेलेले. परत आल्यावर बिजापुरच्या जिल्हा रुग्णालयातच व्यस्त. त्यामुळे सलग दीड महिना जाणेच झाले नाही आश्रमात मुलींकडे. परवा होळी झाली, सारेजण रंग खेळले. मी मात्र चिंताग्रस्त. डोक्यात नुसती चिंता, तणाव. खेळूच वाटले नाहीत रंग. आपल्याला कोणीच नाही अशा एकटेपणाच्या विचित्र जाणीवेने पुरे घेरून टाकले होते. यावर्षीची होळी बिनारंगांची गेली म्हणून अजून नाराजी. मुलींची आठवण आली म्हणून मधुकर रावांना फोन केला की मी या रविवारी येते तिकडे म्हणून. आज गेले तर मुली खुशीने धावतच आल्या. येऊन, प्रणाम म्हणत वाकून पायाला नमस्कार. मी नको नको म्हणेपर्यत वाकल्यासुधा. बाकीच्यांना म्हटले, “झुको मत. गले लगो.” मग गळाभेट झाली. पाहिले तर मी येणार म्हणून मुलींनी आज पुन्हा एकदा रंग खेळायची पूर्ण तयारी करून ठेवलेली. कपाळावर ‘टीका’ लावायला ताटात रंग काढलेले, पाण्याने बादल्या भरून ठेवलेल्या. “आज दीदी के साथ रंग खेलना है” म्हणत कोणी अंघोळी पण नव्हत्या केलेल्या. मी आश्चर्याने सर्दच ! मनात रिकाम्या हाताने आल्याची खंत, गडबडीत मिठाई आणायची विसरूनच गेलेले. मग मुलींना, त्याच्या तरुण उत्साही शिक्षिकांना हळूहळू शांत केले. म्हटले, अजून दोन दिवसांनी रंगपंचमी येते आहे, तेव्हा मी रुग्णालयाचे काम संपवून दुपारी येईन, आपण मिठाई खाऊ, कोल्ड्रिंक पिऊ, मग रंग खेळू, मस्त गाणे लावून साऱ्याजणी नाचूया रात्र होईपर्यंत. रात्री मी इथेच राहीन. पकोडे करू रात्री. असा सर्व कार्यक्रम ठरवला, तेव्हा कुठे मग सारे शांत झाले. माझे मन आनंदाने भरून आले. हे वर्ष अंगाला रंग लागला नाही, म्हणून खंतावले होते मी. पण या वेड्या मुलींनी माझी तीही हौस भागवली, या अनाथ मुली मुक्त हस्ताने प्रेम देताहेत मला. त्यांचा रंग खेळून झालाय परवाच, पण माझ्यासाठी मधुकर राव पुन्हा एकदा परवानगी देत आहेत मुलींना रंग खेळायला. खूप कृतज्ञ वाटले मधुकर राव आणि या मुलींप्रती. बाहेर ऊन असल्याने आम्ही हॉलमधेच मोठ्ठे रिंगण करून बसलो होतो. परीक्षा