Welcome...

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..
Showing posts with label ललित. Show all posts
Showing posts with label ललित. Show all posts

4/11/24

रत्नागिरी

मीराच्या प्रवासातील पहिला मुक्काम सांगली होता. ती सांगली सोडते आणि प्रवास पुढे सुरू होतो, तेव्हा पुढे तिला काही बऱ्यावाईट गोष्टींना तोंड द्यावं लागणार होतं. बरेच धक्के पचवावे लागणार होते. हे लेखक म्हणून मला माहिती असल्यानं, पुढे कोणतं गाव निवडावं या विचारासरशी डोक्यात कोकण आलं.
कोकण का...तर अर्थात समुद्र.....
मीरेचा कादंबरीतील प्रवास हा फक्त बाह्य नाही, तर अर्थात आंतरिकसुद्धा आहे. आंतरिक प्रवासात प्रत्येकच व्यक्तीला, मग कोणतेही जेंडर असो, एका टप्प्यावर अस्वस्थतेचा, एकटेपणाचा शाप हा भोगावाच लागतो. ही घालमेल, तडफड अनुभवत असताना, मी स्वतः नेहमी निसर्गाचा आधार घेते. 
2015 मध्ये खूप अस्वस्थतेतून जात असताना, कोकणात पहिल्यांदाच मी एकटीने ट्रीप मारली होती. स्वारगेटला गेले. समोर चिपळूणची बस दिसली, बसले. मग खेड, दापोली, हर्णे, आंजर्ले इथे कधी बसने तर कधी चालत एकटीनेच फिरलेले. हर्णेच्या lighthouse खाली दुपारी झोपले होते. आंजर्ल्याच्या रिकाम्या समुद्र किनाऱ्यावर स्वतःला समुद्राच्या स्वाधीन केलेलं. वाटलेलं, समुद्र मनाच्या सगळ्या जखमा धुवून टाकतो. समुद्राच्या लाटा आपल्याला अंतरबाह्य निर्मळ करून टाकतात. समुद्र माणसाच्या अपुरेपणावर पांघरून घालत, मायेने पोटाशी धरतो.
समुद्राची हीच साथ मला मीरेला अनुभवायला द्यायची होती.
मग 2018 मध्ये कादंबरी लिहायची ठरवले तेव्हा नोकरीतून बिनपगारी रजा घेऊन दहा एक दिवस रत्नागिरीला मुक्काम ठोकला. दिवसाच्या वेगवेगळ्या क्षणी वेगवेगळ्या रुपातला समुद्र अनुभवला. समुद्रकिनारीच रिसॉर्टमध्ये राहून जे जे मनात येईल ते लिहित राहिले...तिथेच मीराची नवीन रूपं सापडली. तिची मल्हारबद्दलची आसक्ती. प्रेम. वाट पाहणं. एकटेपणातील भ्रम. सगळं.
कादंबरीत आलेलं रत्नागिरीजवळचं गाव सापडलं. तिथे जाण्याचा आतला आणि बाहेरचा रस्ता सापडला. 
समुद्र भरभरून देतो. आपली जितकी कुवत असेल तितकं घ्यावं. त्याच्यासारखीच काही माणसं पण असतात. प्रेम, माया, मैत्र, सोबत, सगळं सगळं देणारी या जगात खूप माणसे आहेत...आपल्याला आपलं मन शांत करत, ते समजून घेत, स्वीकारता आलं पाहिजे. 
जोपर्यंत ते जमत नाही, तोपर्यंत स्वतः च निर्माण केलेल्या मनाच्या वावटळीमध्ये आपणच भिरभिरत राहतो. मग मनाची भुणभुण थांबवून, मन बथ्थड व्हावे यासाठी एकतर दारू पीत राहायची, चंगळवादी जगत निब्बर व्हायचं, नाहीतर सतत जगावरच कचकच करत राहायची. 
म्हणून वाटतं, आयुष्यात प्रत्येकाने थोडा ठहराव आणावा. Pause घ्यावा. बसावं निसर्गासोबत, स्वतःला समजून घेत. या कादंबरीच्या आत आणि बाहेरही तो ठहराव मला समुद्र आणि हिमालय देत राहतात. 
Between विहिरीची मुलगी मधील सगळी पात्रे काल्पनिक आहेत. फक्त एकच पात्र अगदी खरंखुरं आहे. ते पात्र मला रत्नागिरीच्या रिसोर्टमध्ये भेटलेलं. ते म्हणजे जर्मन शेफर्ड प्रजातीची कुत्री डॉली. माझ्या तिथल्या मुक्कामात ती माझ्या मागे मागेच असायची. ती जशी खरी होती,  मी अगदी तशीच कादंबरीत,तिच्या चाळ्यांसकट लिहीली आहे. लॅपटॉपमध्ये जुने फोटो चाळताना तिचे फोटो सापडले. सोबत डकवते आहे.

3/16/24

सांगली

 विहिरीची मुलगी या कादंबरीतील मीरेच्या प्रवासाची सुरुवात सांगलीपासून होते. याचं कारण सांगलीनं माझ्या मनात कायमसाठी हक्काचं स्थान मिळवलं आहे. MBBS नंतर माझे DGO हे PG झाल्यानंतर, मी 3 महिने सांगलीत होते. 2014 साली बहुतेक. सांगलीतील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. हेमंत लिमये सर यांना गडचिरोलीतील शस्त्रक्रिया शिबिरात कमी वेळात, कौशल्यपूर्ण सर्जरी करताना मी पाहिलं होतं. तेव्हाच ठरवलेलं की सरांकडे जाऊन गर्भपिशवी काढण्याची शस्त्रक्रिया म्हणजेच Hysterectomy, सरांच्या टेक्निकने शिकून घ्यायची. त्यासाठी मग तीन महिने मी सांगलीत मुक्काम ठोकलेला. सांगलीला शिकलेल्या शस्त्रक्रिया, पुढे जाऊन सास्तूर या ठिकाणी नियमित केल्याने मीही त्यात expert झाले. कारण त्या भूकंपग्रस्त भागात गरीब रुग्णांना अगदी माफक दरात NGO ने चालवलेल्या स्पर्श या जिल्हा रुग्णालयात चांगल्या सुविधा मिळायच्या. त्यामुळे गरजू रुग्णांची गर्दी असायची. पुढे छत्तीसगडला माझ्या रुग्णांचे जीव वाचायला ते कौशल्य खूप जास्त उपयोगी आले, तेव्हा मला लिमये सरांच्या प्रती कृतज्ञता वाटलेली. छत्तीसगड सोडताना, तिथल्या इतर स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांना ते कौशल्य शिकवून मला समाधान वाटले. सांगलीत आणि जयसिंगपूर, शिराळा अशा आजूबाजूच्या गावांत जाऊन शस्त्रक्रिया चालायच्या, त्यामुळे फिरणं व्हायचं. कुठं काय चांगलं खायला मिळतं हे सर आणि सोबतच्या सहकाऱ्यांमुळे डेमोसकट माहिती व्हायचं. काम संपल्यावर संध्याकाळी मी पूर्ण रिकामी असायचे. मग सायकल काढून भटकायला जायचे. कधी सांगलीतील नदीचा घाट तर अनेकवेळा हरिपूरला एकटीने जाऊन बसायचे. सुंदर प्रसन्न जागा पाहून वाटायचं की कोणी बॉयफ्रेंड असता तर त्याला इकडे तिकडे फिरवलं असतं. 2017 मध्ये कादंबरी लेखन सुरु झालं तेव्हा मीराचा पहिला मुक्काम कुठे पडावा या प्रश्नासरशी सांगली आठवलं आणि ते लिहिलं गेलं. सोबतच आला नायक मल्हार. मला आयुष्यात कधीही न भेटलेला. पण हे पात्र लिहिताना मीच त्याच्या प्रेमात पडत गेले. असा मल्हार खऱ्या वास्तवात नाहीये हे स्विकारायला जडच गेलं. काही पात्रं लेखकाचे बोलणे आज्ञाधारकपणे पाळतात, काही लेखकाला पारच धुडकावून लावतात. तर काही लेखकालाच मोहात पाडतात. Anywes तर मागच्या आठवड्यात कोल्हापूरला असताना, वाट वाकडी करून, मीरा मल्हारचे आवडते ठिकाण हरीपूर इथे जायचा मोह टाळता आला नाहीये. ती जागा आता खूप बदलली आहे, पण तिथल्या माझ्या आठवणी अजून तशाच जपलेल्या आहेत. इथे दोन नद्यांचा संगम, त्यांच्या वेगळ्या उठून दिसणाऱ्या प्रवाहांसोबत पहायला मिळतो. Between कादंबरी वाचून एका मित्राचा आज फोन आला. त्याच्या वाईट काळात साथ दिलेल्या प्रेयसीबद्दल बोलताना तो म्हणाला की "ती माझ्या आयुष्यात मल्हारसारखी आली." प्रेमाची भाषा अशी स्थळ काळ लिंग ओलांडून पोहोचते. कादंबरी घेण्यासाठी संपर्क New Era PublishingHouse 9373553349