चालू असल्याने १०-१२ वीच्या मोठ्या मुली अभ्यास करत होत्या. आम्ही बाकी सारे मग बैठे खेळ खेळलो. खेळताना नियम मोडले जात होते, चीटिंग चालू होती आणि मला गम्मत वाटत होती, त्यांच्यासोबत पुन्हा लहान होण्याची. एक सात वर्षाची मुलगी पळायला उठली आणि तिचा एका बाजूचा पूर्ण फाटलेला फ्रॉक मला दिसला. मनात कुठेतरी हलले. त्यांना खेळण्यात सोडून मी उठून त्यांच्या शिक्षिकेकडे गेले, किती कपडे मिळतात, कोण देते वगैरे. “बच्चे है, तो खेलते खेलते, फट जाते है कपडे.” बरोबरच होते ते. त्या चिमुकल्या अनाथ मुलींना कसे कळावे की मिळणारे अपुरे कपडे नीट जपून वापरावेत म्हणून. मनात आले, होळीनिमित्त त्या सर्वाना कपडे घेऊन द्यावेत. पुन्हा मनात तोच विचार, तू घेऊन दिलेला एक एक कपडा किती दिवस पुरणार आहे त्यांना ? येताना त्यांना विचारले, “कौनसी मिठाई लावू ?” एकीने हक्काने सांगितले, “दीदी, गुलाब जामून लावो, मुझे बहोत पसंद है.” म्हटले, “ठीक है.” सर्वांचा निरोप घेऊन बिजापुरला जायला परत निघते मी, मनात रंगपंचमीचा कार्यक्रम आखत. त्यातील एक नऊ वर्षाची मुलगी मला फार आवडते, सरिता. नेहमी मी गेले की पाणी आणून देणे, मला सर्व फिरवून दाखवणे, फोटो काढणे, अशी कामे करणारी चुणचुणीत मुलगी, शांत समंजस. मनात येते, मी हिला दत्तक घेऊ शकते का ? पण हिला इथून, तिच्या जन्म स्थळापासून दूर महाराष्ट्रात नेणे योग्य होईल का ? मी तिला खरीखुरी माया देऊ शकेन का ? की नाहीतर मीच कायमसाठी राहून जावे इथे कुटरुमधे या मुलींसोबत. पण मी इतकी समर्थ आहे का, इतका मोठा निर्णय निभवायला? डोक्यात नुसते प्रश्न. मुलींचे मिळणारे भरभरून प्रेम, माझ्या एकटेपणाला पळवून लावणारे. साऱ्या जगावर नाराज होऊन अंगाला रंग न लावून घेणारी मी त्यांच्या प्रेमाच्या रंगात अंतर्बाह्य रंगून जाते नकळतपणे. अजूनही मी फक्त घेतच आहे त्यांच्याकडून. ते त्यांना परत कशी देऊ ? या सर्वाची परतफेड कशी करायची ? त्यांच्यासाठी मी काय करू शकते ? हा तिसरा प्रश्न.

5/12/15

"मी पूर्णपणे अशी कोणालाच नको असते"


मी पूर्णपणे अशी कोणालाच नको असते.
म्हणजे तुम्हालाही येतं का असं feeling कधीकधी किंवा अनेकदा....?
आपल्यातील थोडासा. काहीसा selected भागच फक्त इतरांना हवा असतो.
तेवढ्याच भागापुरते त्यांना आपल्याशी देणेघेणे असते.
ते येतात, तेवढाच भाग पाहतात, तेवढ्याशीच नाते जपतात. तेवढ्याकडून त्यांना हवे ते काम काढून घेतात. त्यांचे येणे वसूल करून घेतात आणि जातात निघून उरलेल्या भागाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून.
अशी मी मग वेगवेगळ्या भागात विभागली जाते.
किंवा मग लोकांना सोप्पं जावं म्हणून मीच आधी तुकडे करून ठेवते स्वतःचे.
“घ्या, तुम्हाला हवा तो तुकडा घ्या. ”
असे मग नुसते तुकडे तुकडेच होऊन जातात.
मग कुणालातरी माझा अगदीच आतला तुकडा हवा असतो, काळजाचा. अलगद येऊन, माझे सारे बंदीपहारे सहजच चुकवून, ती व्यक्ती तो माझ्या जीवाचा तुकडाही अलगद जाते वापरून. मनात येईल तेव्हा येऊन गोंजारते. मन भरलं की पाठ फिरवून निघून जाते. पण तिच्या हाताळण्याने पोहोचते त्याला भरून न येणारी इजा. काळजाची इजा कोणाला दाखवणार ? आणि जी व्यक्ती ती देऊन गेली, तिला तर आठवण पण नाही राहत त्या भागाची अथवा मुद्दामच ती व्यक्ती सोंग करते, की अरे, मी तर तिकडे आलेच नाही. माझ्याकडे तर नसतात कसले साक्षी पुरावे.
इतकी पण शरम नसावी का अशा लोकांना ? इतका पण मर्दपणा नसावा का पुरुषांमध्ये की कबूल करण्याचा की मी वापरला तुझा काळजाचा भाग माझ्या आनंदासाठी ? एवढा basic प्रामाणिकपणा नसावा का एक माणूस म्हणून ?
आणखी दुसऱ्या कोणाला थोडा व्यावहारिक भाग हवा असतो. त्यांनी ते स्पष्ट ठेवलेलं असतं ते चांगलं. पण मी पडते मूर्ख. माझं तर नियंत्रण नसतंच त्यावर. त्या व्यक्तीला माझा व्यावसायिक भाग देत असतानाच अचानक दुसराच भावनिक भाग विरघळू लागतो, प्रेम पाझरू लागतो. ती व्यक्ती मग अगदीच विचित्र नजरेने पाहू लागते त्या माझ्या गरीब लाचार भागाकडे. त्या तिरस्काराच्या नजरेने माझं पूर्ण अस्तित्वच शहारून जातं. असं वाटतं, लपवून टाकावा अथवा मारून टाकावा तो भावनाविवश भाग. मी अशी विद्ध असताना ती व्यक्ती तिचं व्यावसायिक काम काढून घेऊन निघून जाते आणि मागे मी शरमेच्या, निराशेच्या गर्तेत अडकलेली.
काही असतात तापदायक, मला स्वतःलाही नकोसे वाटणारे. रागाचे, इर्षेचे, Insecurity चे, निराशेचे. दु:खाचे.. मलाच ते पेलवत नाहीत. वाटतं स्वतः पासून तोडून ते फेकून द्यावेत. पण तसं होत नाहीत. ते असतात माझ्या अस्तित्वाचे अविभाज्य अंग. अशा टोकदार, काटेदार, कुरूप भागांचे दर्शन ज्याला होते, ती व्यक्ती तर नाकारुनच टाकते माझ्या चांगल्या भागांचे अस्तित्व. तो माझा एक भागच बनून जातो मला Define करणारा केंद्रबिंदू त्या व्यक्तीसाठी. पाहत राहते मी हताशपणे फक्त. “अरे, मला स्वतःलाच या भागाचं कोडं सुटत नाही, ते मी तुला कसं समजावून सांगू. पण म्हणून मला त्या भागाने अधोरेखित करण्याचा तुला काहीच हक्क नाही...” हे सारं असतं आतल्याआत.
असे अखंड तुकडे पडलेले असतात मनाचे, माझ्या भाव विश्वाचे.
त्यात शरीराचाही एक तुकडा. त्याच्या मागण्यांचा प्रदेश तर वेगळाच. त्या मागण्या मलाही घाबरवून टाकणाऱ्या. नैतिकतेच्या कोड्यात अडकून त्यांचा सगळा घोळच होऊन जातो, जो ना त्यांना उमगतो, ना मला. कधी कधी त्या सुख पुरवणाऱ्या, तर कधी मनावर तप्त सळईने ओरखडे ओढणाऱ्या.
असे असंख्य घायाळ तुकडे. त्यांचे त्यांचे घायाळ प्रदेश. त्या प्रदेशाची मी नियंत्रण नसलेली मालकीण.
आणि मजा अशी की मी अख्खीच्या अख्खी कुणालाच नको असते. असं का होतं ? मी माझ्या काळ्या-पांढऱ्या सकट, वरचं आवरण आणि आतल्या गाभाऱ्यासकट, माझ्या सर्वच्या सर्व भागांसकट कोणालाच का हवीशी नसते ?
असं स्वतःचे लचके तोडून आणि त्या तुकड्यांचा बाजार मांडून जगणं खरंच आवश्यक आहे का ?


9/11/13

तिचा बाप्पा ..

गणपतीचे आगमन झाले आणि त्यासोबत आल्या त्याच्या आठवणी.मीरेला नकोश्या वाटणाऱ्या पण तरीही तिचा पिच्छा न सोडणाऱ्या तिच्या आणि रौनितच्या आठवणी.