3/1/24

नवीन कादंबरी

माझी नवीन येणारी कादंबरी कशाबद्दल आहे ? 
तर एका बावीस तेवीस वर्षाच्या, मीरा नावाच्या बंडखोर मुलीची ही कहाणी. या वयात एक विश्वास असतो की मी म्हणेल ते बरोबर, माझ्या आयुष्याचा निर्णय मीच घेणार. तारुण्याच्या उत्साहात आपण आयुष्य घडवायला पाहतो. सगळं व्यवस्थित चाललं आहे म्हणतानाच अचानक सगळे गड किल्ले कोसळतात आणि सोबत आपणही भुइसपाट होऊन जातो. हे कोसळणे प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी घडतेच. पण या पडझडीनंतर पुन्हा स्वतःला उभं करताना, कोणती मूल्यव्यवस्था कामी येते, कोण आपल्याला आधार देतं आणि जगाला सामोरं जात असतानाच स्वतःला ही पुन्हा एकवार कसं समर्थ बनवायचं, अशा प्रकारची ही एका तरुणीची कथा आहे. तरुणीची यासाठी, कारण आपल्या समाजात पुरुष आणि स्त्री हा भेदभाव आजही पाहायला मिळतो. पुरुषांना जे अनेक प्रकारचे स्वातंत्र्य सहज मिळते, स्त्रीची मात्र प्रत्येक ठिकाणी अडवणूक केली जाते. कधी इतर लोक तिला बंधने घालतात तर कधी ती स्वतः च हरवलेल्या आत्मविश्वासामुळे स्वतः ला गमावून बसते. तर भेदभाव करणारी ही समाजव्यवस्था समजून घेत, तिच्यासमोर एक मुलगी कशी स्वतःचे विश्व घडवू शकते, या आत्मशोधाची ही कादंबरी आहे.  अनेक वर्षे पुरुष त्यांच्या नजरेतून आपल्याला स्त्रियांची कहाणी सांगत राहिले. पण या पुस्तकात मात्र स्वतः स्त्रीच्या नजरेतून नायिकेची कहाणी सांगितली आहे. तिच्या मनासकट आणि शरीरासकटसुद्धा. ज्या गोष्टी बोलायच्या नाहीत हे सांगितले जाते, त्याच गोष्टी बोलून, बदल घडवून आणायची आशा आहे.

या कादंबरीमध्ये मी या ब्लॉग वरचे अनेक तुकडे वापरले आहेत. कादंबरीमधील नायिका मीरा ही ब्लॉग लिहीत असते. फक्त ब्लॉगचे नाव मातीची मुलगी ऐवजी, विहिरीची मुलगी असे आहे. 

कादंबरीचे नाव - विहिरीची मुलगी.
प्रकाशक - New Era Publication, Pune
पृष्ठे 275
येत्या आठवडाभरात कादंबरी उपलब्ध होईल. 