लहानपणा पासूनच मीरेचे गणरायासोबत आगळे वेगळे नाते होते.तिला तो बाप्पा कधी देव वाटलाच नाही.वाटला तो तिचा परम मित्र. तिला भावला तो तिचा जीवा भावाचा सखा म्हणून.त्याच्या गजमुखाच्या रूपाच्या प्रेमात पडली ती आणि तशीच प्रीतीच्या रुपात तिची भक्ती फुलली!

तारुण्याच्या वाटेवर तिच्या जोडीदाराच्या रुपात रौनीत भेटला तिला पूर्णत्वाने स्वीकारणारा आणि ती त्याला घेऊन गेली दगडूशेठ समोर.तिथेच त्याला सांगितल हा माझा पहिला boyfriend आणि तू दुसरा.रौनीतने ते हसून स्वीकारलं आणि त्या गणेश वेड्या मुलीच्या तो आणखीनच प्रेमात पडला.मग गणेश जयंतीला घरात आलेले बाप्पा त्या दोघांनी कायमसाठी ठेवले.
परंतु सुखाचं काय मिळालं मिळालं म्हणता म्हणता भुरकन उडून जातं .

तसाच तो तिचा रौनीत गेला तिच्या इवल्याश्या जगाला नाकारून. जाताना तिचं स्वत्व तोडून गेला.मग तो गणपतीही मीराने विसर्जित करून टाकला आणि त्यासोबत तिच्या बालिश श्रद्धा!
आजही गणपती येतो, तिच्या ही घरामध्ये बसवला जातो.पण आता त्याला पाहून तिचं मन प्रेमानं भरून पावत नाही किंवा आनंदानं उमलून येत नाही.दगडाच्या मनानेच ती आता हात जोडते.परंतु दगडालाही दंश करणाऱ्या त्या आठवणी .. त्याचं काय करावं तिनं!
छे बुवा या गणपतीने सगळाच घोळ करून ठेवलाय.हा निस्तरताना जन्म जाणार सारा !!

8/3/13

this loneliness...

This loneliness is eating me inside and out.. no escape from this deep seated pain... no escape ever possible... how to cheat with it.? How to bypass it..? How to hide ftom it..? No way... I have to face it standing right face to face of it.. I have to accept it with arms spread and I have to welcome it thought tears in eyes... this whole process making me weak, vulnerable and tearing apart my soul.. this whole process like making love with my deep seated pain.. I want to shout I want to break through and run..run..run.. but no..I cant..my feet chained to the pole proudly standing in the soil of my mind..I cant run..just lay doen and tolerate with wide open eyes till all my senses dissolve and I transcend this sharp bone breaking pain...to enter after pain coma...no dont wake me from it..I want to rest...and I dont want to open eyes for fear of facing my own body and soul scattered in pieces around...I wont be able to arrange them once again... so let it be like this only..let me sleep...let me sleep till all these insects and ants eat me out till my last molecule and finally my helpless existence on the earth ends...for the time being...let me sleep...

4/24/12

तू येशील तेव्हा...

तू येशीलही कदाचित..
काळाच्या कुठल्यातरी बिंदूवर असेल ठरवलेली तुझी माझ्याकडे परतण्याची वेळ.
वाट पाहीन मी.. पण तू येशील तेव्हा मी असेन का रे जिवंत..?
तू येशील तोपर्यंत तग धरू शकेल का माझं कमकुवत मन..
की मोडून पडेल मी एखादं झाडं वादळात भुईसपाट व्हावं तशी..
थरथरतोय जीव आत्ताच. 
निराशेची काजळी चढू लागते मनाच्या नितळ आरश्यावर माझ्याही नकळतपणे.
तशी प्रयत्न करतेच आहे रे मी मनावर ताबा ठेवण्याचे. अगदी जागता कडक पहारच ठेवला आहे मी मनावर.
उगाच अडकू नये त्यानं कुठल्याही भुलभुल्लैयात नि गुंतू नये कुठल्याच वांझ भावनांमध्ये विनाकारण.
पण तरीही एखाद्या अनामिक क्षणी अंधाराची भुतावळ हळूहळू गर्दी करू लागते रे मनामध्ये..
मग मनही खचतं, निराशेनं ग्रस्त होऊन कोसळू लागतं गर्तेमध्ये
आणि मी पाहत राहते असहाय्यपणे..
अशी एखादी काळीकुट्ट रात्र मी कशी जागून काढते ते माझं मलाच माहित.
नाहीच कधी समजणार तुला, अश्या कित्येक रात्रींचे हल्ले मी कसे परतवून लावते.
पण मी आता थकते आहे हळूहळू.. कधीतरी हार मानावी लागेल की काय याची काळजी वाटतेय.
आणि तसं झालं ना तर त्या जखमा नाही पेलू शकणार माझं काळीज..
म्हणूनच विचार करते, तू येशील तेव्हा मी असेन का रे..?
तू येशील तोपर्यंत राहील का रे मी जिवंत मनाने..?
का भान सुटलं असेल माझं वास्तवाचं आणि गेली असेल मी जाणीवांच्या पलीकडे..!
स्वीकारू शकशील कारे तू मला तशाही अवस्थेत..? की पुन्हा एकदा नाकारून निघून जाशील कायमसाठी..?
पण..पण तू येशील तेव्हा मी असेन का रे ?

3/2/12

जाणीव

 माझ्यासोबत रहा.. माझ्यासोबत थांब...
तुझा हात हातात घ्यायचा आहे कायमसाठी...
पूर्वी एकदा पकडला होता तुझा हात, पण तो गरज म्हणून, मदतीसाठी...
खूप दुर्बल होते, अगतिक होते; तेव्हा हक्काने तुला हाक मारली आधारासाठी
आणि तूही मोकळेपणाने आलास मला सावरायला..
 नंतर त्याच हक्काने तू दूर झालास आणि मीही जाऊ दिले तुला
आत्मनिर्भर होण्यासाठी; स्वत:ला ओळखण्यासाठी..
एकटीच लढत राहिले, ढासळलेले दुवे सांधत राहिले.
आता समर्थ झाले आहे स्वत:बद्दलच्या नव्या जाणीवेने..
नव्यानंच सुरु करते आहे पुन्हा जगायला आत्मसन्मानासहित..
या सशक्त जाणीवेनं तुझा हात हातात घ्यायचा आहे
निखळ सोबतीसाठी, कुठल्याही अपेक्षेविना..प्रगाढ विश्वासानं..!!

10/15/11

नव्यानं..

    पुन्हा सारं काही समजू घेऊ पाहते आहे नव्यानं.. " आयुष्य सुंदर असतं " यावर विश्वास ठेऊ पाहते आहे पुन्हा एकदा.. एखादी छोटीशी जरी तिरीप आली उजेडाची तरी घट्ट धरून ठेवते आहे तिला, उद्याच्या प्रकाशाची आण घालत..  पुन्हा एकदा स्वत:कडे नव्याने पाहते आहे, स्वत:ला समजून घेते आहे आणि हळूहळू स्वीकारू पाहते आहे स्वत:ला सर्व खाणाखुणांसकट, चुकांसकट, दोषांसकट आणि हो, नव्यानेच जाणवलेल्या चांगुलपणासकट.. आणि प्रयत्नही चालूच आहेत स्वत:वर प्रेम करण्याचे..
    सगळंच शिकावं लागतेय रे पुन्हा एकदा.. एखाद्या खोल गर्तेतून सुदैवानं जिवंत बाहेर यावं, पण सर्वच हरवून जावं, विसरून जावं तसं काहीसं झालं आहे.
   आता पुन्हा अस्तित्वाचे सारे उरलेसुरले अवशेष गोळा करून स्वत:ला घडवायचंय.. काही तुकडे घासूनपुसून घ्यायचे तर काही तसेच...त्यातूनच नवीन घडेल काहीतरी..
   सगळंच शिकतेय नव्यानं.. म्हणजे अगदी  सकाळी जाग आल्यावर  बेडवरून  खाली  उतरताना  स्वत:च्या  पायांवर भार द्यायचा,  मग हळूहळू खोल श्वास घेत ,  थंड फरशीचा स्पर्श अनुभवत पावलं  टाकायची.. इथपासून ते भरकटणाऱ्या मनाला रट्टे देऊन ताळ्यावर आणायचं इथपर्यंत..!
    आणि मग शेवटची आणि अवघड गोष्ट म्हणजे ' तुझ्या विचारांत न हरवणं '.. तसे तुझे विचार हक्कानं ठाण मांडूनच बसलेले असतात.. त्यांना हाकलून द्यायचं म्हणजे जिवावर येतं पण करायलाच हवं ना..?? तुझ्या आठवणींचा कापूस पिंजून पिंजून ढीग पडतो. मग त्यांच्या वाती वळून मी पेटवून ठेवते त्यांना माझ्या हृदयाच्या खोबणीत.. जळत राहतात बिच्चाऱ्या रात्रनदिवस आणि मीही त्यांच्यासोबत..