4/9/23

प्रश्न बनून राहिलेल्या मुली

(पूर्वप्रसिद्धी साप्ताहिक साधना) तीन प्रश्न भेटले आहेत आत्तापर्यंत निरागस हास्य चेहऱ्यावर लेवून. एक – सप्टेंबर २०१६ उत्तराखंडमध्ये मी ‘आरोही’ या समाजसेवी संस्थेमध्ये काही दिवसांकरिता स्त्रीरोगतज्ञ म्हणून काम करण्याकरिता गेले होते. उत्तराखंडच्या, नैनिताल जिल्ह्यातील कुमाऊ भागात पहाडी गावांत, फिरत्या दवाखान्यातर्फे गर्भवती महिलांची तपासणी व उपचार करणे, नंतरच्या काळात तेथील दाईना बाळंतपणाचे प्रशिक्षण देणे, अशी जबाबदारी माझ्यावर होती. शेवटचे दहा दिवस मेडिकल ट्रेक होता. आम्ही चार डॉक्टर्स, चार स्वयंसेवक, एक फोटोग्राफर व आमचे लीडर पंकज सर, जे वर्षातून दोन वेळा स्व-खर्चाने हा ट्रेक आयोजित करतात, अशी आमची टीम जमली होती. बालेश्वर या गावापासून आणखी पुढे जाऊन एका पहाडावरील रिसोर्टमधे आम्ही पहिल्या रात्री मुक्काम केला. रोज सकाळी सातलाच ट्रेक सुरु करायचा, अकरापर्यंत गावात पोहचायचे, तिथे कॅम्प लावून रुग्ण तपासणी करायची. छोटे गाव असेल तर जेवून आणखी पुढच्या गावी जाऊन तिथे पुन्हा कॅम्प लावायचा व मग मुक्कामाच्या ठिकाणी जायचे असा दिनक्रम होता. कधी गाव खूप दूरवर असले तर मग एकाच गावी जाणे होयचे. कधी गावातील शाळेत सर्व वयोगटातील मुला-मुलींच्या आरोग्यतपासणीसाठी जायचो. आम्ही डॉक्टर्स आरोग्य तपासणी करत असताना, बाकी स्वयंसेवक मुलांसाठी चित्रकला, वेगवेगळे खेळ असे प्रकार घ्यायचे. खूप मजा यायची आणि ट्रेकिंगने थकायलाही होऊन जायचे. रात्री थकून भागून मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायचो. पहाड चढताना प्रत्येकाची चालण्याची गती वेगवेगळी असायची. कोणी वेगाने जायचे, तर कोणी संथ. माझा हा पहिलाच हिमालयीन ट्रेक असल्याने आणि इतक्या उंचीवरच्या ट्रेकिंगची सवय नसल्याने मी सर्वात मागे असायचे. अशीच एकेदिवशी शाळेतील तपासणीनंतर मी एकटीच पहाड उतरणीच्या रस्त्याला लागले होते. शाळा सुटली होती. सर्व पोरे पोरीही त्याच रस्त्याने निघाले होते. पहाड उतरून गेले की त्यांचे गाव होते. आमचाही मुक्काम तिथेच होता. त्यातील एक चुणचुणीत, आठ वर्षांची पोट्टी माझ्यासोबत चालू लागली. आमची मग दोस्ती झाली. मी दमले आहे, हे लक्षात येऊन ती व तिच्या आणखी इटुकल्या मैत्रिणी माझी पाठीवरची bag मागू लागल्या. “दीदी, bag हमे देदो, आप थक जाओगे.” मला हसू आले आणि कौतुक पण वाटले त्यांच्या काळजीचे. खाली उतरून गेल्यावर अक्रोडाची दोन-तीन मोठी झाडे लागली. सर्व पोरे-पोरी अक्रोड वेचू लागले. शोधून, दगडाने फोडून खाऊ लागले. माझी छोटी मैत्रीणही त्यात सामील झाली. मी उभी राहून कौतुकाने ते पाहत होते. तर ती पोरगी सारे अक्रोड गोळा करून मलाच आणून देऊ लागली. मी नको म्हणतेय तरी जबरदस्तीने माझ्या bag मध्ये टाकू लागली. बाकीच्या पोरांनाही मग मला अक्रोड द्यायला म्हणून रागावू लागली. अशारितीने भरपूर सारे अक्रोड गोळा झाले माझ्याकडे. मग आम्ही दोघी परत रस्त्याला लागलो. तिचे घर लागले, तसे मी तिला म्हटले, “तू दप्तर ठेऊन ये. आपण फिरायला जाऊ.” मीही आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचले. थंड पाण्याने आंघोळ करून ताजीतवानी झाले. तेवढ्यात ती आलीच मला शोधत. मग आम्ही दोघीही गावात फेरफटका मारायला गेलो. एक लहानसे दुकान दिसले. तिच्या प्रेमाखातर मला तिला काहीतरी देऊ वाटत होते. त्या दुकानातून टूथपेस्ट, ब्रश, तेल, कंगवा, साबण अशा तिला रोज लागणाऱ्या वस्तू, काही बिस्किटे, थोडे चॉकलेट असे सामान तिला घेऊन दिले. ती खुश दिसली. मलाही तिचा आनंद पाहून समाधान वाटले. मग तिला मी घरी सोडवायला गेले. तिच्या घरात काही अक्रोड होते, तिला तेही मला द्यायची इच्छा होती, म्हणून ती पळत घरात शिरली. मी बाहेरच अंगणात थांबले. ती अक्रोड घेऊन बाहेर आली. तिच्यामागे आणखी लहान लहान मुले आली. तिचे अक्रोड माझ्या bag मधे ठेवत मी तिला विचारले, “कोण कोण आहे तुझ्या घरी ?” तेव्हा कळले, ती सर्वात मोठी मुलगी घरातील. तिला २ छोट्या बहिणी आणि २ छोटे भाऊ. असे ते पाच लोक. तिच्या मागे दूरवर उभे राहून, फाटक्या कपड्यातले ते बहिण भाऊ माझ्याकडे कौतुकाने पाहत होते. मी दिलेल्या सामानाची पिशवी घेऊन ती हसतच तिच्या भावंडाकडे गेली. त्या पिशवीत मात्र एकच ब्रश, एकच साबण होता. ते तिला स्वतःला तरी किती दिवस पुरणार होते ? तेथून परत येताना, त्या फाटक्या कपड्यातल्या भावंडांचे दृश्य माझ्या डोळ्यासमोरून हटत नव्हते. तेव्हा मला माझ्या त्या मुलीला त्या वस्तू घेऊन देण्यातील क्षणभंगुरता लक्षात आली. त्या रात्री, त्या पहाडी गावामध्ये, मी डायरीत लिहित राहिले, “पहाडातील या सर्वात दुर्लक्षित राहिलेल्या मुलीसाठी काय करू शकते मी ? दर वर्षी इथे असेच ट्रेकिंग करत यावे की सर्व सोडून कायमचे येऊन रहावे इथे ? की वर्षातील एक महिना नित्य नेमाने इथे येत जाऊन काहीतरी काम करावे या मुलींसाठी ? काय करू शकते मी या मुलीसाठी ?” हसऱ्या चेहऱ्याने मला निरोप देणारी ती अक्रोडवाली मुलगी कायमची प्रश्न बनून रुतून बसली आहे माझ्या मनात आणि आठवत राहते दररोज. दोन - फेब्रुवारी २०१८ पुणे रेल्वे स्टेशनवर मी वैतागून उभी होते. उद्यान एक्स्प्रेसची पावणे अकराची वेळ होती आणि ट्रेन दोन तास उशिराने येणार होती. त्या दोन तासात दमायला झाले वाट बघून. शेवटी एकदाची एक वाजता ट्रेन येण्याची सूचना आली व bag घेऊन मी फलाटावर उभी राहिले रूळाकडे डोळे लावून. एक भिकारीण, तिच्या दोन-तीन पोरा-टोरांसोबत भीक मागत माझ्यासमोर आली. भिकाऱ्यांना भीक द्यावी की नको या प्रश्नावर मनात खूप काथ्याकुट करूनही अजून त्याचे निश्चित उत्तर मला सापडलेले नाही. त्यामुळे ते काम मी मूडवर सोपवते. पोरे असलेली बाई, म्हणून त्या बाईच्या हातावर काही पैसे टेकवले. ती पुढे निघून गेली. पण तिच्या सोबतची फाटक्या मळक्या कपड्यातील पोर माझ्यासमोरच थांबली. “मुझे भी दो.” ट्रेन येण्याकडे लक्ष असणाऱ्या माझी चिडचिड झाली, “आगे जाव.” मी रागाने तिच्याकडे पाहत बोलले. तिने हट्टाने मान मुरडून, “उंहू” केले. ती सहा-सात वर्षे वयाची शेंबडी पोर पाहून मी विरघळले. मनात विचार आला, माझा भाचा जेव्हा काही मागतो, तेव्हा मी लाडाने त्याला देते. ही सुधा तर छोटी पोरच आहे. इतक्या कोवळ्या जीवाला मी भिकारी या चष्म्यातून पाहून हिडीस फिडीस करणे योग्य आहे का ? मग सावकाशपणे मी पर्स उघडली. चिक्कीचे पुडे ठेवलेले होते, ते तिला देऊन टाकले. खुशीने ते घेऊन ती पुढे गेली. पाच मिनिटांनी मी पुन्हा तिच्याकडे पहिले. दूरवर गेलेली ती अजूनही तो पुडा दाताने उघडायचा प्रयत्न करत होती आणि दुरूनही माझ्याकडे पाहत होती. मी विचारात पडले. समाजात अशा स्टेशनवर फिरणाऱ्या, बालपण उपभोगण्याऐवजी भिक मागत फिरणाऱ्या या मुलींप्रती माझी काय जबाबदारी आहे ? मीही हिच्या या परिस्थितीला, हिच्या ‘भिकारी असण्याला’ समाजाचा एक भाग म्हणून काही अंशी तरी नक्कीच जबाबदार आहे. हिच्यासाठी मी काय करू शकते ? असा हा रेल्वे फलाटावर भेटलेला शेंबडा आणि हट्टी प्रश्न. त्याला हुसकावले तरी ‘उंहू’ करत बसून राहतो मानगुटीवर. तीन. कुटरु अनाथालय. मार्च, २०१८. छत्तीसगड. बिजापूर जिल्हा. भैरमगड प्रभाग. कुटरु खेडे. त्यातील पंचशील नावाचा अनाथाश्रम. दहा एक वर्षांपूर्वी झालेल्या नक्षलवाद्यानविरुद्ध आदिवासींनी केलेल्या सशस्त्र लढ्यामध्ये मारल्या गेलेल्या आदिवासींच्या अनाथ मुला-मुलींसाठी ‘मधुकर राव’ या आदिवासी नेत्याने बनवलेला हा आश्रम. रविवारी या गावात मी तेथील रूग्णालयामधे गर्भवती महिलांच्या तपासणीसाठी गेले की मुलींच्या आश्रमात चक्कर होतेच. अधीक्षकांची विनवणी असते की तेथूनच काही अंतरावर असलेल्या मुलांच्या आश्रमालाही भेट द्या. पण मुलींकडून पायच निघत नाही आणि अजून मी मुलांच्या आश्रमाकडे फिरकलेही नाही. माझा मुंबईवरून मित्र आला होता मकरंद दीक्षित, त्याने माझ्या या मुलींना ओरिगामी शिकवले. दोनवेळा कुटरुला गेला, दोन्ही वेळी मुलींच्याच आश्रमात. मुलांकडे नाहीच. मुली जीवच लावतात तितका. मधे महिनाभर रजा घेऊन काही कामानिमित्त मी महाराष्ट्रात, गुजारतमधे गेलेले. परत आल्यावर बिजापुरच्या जिल्हा रुग्णालयातच व्यस्त. त्यामुळे सलग दीड महिना जाणेच झाले नाही आश्रमात मुलींकडे. परवा होळी झाली, सारेजण रंग खेळले. मी मात्र चिंताग्रस्त. डोक्यात नुसती चिंता, तणाव. खेळूच वाटले नाहीत रंग. आपल्याला कोणीच नाही अशा एकटेपणाच्या विचित्र जाणीवेने पुरे घेरून टाकले होते. यावर्षीची होळी बिनारंगांची गेली म्हणून अजून नाराजी. मुलींची आठवण आली म्हणून मधुकर रावांना फोन केला की मी या रविवारी येते तिकडे म्हणून. आज गेले तर मुली खुशीने धावतच आल्या. येऊन, प्रणाम म्हणत वाकून पायाला नमस्कार. मी नको नको म्हणेपर्यत वाकल्यासुधा. बाकीच्यांना म्हटले, “झुको मत. गले लगो.” मग गळाभेट झाली. पाहिले तर मी येणार म्हणून मुलींनी आज पुन्हा एकदा रंग खेळायची पूर्ण तयारी करून ठेवलेली. कपाळावर ‘टीका’ लावायला ताटात रंग काढलेले, पाण्याने बादल्या भरून ठेवलेल्या. “आज दीदी के साथ रंग खेलना है” म्हणत कोणी अंघोळी पण नव्हत्या केलेल्या. मी आश्चर्याने सर्दच ! मनात रिकाम्या हाताने आल्याची खंत, गडबडीत मिठाई आणायची विसरूनच गेलेले. मग मुलींना, त्याच्या तरुण उत्साही शिक्षिकांना हळूहळू शांत केले. म्हटले, अजून दोन दिवसांनी रंगपंचमी येते आहे, तेव्हा मी रुग्णालयाचे काम संपवून दुपारी येईन, आपण मिठाई खाऊ, कोल्ड्रिंक पिऊ, मग रंग खेळू, मस्त गाणे लावून साऱ्याजणी नाचूया रात्र होईपर्यंत. रात्री मी इथेच राहीन. पकोडे करू रात्री. असा सर्व कार्यक्रम ठरवला, तेव्हा कुठे मग सारे शांत झाले. माझे मन आनंदाने भरून आले. हे वर्ष अंगाला रंग लागला नाही, म्हणून खंतावले होते मी. पण या वेड्या मुलींनी माझी तीही हौस भागवली, या अनाथ मुली मुक्त हस्ताने प्रेम देताहेत मला. त्यांचा रंग खेळून झालाय परवाच, पण माझ्यासाठी मधुकर राव पुन्हा एकदा परवानगी देत आहेत मुलींना रंग खेळायला. खूप कृतज्ञ वाटले मधुकर राव आणि या मुलींप्रती. बाहेर ऊन असल्याने आम्ही हॉलमधेच मोठ्ठे रिंगण करून बसलो होतो. परीक्षा चालू असल्याने १०-१२ वीच्या मोठ्या मुली अभ्यास करत होत्या. आम्ही बाकी सारे मग बैठे खेळ खेळलो. खेळताना नियम मोडले जात होते, चीटिंग चालू होती आणि मला गम्मत वाटत होती, त्यांच्यासोबत पुन्हा लहान होण्याची. एक सात वर्षाची मुलगी पळायला उठली आणि तिचा एका बाजूचा पूर्ण फाटलेला फ्रॉक मला दिसला. मनात कुठेतरी हलले. त्यांना खेळण्यात सोडून मी उठून त्यांच्या शिक्षिकेकडे गेले, किती कपडे मिळतात, कोण देते वगैरे. “बच्चे है, तो खेलते खेलते, फट जाते है कपडे.” बरोबरच होते ते. त्या चिमुकल्या अनाथ मुलींना कसे कळावे की मिळणारे अपुरे कपडे नीट जपून वापरावेत म्हणून. मनात आले, होळीनिमित्त त्या सर्वाना कपडे घेऊन द्यावेत. पुन्हा मनात तोच विचार, तू घेऊन दिलेला एक एक कपडा किती दिवस पुरणार आहे त्यांना ? येताना त्यांना विचारले, “कौनसी मिठाई लावू ?” एकीने हक्काने सांगितले, “दीदी, गुलाब जामून लावो, मुझे बहोत पसंद है.” म्हटले, “ठीक है.” सर्वांचा निरोप घेऊन बिजापुरला जायला परत निघते मी, मनात रंगपंचमीचा कार्यक्रम आखत. त्यातील एक नऊ वर्षाची मुलगी मला फार आवडते, सरिता. नेहमी मी गेले की पाणी आणून देणे, मला सर्व फिरवून दाखवणे, फोटो काढणे, अशी कामे करणारी चुणचुणीत मुलगी, शांत समंजस. मनात येते, मी हिला दत्तक घेऊ शकते का ? पण हिला इथून, तिच्या जन्म स्थळापासून दूर महाराष्ट्रात नेणे योग्य होईल का ? मी तिला खरीखुरी माया देऊ शकेन का ? की नाहीतर मीच कायमसाठी राहून जावे इथे कुटरुमधे या मुलींसोबत. पण मी इतकी समर्थ आहे का, इतका मोठा निर्णय निभवायला? डोक्यात नुसते प्रश्न. मुलींचे मिळणारे भरभरून प्रेम, माझ्या एकटेपणाला पळवून लावणारे. साऱ्या जगावर नाराज होऊन अंगाला रंग न लावून घेणारी मी त्यांच्या प्रेमाच्या रंगात अंतर्बाह्य रंगून जाते नकळतपणे. अजूनही मी फक्त घेतच आहे त्यांच्याकडून. ते त्यांना परत कशी देऊ ? या सर्वाची परतफेड कशी करायची ? त्यांच्यासाठी मी काय करू शकते ? हा तिसरा प्रश्न.

3/29/23

“वादळात चालताना तू माझा रे सांगाती..”

(पूर्व प्रसिद्धी चतुरंग, पुरवणी लोकसत्ता) घरातून बाहेर पाय ठेवल्यापासून विविध ठिकाणी, विविध क्षेत्रांत पुरुषांचे इतके वाईट अनुभव येत राहतात, की कधीकधी मग सर्वांचीच भीती वाटू लागते, चांगुलपणावरचा विश्वास संपू लागतो. काम करण्याची उमेद मावळते. मन निराश होऊ लागते. अशावेळी प्रत्येकीच्याच आयुष्यात असे काही खास, जवळचे पुरुष वेगवेगळ्या रुपात असतात, की ज्यांच्यामुळे पुन्हा आत्मविश्वास येतो, स्वतःला रिचार्ज करण्याचे जणू ही उर्जाकेंद्रे असतात. थकून यांच्याकडे जावे, यांनी पाठीवर हात ठेवून बळ द्यावे आणि आपण पुन्हा झेप घ्यायला तयार व्हावे. मुलीच्या आयुष्यातील सर्वात पहिला आणि सर्वात जवळचा पुरुष म्हणजे वडील. माझ्या आयुष्याची सुरुवातीची वर्षे त्याच्याशी वाद घालण्यात, बंड करण्यात गेली. वाढत्या शाळकरी वयात मग त्यांचे वैज्ञानिक प्रयोग शिकवणे, नवीन गोष्टी शिकायला, प्रयोग करायला प्रोत्साहन देणे, यातून आपले वडील कुठेतरी इतर वडील लोकांपेक्षा वेगळे आहेत, हे जाणवले आणि थोडासा राग निवळला. वेगवेगळ्या गावी, विज्ञानप्रयोग प्रदर्शनांसाठी हौसेने ते घेऊन जायचे, कधी पुण्याला, कधी महाडला, कधी मुंबईला, लहानपणी त्या सर्वाचे फार अप्रूप वाटायचे. असेच दहावीमध्ये एकदा राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेसाठी पपा मला सोलापूरला घेऊन गेलेले आणि परीक्षा हॉलमध्ये जायच्या आधीच अचानक मला मासिक पाळी सुरु झाली. तेथील गलिच्छ स्वच्छतागृहातून मी तशीच रडत बाहेर आले, शरमेने हळू आवाजात पपांना सांगितले. असे काही त्यांना सांगण्याचा आयुष्यातील पहिलाच प्रसंग, मला वाटले, परीक्षा सोडून घरी जावे लागणार. तर पपा म्हणाले, “त्यात काय एवढे, हा घे कपडा,” आणि सहजपणे त्यांनी स्वच्छ पांढरा शुभ्र रुमाल खिशातून काढून दिला. धीर देऊन मला पुन्हा परीक्षाहॉलमध्ये पाठवले. इतकी छोटीशी गोष्ट, पण माझ्या हळव्या मनावर तो प्रसंग कायमचा उमटून गेला. “हा माणूस नेहमी खंबीरपणे पाठीशी उभा असेल आणि मला मुलगी म्हणून कधी कमीपणाने वागवणार नाही”, हे त्या वयातही अबोध मनात जाणवले. घरामध्ये आई नोकरी करणारी असेल, तेव्हा बापाला कामाचा भार उचलावाच लागतो. अजूनही आपल्या so called modern जगातही, उच्चशिक्षित लोकांना पुरुषाने स्वयंपाक करणे कमीपणाचे वाटते. परंतु अगदी १९९०च्या काळापासून, माझे वडील घरातील सर्व जबादारी मोकळेपणाने उचलायचे. नेहमी आनंदी चेहऱ्याने कधी नाश्ता तर कधी भाजी बनवणारे पपा ‘पुरुषाने स्वयंपाक बनवण्यात’ कधीच कमीपणा मानत नाहीत. सुरुवातीला नातेवाईकांचे, कौटुंबिक मित्र-मैत्रिणींचे कितीतरी टोमणे झेलावे लागले की नवरा कसा काय स्वयंपाक बनवतो. पण लोकांसमोर पपांनी नेहमीच ठामपणे उत्तरे दिली की ‘माझी बायको जशी नोकरी करून माझ्याएवढीच कमावते, तर माझी पण जबाबदारी बनते, की मीही मोकळ्या वेळात घरची जबाबदारी उचलावी.’ अजूनही लोक बोलतात आणि अजूनही पपा त्याच सहजपणे उत्तर देतात. बारावीच्या परीक्षेच्या वेळी, मला अतिताणाने रडू यायचे, तेव्हाही त्यांनी प्रेमाने समजावले की परीक्षेतील यश हेच काही सर्वकाही नसते, जेवढे झेपेल तेवढेच कर. MBBS नंतर बंडखोरीतून केलेल्या, माझ्या आंतरजातीय प्रेमविवाहाला मोठ्या मनाने समजून घेऊन स्वीकारणारे पपा, काही वर्षांनी घटस्फोटानंतरही तितक्याच समजूतदारपणे माझ्या पाठीशी उभे राहिले. जगाचे टक्केटोणपे खात असताना, “तू काही काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत.” असे म्हणून त्यांनी नेहमीच मला मायेने सावरले. अनेकदा नातेवाईक, ओळखीचे लोक तगादा लावतात, की हिचे लग्न कधी करणार. मीही कधी लोकांच्या चौकशीने भांबावून जायचे, तेव्हा माझे पपा मात्र खंबीरपणे म्हणाले, “तू माझ्यासाठी मुलाप्रमाणेच आहेस. कधीच स्वतःला कमी समजू नकोस. तू समाजपयोगी काम करते आहेस, तेच आयुष्यात सर्वात महत्वाचे आहे. लग्न म्हणजे काही सर्वस्व नाही. तुला अनुरूप मुलगा मिळेल, तेव्हाच लग्न कर.” अशा या जगावेगळ्या वडिलांच्या पाठिंब्यामुळे आपोआपच मीही आत्मनिर्भर झाले, माझी निर्णयक्षमता सक्षम बनली, स्वतःवरचा गमावलेला विश्वास या माणसाने मला परत मिळवून दिला. काही दिवसांपूर्वीच माझे ऑपरेशन झाले तर माझ्या खाण्यापिण्याची सारी जबाबदारी, न सांगता, पपांनी स्वतःवर घेतली. फळांचे जूस, भाज्यांचे सूप, सारेकाही खुशीने, नवीन नवीन प्रयोग करत माझ्याशी गप्पा मारून, माझे टेन्शन हलके करत, मला बरे करणे, हे त्यांचे कामच होऊन गेले. कोणी तब्येतीचे विचारले, तर मी अभिमानाने सांगते, “माझे पपा आहेत ना, ते माझी खाण्याची सर्व पथ्ये पाळतात, त्यामुळे लवकर बरी झाले मी.” लहानपणी पपांचा मार खाल्लेल्या मला त्यांचे हे बदलेले रूप पाहून आश्चर्य वाटत राहते. लहानपणी रागात बनलेल्या मनाच्या निरगाठी सैलावत जातात. घरातील जबाबदारी घेण्यासोबतच, त्यांचे सामाजिक कामही चालूच असते. पूर्वी NSS सोबत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत गावा-गावात काम करणारे माझे प्राध्यापक वडील मी जवळून पाहिले आहेत. त्याकाळात गावात स्वच्छता मोहीम राबवणारे, लोकांना उघड्यावर शौचास करण्याचे तोटे सांगून जनजागृती करणारे, प्रसंगी कॉलेजच्या मुलांना घेऊन, उघड्यावरची घाण स्वतः उचलून, विल्हेवाट लावणारे पपा, त्यांच्यासोबत मलाही अशा शिबिरांना घेऊन जायचे. कदाचित त्याचा परिणाम असेल, त्यामुळे मलाही आधीपासूनच गावात जाऊन लोकांसोबत काम करण्याची आवड निर्माण झाली. स्वयंपाक कधी शिकवला नाही, परंतु हातचलाखीच्या जादू शिकवून, स्टेजवर जाऊन माझ्याकडून त्या करवून घ्यायचे. आज मला जाणवते, माझ्या व्यक्तिमत्वातील कितीतरी गोष्टी या माणसाने माझ्याही नकळत घडवल्या आहेत. काही वर्षांपूर्वी माझ्या ‘मुलां’शी मैत्रीला विरोध असणारे पपा आता मात्र याबाबतीतही बदलले आहेत. उलट आजकाल माझ्या मित्रांसोबत त्यांच्याही छान गप्पा होतात. कधी चिकन बिर्याणी बनवून ते आम्हाला सर्वाना खाऊही घालतात. माझ्या कामाच्या ठिकाणी, छत्तीसगडमध्ये येऊन काम पाहणे, लोकांना भेटणे, हे सर्व त्यांना मनापासून आवडते. मी प्रचंड स्त्रीवादी आहे, त्या दृष्टीने, माझ्या निर्णयक्षमतेवर विश्वास ठेवणारे, मला निवडीचे स्वातंत्र्य देणारे, मला वेगळ्या कामासाठी प्रोत्साहन