     मग कधी मोकळ्या रस्त्यावर गाडी सुसाट पळवावी वाटते, खूप जोराचा वारा तोंडावर घ्यावा, कधी पाउस असला कि त्या सरींमध्ये चिंब भिजावं आणि अशा बेभान क्षणी तरी तुला विसरून जाऊन तुझ्याशिवाय जगावं असं फार फार वाटतं रे... पण शेवटी माझे सारेच प्रयत्न असफल होतात तुझ्या चिवट आठवणींपुढे...
     मग कधी आशा पल्लवित होते. तुला पण येत असेल का चुकून माझी आठवण..? तुझ्या कट्टर निर्धाराची नजर चुकवून एखादा हळवा क्षण घेऊन येतो का रे तुझ्या मनात  कधी माझी आठवण..? किंवा चुकूनच कधीतरी, एखाद्या भाववेड्या सायंकाळी तू तुझे सारेच क्षण उधळून टाकतोस कारे माझ्यासाठी..?
         बघ पुन्हा चुकले, पुन्हा तुझ्यामध्ये वाहवत गेले... तुझ्याशिवाय विचार करायलाही शिकावंच लागेल नव्यानं..!!

    
  

8/4/11

तरीही..

    हो, मला समजतेय की आता तुझं बोट धरून चालणं मला सोडायला हवं.. स्वत:च्या पायांमध्ये बळ एकटवून मी आता एकटीने चालायला हवं. मला पटतंय आणि मान्य आहे की पुन्हा पुन्हा मी तुझा आधार घेत राहिले तर पंगू होऊन राहीन मी कायमचीच..!
   म्हणूनच तुझ्यावर आणि स्वत:वर ही विश्वास ठेवून तुझा हात सोडते आहे. चालायची ताकद आहे रे माझ्यामध्ये, फक्त स्वत:वर विश्वास ठेवण्याची हिम्मत अजून होत नाहीये. त्यामुळेच तर भीती वाटते खूप तुझ्याविना चालण्याची.. तू जवळ नसलास तरी तू मनाने सोबत आहेस ही नुसती कल्पनासुध्धा खूप धीर देते. पण आता जेव्हा हीच कल्पना मला वास्तवापासून दूर नेऊ पाहत आहे, तेव्हा तूच सांग, ही कल्पना सोडून देणेच योग्य ठरेल ना..?
      हो, योग्यच आहे.. या मनाला भुलवणाऱ्या, भरकटवणाऱ्या कल्पनांचा आणि हो, तुझा ही हात आता मला सोडायलाच हवा.. तरच मी उभी राहू शकेन स्वत:च्या पायांवर..
      खूप खूप भीती वाटते रे अनिश्चिततेची, अंधाराची,  झाकोळलेल्या भविष्याची  आणि चटके देणाऱ्या  या दाहक वास्तवाची.. खूप खूप भीती वाटते रे  माझ्याच आतमध्ये वसणाऱ्या माझीच..!
      तरीही.. तरीही तुझा हात आता सोडायलाच हवा...