देणारे आणि बाहेरच्या कामासोबत, घरातील जबाबदारीही उचलणारे माझे वडील मला स्त्रीवादीच वाटतात. अजूनही कधी “पपांनी स्वयंपाक बनवला” हे ऐकून माझ्या एखाद्या मित्राचा घास आश्चर्याने घशात अडकतो, तेव्हा मी अभिमानाने सांगते, “माझे पपा feminist आहेत.” अनेकवेळा नोकरीमध्ये वाईट अनुभव आल्यामुळे, कामाच्या ठिकाणी लोकांच्या बाबतीत माझा दृष्टीकोन नकारात्मक झाला होता. सुरुवातीला कोणी कितीही चांगले वागले तरी काही दिवसांनी त्या माणसाचे खरे रूप बाहेर येते, असा गेल्या काही वर्षातील अनुभव. पुरुष तर आणखी जास्त भयंकर अनुभव देणारे. त्यामुळे सध्याच्या नवीन हॉस्पिटलमध्येही सुरुवातीला भुलून न जाता, डोळे उघडे ठेवून काम करण्याची माझी धडपड. नवीन जागी रुळण्याची काळजी, कामाचे टेन्शन, विविध तणाव. येथे भेटलेला बॉस. पहिल्यादिवशी त्यांना भेटले, तेव्हा वाटले नव्हते की या माणसाची फारशी काही मदत होईल. परंतु मग पुढच्याच काही महिन्यात लक्षात आले, की या माणसाची साथ-सोबत आहे प्रत्येक गोष्टीत. मग ती हॉस्पिटलमधील काही समस्या असो किंवा कधी वैतागाने, निराशेने माझे रडणे असो. कधी पळून जायचा प्रयत्न करावा, तर तो आहेच खंबीरपणे उभा, समस्येचे उत्तर घेऊन आणि “पळून जायचे नाही” हे ठामपणे सांगायला. यापूर्वीच्या कामामध्ये मी अनेकदा समस्यांना वैतागून पळालेली आहे. यावेळेस मात्र हा पाठीराखा आहे, समस्या सोडवायला. उलट जबाबदारी देऊन, मला समर्थ, परिपक्व होण्यास मदत करायला. माझ्या घटस्फोटाबद्दल त्याला माहित होते, परंतु त्या गोष्टीचा उच्चारही कधी त्याने माझ्यासमोर केला नाही किंवा मला अस्वस्थ वाटेल, असे खाजगी आयुष्याचे प्रश्न विचारले नाहीत. उलट मीच एकदा निराश झालेले पाहून त्याने समजावले, घटस्फोट वगैरेचा काही फरक पडत नसतो. इतके चांगले काम करते आहेस. मस्तपैकी खुशीने जग.” त्याच्या शब्दांनी, कामाच्या केलेल्या कौतुकाने आपोआपच मला बळ आले. त्या एकाच प्रसंगानंतर माझा घटस्फोट ही गोष्ट कधीच आमच्या बोलण्यात चुकनही आली नाही. कामात एखादी नवीन कल्पना सुचली की त्याला सांगायचा अवकाश, त्याने ती कल्पना प्रत्यक्षात राबवायला प्रोत्साहन द्यावे. वस्तुस्थितीची जाणीव करून देऊन, नियोजन करायला शिकवावे. कधी ताण-तणावाने मी रडकुंडीला आले, तर त्याने नवीन काहीतरी लिखाण-वाचन सुचवावे. आपोआपच त्याच्यामुळे मी लिखाणाकडे वळले. माझे लिखाण नवीन जोमाने सुरु झाले, छंदाचे रुपांतर जबाबदार, शिस्तशीर लिखाणात झाले. एका साप्ताहिकात मी नियमित स्तंभ लिहू लागले. त्याचे हे पाठबळ फक्त माझ्यसाठीच नाही, तर सर्वच डॉक्टरांसाठी होते. तो सर्वांसाठीच होता, तरीही गर्दीत तो प्रत्येकाला आपला जवळचा मित्र वाटावा, असा त्याचा सर्वाना सामावून घेणारा स्वभाव. त्याच्या मनाचा मोठेपणा पाहून, स्वतःच्या कोतेपणाची लाज वाटावी. कधी कोणाशी भांडण झाल्यावर त्याने समजवावे, की मन मोठे करावे म्हणून. स्त्रीला आदर कसा द्यावा, हे तर त्याच्याकडूनच शिकावे. त्याच्या बायकोला, बाळाला नेहमीच प्रेमाच्या पंखाखाली सांभाळणारा तो. माझ्यासारख्या एकट्या मुलींना अशा भागात राहताना किती समस्या येतात, हे समजून घेऊन नेहमी मदतीसाठी तो तत्पर. आमच्या मैत्रीत किंवा कधीही कुठल्या मुलीशी बोलताना त्याची नजर ढळली नाही, उलट तो इतका उमदा, हसतमुख की मुलीची नजर त्याला लागावी. कधीही बोलायला त्याच्या घरी जावे आणि कितीही व्यस्त दिनक्रमातूनही, थकलेले असतानाही त्याने निवांत गप्पा माराव्यात. त्याच्याशी बोलले की मनावरचा भार हलका होऊन जावा. घर सोडून, छत्तीसगडमध्ये येताना, नेहमीच ‘तो’ आहे म्हणून इतक्या दूरवरही अतीव विश्वासाने येता यावे. असा ‘तो’ माझा मित्र, माझे प्रेरणास्थान, माझा मार्गदर्शक, माझा पाठीराखा. इतके विश्वासाचे नाते. दोन्ही बाजुनी खूप नाजूकपणे, आदराने जपलेले. असा हा जगावेगळा बॉस. मोठ्या हुद्द्यावर असणारा, परंतु पाय मात्र जमिनीवरच असलेला. आजूबाजूला इतकी खुजी माणसे पाहते, जी थोडीफार सत्ता मिळताच, गुर्मीत वागतात, अधिकारपदाचा माज दाखवतात, जवळचे असले तरी वागणे बोलणे बदलते. छोट्या कामासाठीही मग आडकाठी लावून धरतात, नमस्कार चमत्कार करवून घेतात. परंतु हा मात्र वेगळ्याच मातीचा बनलेला माणूस, माणुसकी जपणारा, प्रामाणिक, व्यवहारात शिस्त, मात्र कुठेही विनाकारण कठोरपणा नाही, चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य, सोबतच्या अधिकाऱ्यापासून गावातील आदिवासी मनुष्यासोबही तितक्याच संवेदनशीलतेने, आपुलकीने बोलेल. स्वतःच्या वागण्यातूनच लोकांसमोर वेगळे उदाहरण ठेवणारा अधिकारी. त्याच्याशी कितीही मतभिन्नता झाली, राग आला तरी तो लगेच निवळायचा, कारण अनुभवाने कळून चुकले होते, की तो जे करतो, ते सर्वांच्या हिताचा विचार करूनच करतो. माझ्या चुका झाल्या, तेव्हा त्यांच्या शिस्तीने मला शिक्षाही मिळाली. पण मग नंतर मोठ्या मनाने त्यांनी ते माफही केले. त्यांच्याकडून कितीही गोष्टी शिकले, तरी कमीच आहे. कधी प्रवासात समस्या यावी, अनोळखी प्रदेशात भीती वाटावी आणि त्यांना फोन करताच त्यांनी काळजीने, तातडीने मदत करावी. मला गावातील स्त्रियांसाठी काम करायला आवडते, हे पाहून त्यांनी मला ‘कुटरु’ या खेड्यात कामासाठी पाठवले आणि येथील स्त्रियांशी, लोकांशी माझे विश्वासाचे नाते जुळले. कुटरुमधील पंचशील आश्रमात त्यांनी जायचा सल्ला दिला आणि या अनाथालयात मला नेहमीच मुलींचे प्रेम मिळाले. अजूनही कामाचा ताण येतो, तेव्हा श्रमपरिहारासाठी मी कुटरुला धाव घेते. असा हा दयाळू मनाचा, दुर्मिळ अधिकारी. ३१ डिसेंबरला, स्वतःच्या हाताने मटणाची स्पेशल डिश बनवून सर्व आम्हा सर्व डॉक्टरांना प्रेमाने खाऊ घालणारा. रात्री १२ वाजता, स्वतः प्रत्येकाच्या हातात फटाके, फुलबाजे, बाण नेऊन उडवायला सांगणारा. जिथे जिथे तो जाईल, तिथे तिथे आनंद वाटणारा. मी पाहत राहते आश्चर्याने आणि त्याच्या छत्राखाली सुरक्षित, आनंदी आयुष्य अनुभवत राहते विश्वासाने. तो दूर जाताना डोळ्यातून पाण्याच्या धारा लागलेल्या. असे वाटले, माझी आयुष्याची दिशा हरवेल आता. पण कधीतरी मला तो आधार सोडावाच लागणार होता. स्वतःचा रस्ता स्वतःलाच शोधावा लागतो शेवटी. असे वाटते, त्याच्यासारखे बनता यावे. शेवटी त्याला हक्काने सांगता यावे, “वादळात चालताना तू माझा रे सांगाती..”

3/28/23

शब्द

शब्दच मांडतात छळवाद आणि शब्दच करतात सुटका.
अनेक वर्षांपासून मानगुटीवर बसून राहिलेली पाप पुण्याची भुतं शब्दांच्याच मदतीनं उतरतात अलगद खाली आणि घेता येतो मोकळा श्वास.
परतत्वाचा स्पर्श होतो..आणि सरसर झरतात काळजाचे शाप कागदावर शब्दांच्या रुपात...होते कधी कविता..कधी कथा..कधी नुसताच जीवाचा तळतळाट.... 
ज्या कोणी माझ्या हाती लेखणी देऊन मला लिहितं केलं त्याला/तिला माझे कोटी कोटी नमस्कार.....
लिहिणं मला मुक्ती देतेय साऱ्या खऱ्या खोट्या हिशोबातून... प्रामाणिक जगण्यासाठी आणखी काय हवं.

5/29/18

आमचे रुग्णालय


भुलीच्या औषधाच्या गुंगीतून मी हळूहळू बाहेर येत होते. जड झालेले डोळे उघडायचा प्रयत्न केला, तेव्हा समोर माझे मित्र डॉ. नागुलन आणि डॉ. भारती, दोघे दिसले. लक्षात आले की मी आमच्या उमंगच्या ऑपरेशन थिएटरच्या बाजूच्या खोलीत, जिथे रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर काहीवेळ ठेवले जाते, तिथे बेडवर आहे. भूलीमुळे माझी छोटीशी शस्त्रक्रिया कधी झाली, ते मला स्वतःलाच समजले नाही. अर्धवट गुंगीत मी डॉ. नागुलनला पुन्हा पुन्हा एकच विचारत होते, “सर, हो गया ना ?” तो आणि भारती माझी मस्करी करत होते, “क्या madam, सुबह सुबह पिके आये हो हॉस्पिटल मे !” मग नर्सेस येऊन सलाईन बदलणे, वगैरे करत राहिल्या. भारती शेजारच्या बेडवर पुस्तक वाचत पहुडली. मी औषधाचा अंमल उतरेपर्यंत झोपून राहिले.
काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकार्यांनी डॉक्टर्स ट्रांझिट होस्टेलसाठी ६ सायकल विशेष निधीतून दिल्या. सर्व डॉक्टर्स जसा वेळ मिळेल, तसे सायकलिंग करायला दूरदूरपर्यंत जातात. आमच्या जिल्हा रुग्णालयापासून उजवीकडे २ किमी आणि डावीकडे २ किमी, असे बिजापूर शहर पसरले आहे. डावीकडे २ किमी वर जिल्हाधिकारी ऑफिस लागते, तेथून आणखी पुढे बडमिंटन कोर्ट, पोहण्याचा तलाव, शासकीय विश्रामगृह, मधुबन नावाचा जुना ढाबा असे पोइंटस लागतात. तेथून आणखी एक किमी पुढे जिल्हाधिकारी निवासस्थान लागते. मग नवोदय विद्यालय, केंद्रीय विद्यालय, डी.ए.वी. स्कूल व कॉलेज लागते. तेथून डावीकडे आत गेले की मांझीगुडा नावाचे सुंदर गाव लागते. तेथून आणखी पुढे जाऊन, ३-४ गावे ओलांडून एक गोल राउंड मारला, की पुन्हा बिजापुरमध्ये येता येते. जिल्हा रुग्णालयाच्या उजवीकडे बाजार, पेट्रोल पंप, बस स्थानक, आणि सर्वांचा मनपसंत दंतेश्वरी ढाबा लागतो. डाव्या दिशेला ४५ किमी भैरमगड, आणि ८० किमीवर दंतेवाडा जिल्हा लागतो, तर उजवीकडे ६० किमीवर भोपालपट्टणम, मग इंद्रावती आणि इंद्रावतीच्या पलीकडे महाराष्ट्रातील पाथागुडम गाव व सिरोंचा जिल्हा लागतो. भोपाल पट्टणम पासून दक्षिणेकडे तेलंगणा लागते. बिजापूर शहराच्या चारी दिशांवर CRPF च्या चार बटालियनचे काम्प्स आहेत.(नंबर्स)
सायकलिंगला सर्व निघतात, तेव्हा काही मेन रोडने डावीकडे नवोदय विद्यालय, नेमेडकडे जातात, काही आजूबाजूच्या छोट्या गावाकडे जातात. उजवीकडे बस स्थानक संपले की चढ उतार आहे, पुढे घाट सुरु होतो. याला सारे “घाटी” म्हणतात, कधी सर्व इकडे फिरायला जातात. घाटी संपले की मोदकपाल नावाचे गाव लागते, तिथे CRPF साठी साटेलाईट फोन आहे. बऱ्याचवेळा, बिजापूरमधे दोन-दोन दिवस नेटवर्क निघून जाते, तेव्हा महत्वाचा फोन अथवा इमेल करण्यासाठी आम्ही सारे मोदकपाल इथे जातो.
मला सायकलिंग आवडते, दिवसभराचा कामाचा ताण, चिंता, प्रश्न याने डोके भणभणते तेव्हा एकटीने मी दूरवर सायकलिंगला जाते तेव्हा ते मेडीटेशन होते. निसर्गाच्या सहवासात मनातील सर्व तणाव अलगद निवळत जातात आणि परतून येईपर्यंत मन शांत प्रसन्न होऊन जाते. त्यात मला माझीगुडा हे गाव खूप आवडते. गावात पोहोचताच एक भला थोरला डेरेदार, असंख्य पारंब्यांचा वडाचा वृक्ष लागतो. फोटोत मावतही नाही त्याचा पसारा. तेथील घरेही निळ्या, हिरव्या रंगात रंगवलेली. घरांच्या दारात त्या त्या मोसमाची झाडे, वेली, फळे, फुले, भाज्या लावलेली. छोटेसे गाव संपले की पुढे दूर दूर पसरलेली शेते. खडबडीत रस्ता, एखादा ट्राक्तर, सायकलीवरून जाणारी पोरे, लगबगीने चालणारी एखादी स्त्री. सध्या उन्हाळ्यात लालभडक फुललेले पळस. तेथून दिसणारा पहाड, सोबत मावळतीचा लाल गोळा आणि केशरी आकाश. ते सारे पाहताना भान हरपून जाते. घरची आठवण, चिंता, कोणाशी भांडण सारे विसरायला होते. मग प्रसन्न मनाने परतायचे. इथपर्यंत येऊन जाऊन ८-१० किमी सायकलिंग आरामात होते. गेले काही दिवस मी वेड्यासारखी सायकलिंग करत होते. सायकलचे सीट खूप कडक होते, ते घासून जखम झाली. त्यात रविवारी मी दंतेवाडयाला ‘बचपन बनाओ’ या संस्थेतील माझे मित्र मैत्रीण ज्योती आणि प्रणित यांना भेटायला गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तेथून २० किमीवर असणाऱ्या ‘ढोलकल’ या ठिकाणी ट्रेकिंगसाठी गेलो. ढोलकल येथील पहाडावरचा गणपती प्रसिद्ध आहे. नवव्या-दहाव्या दशकातील सुंदर गणेश मूर्ती इथे जंगलाने वेढलेल्या डोंगराच्या माथ्यावर विराजमान आहे. याची गोष्टही गमतीशीर आहे. (स्टोरी ऑफ ढोलकल ) फेब्रुवारी महिना. पानगळ झालेली. सकाळी ९-१० लाच कडक उन्हे पडलेली. त्यात दगड चढून, त्यावर घासून माझे दुखणे वाढले. ११ वाजता आम्ही परत उतरायला सुरुवात केली. आम्ही चारच लोक होतो, त्यात वाटाड्या नाव. आमचा मित्र लिंबाजी, ज्याला गुडघ्याचा आजार आहे, जिद्दीने पूर्ण पहाड चढला होता. उतरताना मात्र त्याला त्रास होऊ लागल्याने, तो आणि वाटाड्या “नाव ” दोघे मागे राहिले, ते सावकाश येत होते. मी आणि ज्योती गप्पा करत पुढे गेलो आणि बराच वेळाने लक्षात आले की आम्ही रस्ता चुकलोय. १ तासाच्या उतरणीसाठी आम्हाला रस्ता भटकल्याने चार तास लागले. उन्हाने चांगलाच त्रास झाला. तेथून परत येताना रस्त्याच्या कडेला सल्फी विकणारे लोक दिसले. इथे वेगवेगळ्या प्रकारचे, झाडांच्या रसापासून बनवलेले स्थानिक मद्य भेटते. महुआ, सल्फी, ... मला बऱ्याच दिवसापासून सल्फी चाखायची होती. आंबट चिंबट ताकासारखे लागणारी सल्फी दोन घोट प्यायली. संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास, ज्योती आणि प्रणितचा निरोप घेऊन, माझ्या कारने मी दंतेवाडा सोडले. बिजापुरला पोहोचेपर्यंत अंधार पडला होता. अंधारात एकटीने परतताना जाम भीती वाटत होती.
दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमधे कळले, की काल बिजापूरच्या रोडचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे अपहरण झाले आणि आज पहाटे बिजापूरपासून काही अंतरावर मेन रोडवरच त्याला गोळी घालून मारण्यात आले. त्याची डेड बॉडी पोस्टमोर्टेमसाठी आमच्या जिल्हारुग्णालयात आल्याने सर्वत्र तीच चर्चा चालली होती. माझी मैत्रीण भारती आणि डॉ. नागुलन त्यासाठी गेले होते. ते ऐकून मी घाबरले, कारण काल रात्री मी त्याच रस्त्याने आले होते.