7/23/11

आपलं नातं

कधी वाटतं आपलं नातं
या जगाच्या मर्यादा ओलांडून पार पल्याड पोहोचलं  आहे.
काहीही झालं तरी नाही तुटायचं हे.
तू भेट, न भेट.. तरी हे नातं राहील अभंग कायमसाठी..
तू कितीही दूर असलास तरी
माझ्यासाठी असशील फक्त एका हाकेच्या अंतरावर.
जशी फुलं फुलत राहतात; कळ्या उमलतात; पाकळ्या गळतात; सुकतात.
तरी पुन्हा नव्या कळ्या जन्मतात नव्या दिमाखात; तसंच आपलं नातं..
क्षुल्लक घटनांनी, तात्पुरत्या दुराव्यानी
नाही यायची आच त्यावर...
माझा विश्वास आहे..

7/22/11

मागणं

तुझ्याशिवाय कधी कोणी नाहीचं आलं इतक्या जवळ मनाच्या..
मलाही मन आहे असं कधी कोणी विचारच केला नाही रे..
एखाद्या निर्जीव वस्तूशी करावेत व्यवहार, तसंच सर्वांचं माझ्याशी वागणं..
वस्तूला कुठे असतो रे हक्क तिचा उपभोग घेणाऱ्याला नकार देण्याचा..?
कधी नाही म्हणू शकले नाही आणि म्हणूनच वापरली गेले वस्तूसारखी..
विसरूनच गेले होते मी माझे अस्तित्व..
आणि तू आलास..
तू आलास आणि थेट उतरलास माझ्या काळजात..
तूच तर फक्त जाणू शकला माझं जीवंतपण..
तुझेच डोळे तर फक्त पाहू शकले ना मला आरपार नितळपणे.
तुझं भक्कम आधार मिळाला म्हणून तर पाहू शकले स्वत:कडेच कुठल्याही शंकेविना.
आणि पहिल्यांदाच जाणीव झाली आत्मसन्मानाची.
तूच जागवलं आत्मभान माझ्या हरवलेल्या नजरेमध्ये
आणि हात देऊन सावरलं मला आत्मघाताच्या वाटेवरून...
आता मागणी  होते आहे हक्काची..
प्रेमाचा  हक्क..
तुझ्याशिवाय कोणाकडे रे मागणार  मी..?
देशील..?

येशील?

तुला काय वाटलं, असं सहजासहजी चुकवून जाशील मला.?
आणि कितीही दूर गेलास तरी मला विसरू शकशील..? अशक्य..!
बोलायचं नसेल तर नको बोलूस. मीही नाही बोलणार.
तुझं प्रेम खोल खोल दडवून टाकेन, अगदी काळजाच्या तळाशी...
मग एके दिवशी मोरपिशीची लेखणी घेऊन बसेन आणि
अन्थारेण थोडंसं निळंशार आभाळ अंगणामध्ये..
मग माझ्या काळजाच्या डोहामध्ये बुडवीन लेखणीचं टोक
आणि  लिहीत राहीन तुझं नाव आभाळाच्या तुकड्यावर...
मग ती माझी काळीजभरली साद  जिवंत होईल मोरपिशीच्या स्पर्शानं,
चैतन्यानं भारलेली, आरूढ होईल वाऱ्यावर
आणि पसरत राहील दाही दिशांत..
मग तर यावंच लागेल तुला.. हो यावंच लागेल..
 येशील..?