सोमवारपासून मला थंडी ताप सुरु झाला, जखमेच्या वेदनेने खुर्चीत बसणे अशक्य झाले होते. मी स्वतः डॉक्टर असून, जखमेकडे दुर्लक्ष केले आणि भरपूर पस भरून दुखणे चांगलेच वाढले. भुल देऊन, छोटी शस्त्रक्रिया करून पस काढावा लागणार होता. पण मी तयार नव्हते. मला घरी जाऊ वाटत होते. परंतु इतका लांबचा प्रवास अशा स्थितीत मला शक्य नव्हता. इथे बिजापूरमधे, जिथे मी स्वतः रुग्णांवर शस्त्रक्रिया करते तिथे स्वतः रुग्ण बनणे, याची लाज वाटत होती. मेसचे जेवण खाऊ वाटत नव्हते. या काळात भारती सतत सोबत राहिली. तापाच्या गुंगीत मी झोपून रहायचे तेव्हा आमची होस्टेलची मावशी (नाव) येऊन सर्व खोली स्वच्छ करत होती, कपडे धुवून, सुकवून घडी घालून ठेवत होती. मेस मधली बबली मी मागेल ते बनवून आणून द्यायची. शेवटी बुधवारी दुखणे असह्य झाले तेव्हा मी डॉ. नागुलनला शस्त्रक्रिया करायची विंनती केली. माझ्या नर्सेस, शिल्पा, प्रेमलता, प्रियांका, वेदिका, साऱ्याजणी माझ्यासाठी उमंगच्या ऑपरेशन थिएटरमधे आल्या. मी स्वतः एक सर्जन असूनही, मला मात्र इंजेक्शन्सची प्रचंड भीती वाटते. मी रडत होते आणि माझ्या नर्सेस नाजूक हातानी मला सुई लावत होत्या. भुल तज्ञ डॉ. गुप्ता मदतीसाठी बाहेर थांबले. मी आत येऊन, ज्या टेबलवर माझे रुग्ण झोपतात, तिथे झोपले. डॉ. भारतीने मला भुलीचे इंजेक्शन दिले आणि माझ्या जाणीवा तात्पुरता बंद झाल्या. शस्त्रक्रियेनंतर दोन दिवसातच मी पूर्ण बरी झाले. त्यादिवशी मला पहिल्यांदाच एक नवीन गोष्ट जाणवली. सतत राबणाऱ्या, स्वतःच्या शरीराला आराम न देता, अथकपणे कष्ट करत राहणाऱ्या माझ्या स्त्री रुग्णांना, जेव्हा आम्ही डॉक्टर्स, नर्सेस भरती करतो, काही शस्त्रक्रिया करतो, त्यांची निरपेक्ष काळजी घेतो, त्यांना सक्तीची विश्रांती घ्यायला लावतो, तेव्हा त्यांनाही खरेच मनापासून चांगले वाटत असेल. आदिवासी रुग्ण जास्त दिवस रुग्णालयात भरती होयला तयार नसतात. बऱ्याचवेळा आमची स्त्री रुग्ण गंभीर आजारी असते आणि तिचे मात्र “घर मे बच्चे है, बहोत काम है, छुट्टी दो,” असे रोज टुमणे चालू असते. त्यांना खूप समजावून सांगितल्यावर बऱ्याचवेळा राहतात, तर कधीकधी न सांगता निघून जातात. असे निघून जाणारे रुग्ण कधी परत येतच नाही, तर काही खूप गंभीर स्थितीत परत येतात. एकदा एका स्त्रीचे बाळ उलटे म्हणजेच पायाळू असल्याने मी तिला सिझर करावे लागेल असे समजावले, रात्रीतून ती निघून गेली. काही दिवसांनी बाळ अडकलेल्या स्थितीत परत आली, मग तातडीने तिची शस्त्रक्रिया करावी लागली. अशा रुग्णांचा पत्ता आम्ही फिल्डवरील मितानी, ANM नर्सेसना देतो, रुग्णांची फिल्डवर काळजी घेणे, गरज पडली की तातडीने रुग्णालयात परत आणणे, याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवतो.
आमचे रुग्णालय सरकारी असूनही आधुनिक, सर्व सुविधापूर्ण आणि महत्वाचे म्हणजे खूप स्वच्छ आहे. मी काही खाजगी रुग्णालयेही पाहिली आहेत, जिथे बाहेरून चमक धमक असते परंतु आत मात्र गबाळा कारभार असतो. त्यामुळे आमच्या आदिवासी रुग्णांसाठी असलेल्या शस्त्रक्रिया टेबलवर झोपताना मला थोडेही घाण वाटले नाही. माझी मैत्रीण डॉ. भारती एक चांगली डॉक्टर आहे हे मला स्वतःला माहित असल्याने, तिच्याकडे भुलतज्ञ डिग्री नसली तरीही, मी तिलाच भुल द्यायला लावली. डॉ. नागुलन माझा जवळचा मित्र आणि त्याहीपेक्षा जास्त, मी पाहिलेल्या सर्जन्सपैकी सर्वोत्तम सर्जन असल्याने मी विश्वासाने त्याच्यावर सर्व भार टाकला. माझ्या नर्सेसने माझ्या कुटुंबीयासारखी माझी काळजी घेतली.
तो पूर्ण आठवडा एक वेगळा अनुभव ठरला. घरापासून, कुटुंबापासून इतके दूर असतानाही, मी ते दुखणे निभावून नेले, ते माझ्या मित्र मैत्रिणीच्या, नर्सेसच्या प्रेमामुळे. मागील वर्षी, घर सोडून, बिजापुरला येताना भीती होती, मी एकटी राहू शकेन का. घरच्यांना सतत चिंता असते, ही एकटी कशी राहतेय. कधी ओळखीचे लोक म्हणतात, घर सोडून इतक्या लांब जाऊन राहणे हा मूर्खपणा आहे. कोणी फुकटचा सल्लाही देते, सामाजिक कार्याचे खूळ डोक्यातून काढून टाका, ज्यांच्यासाठी तू काम करशील, त्यांना तुझी काही किंमत नसते. मला स्वतःलाही बऱ्याचवेळा एकटेपणाची भीती घेरून टाकते.
परंतु जेव्हा गरजेच्या वेळी इतके सारे लोक धावून येतात, कुठल्याही अपेक्षेविना प्रेमाने मदत करतात, तेव्हा माझा माणुसकीवरचा विश्वास बळकट होतो. माझा असा अनुभव आहे, जिथे जिथे मी गेले आहे, तिथे तिथे माझी काळजी घेणारे, मला जपणारे, खाऊ पिऊ घालणारे लोक मला भेटले आहेत. कधी बिजापुच्या आजूबाजूच्या गावात भटकायला जाते, तेव्हा लोक बोलवून चहा पाजतात, खाऊ घालतात. पुणे सोडून गडचिरोलीला ‘सर्च’ संस्थेत गेले, तेव्हा डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी मुलीप्रमाणे मायेची वागणूक दिली, त्यांच्यामुळे माझ्या आयुष्याच्या बद्दलच्या जाणीवा स्पष्ट झाल्या. डॉ. योगेश दादा यांचे नेहमी प्रोत्साहन आणि पाठबळ राहिले. सर्चच्या परिसरातील कार्यकर्त्या लोकांच्या कुटुंबांनी भरभरून कौतुक आणि प्रेम केले. बार्शीचे घर सोडून, बिजापुरला यायचा निर्णय घेताना, डॉ. अय्याज सरांवर डोळे झाकून विश्वास ठेवला आणि इथे येऊन माझी ही अंधारातील उडी योग्य असल्याचा अनुभव आला.
जग चांगले आहे की वाईट आहे, हा प्रश्न सर्वांनाच पडत असतो, मलाही पडतो. पण जेव्हा आपण चांगल्या मनाने काम करत असतो, तेव्हा नेहमी चांगलेच लोक भेटत राहतात. माझा मागील ‘बेच्चो’ हा लेख वाचून खूप लोकांनी कौतुक केले, “तू ग्रेट आहेस,’ अशा अनेक प्रतिक्रिया मिळाल्या. खरेतर माझ्यापेक्षा कितीतरी हुशार आणि चांगली शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर्स आहेत, माझी डिग्रीही साधी आहे. पण मला वाटते, कोणी ग्रेट वगैरे नसते. तर तुम्ही इतरांसाठी जेव्हा कुठलेही काम करता, चांगल्या हेतूने मदत करता, ते तुम्हाला ग्रेट बनवते. तुमचे निर्णय, तुमची इतरांप्रती संवेदनशीलता आणि तळमळ, हे तुम्हाला ग्रेट बनवते.
दुखण्यातून बरी होऊन पुन्हा कामाला सुरुवात झाली. एका पार्टीत चिकन खाताना, दात तुटला. दाताच्या दुखण्याची मला प्रचंड भीती वाटते. डॉ. कुंवर सरांना म्हटले, मी जगदलपुरला जाईन. सर म्हटले, “घरकी मुर्गी दाल बराबर मत समझो. अपना डेंटिस्त डॉ. मनोज अच्छा है. उससे करवालो.” भोपालपट्टणम च्या डॉ. मनोजने मला व्यवस्थित दातात फिलिंग करून दिले.
कधी कोणी म्हणते, सरकारी रुग्णालयात इतका खर्च करायची काय गरज ? साधे पुरेसे आहे की. मग आम्हाला राग येतो, गरिबांना अधिकार नाही का प्रशस्त, सुविधापूर्ण आणि स्वच्छ रुग्णालय उपलब्ध असण्याचा ? एकदा बिजापुरमधील कोणी एक सरकारी अधिकारी व त्यांची बायको रुग्णालय पहायला आले. त्या बाई म्हणाल्या, “इतके मोठे आणि चांगले रुग्णालय बांधले आहे जिल्हाधिकारी तांबोळी सरांनी. पण हे आदिवासी लोक घाण करतात.” मनात म्हटले, “बाई ग, हे आदिवासी लोकांच्या हक्काचे रुग्णालय आहे.” कधी अशा शिक्षित लोकांपेक्षा माझे आदिवासी लोक मला जास्त सामाजिक आणि जवळचे वाटतात.