रंगहीन आकारहीन

मी एक रंगहीन आकारहीन अस्तित्व..निरभ्र आभाळाचा तुटून पडलेला रिकामा कोपरा..
आटून गेलं आहे पाणी की कधीच झालंच नव्हतं गर्भारपण पाण्याचं माझ्या या आभाळ तुकड्याच्या कुशीमध्ये, काय माहीत..
म्हणून मी शुष्क..कोरडा अभ्र तुकडा..
ना कोणाला काही देण्याची कुवत, ना कोणाकडे काही मागण्याची इच्छा..
कशाला कोणी फिरकेल अशा हीनदीन अस्तित्वाकडे...?
आणि जरी कोणी चुकून आलेच, तरी जाणीवतरी होईल का कोणाला माझ्या शुभ्र फटफटीत अस्तित्वाची.. 
मी एक रंगहीन आकारहीन.. आभाळाचा रिकामा निष्प्राण तुकडा..
तुझा नाहीच दोष की तुला निघून जावे वाटले..तुझा नाहीच दोष की तुला परतून यावे नाही वाटले.
जिथे काही अंकुरण्याची आशाच नाही तिथे कशाला कोवळे बीज पेरायचे.,?
येणाऱ्या क्षणाचाही ज्याला भरवसा नाही, असं माझं भग्न अस्तित्व कशी करणार तुझी साथ आयुष्यभरासाठी..?
छे छे मी नाही बुवा इतकी स्वार्थी, तुझ्याकडून कसल्याही भव्यदिव्य अपेक्षा ठेवेन.
तू बापडा जा खुशाल तुझ्या स्वप्नांच्या शोधात तुझ्या वाटेवर.
चुकून इथे थांबलास तर इथली  शुष्क भयाण निराशा वेढून टाकेल तुलाही..
जा  चालता हो. 

मी जगेन..

      मी जगेन. मी यातूनही तरून जाईन. या सत्यातून पार होऊनही मी जगेन. अगदी काहीही झाले तरी..! कितीही काळ हा अंधार  असाच खेळ खेळत राहिला, तरी मी धीर धरेन आणि पाहत राहीन वाट नव्या प्रकाशाची... तोवर माझ्या जीवाला मीच होईन आधार;  मीच माझं सांत्वन करेन आणि जीवाला आंजारून गोंजारून, चुचकारून सोसायला लावेन ही धग. उघड्या डोळ्यांनी सारं पाहीन आणि तरीही सांडू देणार नाही एकही अश्रू दु:खाचा.. तरून जाईन मी या साऱ्यातून.. हीच असेल माझी साधना, माझी तपश्चर्या. जळून जाऊ  दे सारे भोग... होऊ दे राख साऱ्या इच्छा आकांक्षांची.. सोसेन मी धग आणि तरीही जगेन.
   हे खरे आहे की तुझ्या वाटेकडे डोळे लागून राहतात कधीतरी, वाट पाहते मी तुझी कधीतरी... संध्याकाळचे हुरहूर लावणारे काही क्षण हे तुझ्याच नावे केले आहेत कायमसाठी... पण तू जर आलाच नाहीस कधी तर मी कोलमडून जाईन असे मात्र मुळीच नाही.. तू येणार की नाही माहीत नाही आणि आलासच तरी परत जाणार नाहीस याची काय शाश्वती..  म्हणूनच जरी तुझी वाट पाहते तरी वेड्या आशेने हळवी होत नाही तुझ्यासाठी.  तू आलास तर ठीकच आहे, पण नाही आलास तरी..  तरीसुध्धा मी जगेन तुझ्या दाहक विरहासकट..!
    म्हणूनच तू यावं असं बंधन नाही आणि चुकून आलास तरी थांबावंच अशीही सक्ती नाही..!
    कारण आता जगायचं ठरवलं आहे मी काहीही झालं तरी.. अगदी काहीही झालं तरी..!

7/21/11

शिक्षा

चुकीची शिक्षा किती किती अघोरी..
जणू काही नियतीनं सारेच दरवाजे बंद केले आहेत माझ्यासाठी.
सारेच हक्क नाकारले गेले आहेत मला..
हक्क, आनंदाचा, स्वातंत्र्याचा, स्वप्नांचा, प्रेमाचा, प्रकाशाचा..
जीव गपगार होऊन पडला आहे या कोंदट वातावरणात..
श्वास घेणंही अवघड होत चाललंय क्षणोक्षणी..
 जिवंत राहील का मी.. आणि चुकूनमाकून वाचलाच जीव या साऱ्यातून पार होऊनही;
 तरी प्रकाशाची दारं होतील का खुली माझ्यासाठी पुन्हा एकदा..?
  उद्याचा सूर्योदय येईल का घेऊन माझ्याही आयुष्यात नवी पहाट..?
 मिळेल का मला हक्क माझं आयुष्य माझ्या मर्जीनं जगण्याचा, पुन्हा एकदा..?