दुपारी ओपीडी संपल्यानंतर सामसूम झाली होती. मी मुख्य इमारतीत फोनवर बोलत उभी होते, तेव्हा एक आदिवासी माणूस, त्याच्या बायको-पोरासोबत आला. इथे सरकारी रुग्णालय कुठे आहे, म्हणून मला विचारले. मी त्याला सांगितले, की बाबा, तू उभा आहे, ते हेच आहे. तो म्हणाला, नाही, हे तर खूप मोठे रुग्णालय दिसतेय. माझ्याकडे पैसा नाही. गरीब लोकांचा इलाज कुठे होतो, ते रुग्णालय मला दाखवा. मग मी त्याला समजावले, की इथे मोफत इलाज होतो आणि त्याला आवश्यक त्या ठिकाणी नेऊन सोडले.

1/30/18

छत्तीसगड

सध्या मी छत्तीसगड या राज्यात, आदिवासी बहुल व नक्षल ग्रस्त अशा भागात, बिजापूर या ठिकाणी, सरकारी जिल्हा रुग्णालयात 'स्त्री रोग तज्ञ' म्हणून काम करत आहे. इथे लोकांना असंख्य समस्या आहेत. कुपोषण आणि आरोग्याच्या असंख्य प्रश्नांनी, दररोजच्या मरण्याने इथले आदिवासी ग्रस्त आहेत.या सर्वात एक आशेचा किरण आहे, तो म्हणजे २ वर्षापासून इथे कार्यरत असलेले जिल्हाधिकारी डॉ. अय्याज तांबोळी, ज्यांनी आरोग्य, रस्ते, रोजगार व शिक्षण या क्षेत्रात अनेक वेगवेगळी कामे राबवून, विकास घडवून आणल्याने, या प्रदेशात एक नवीन आशादायी बदल होत असल्याचे चित्र पाहायला मिळतेय. अय्याज सरांच्या कामाबद्दल माझा दीर्घ लेख साधना साप्ताहिकाच्या १२ जुलै २०१७ च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. तो मी इथेही प्रसिद्ध करेन. तसेच अलीकडे माझा मित्र मकरंद दीक्षित याचाही लेख २ भागामध्ये, लोकप्रभाच्या १९ व २६ जानेवारी २०१८ च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे. मकरंद मुंबई चा असून, त्याने पूर्ण वेळ सामाजिक कामात वाहून घेतले आहे. डिसेंबरमधे १० दिवस तो बिजापुरला येऊन राहिला आणि त्याला आलेल्या अनुभवावर त्याने लोकप्रभा मधे खूप सुंदर लेख लिहिला आहे.
मला आयुष्यात ध्येयाने वेडावलेली, अफाट काम करून दाखवणारी, स्वतःची बुद्धी व उर्जा समाज हितासाठी वापरणारी माणसे भेटली की मी भारावून जाते अशा व्यक्तींच्या दर्शनाने. मग ते डॉ. अभय बंग, डॉ. रानी बंग असोत, डॉ. प्रकाश आमटे असोत, विकास आमटे असोत किंवा आमचे छत्तीसगडस्थित बिजापुरचे जिल्हाधिकारी डॉ. अय्याज तांबोळी असोत. अशी माणसे स्वतः तर मोठे कार्य घडवातातच पण दुसऱ्यासाठीही एक मोठा आदर्श निर्माण करतात.
इथे छत्तीसगड मधे काम करताना, डॉ. अय्याज तांबोळीची कार्यशैली आणि मैत्री जवळून पाहायला मिळाली. त्यांच्यासाठी लिहिलेली ही कविता.


हिरवं हिरवं जंगल
दाट दाट झाडी
कमळांनी भरलेले तालाब
आभाळाला टेकणारे महाकाय वृक्ष
या साऱ्या उत्कट निसर्गात
गर्द हरवलेली माणसांची
छोटी छोटी खेडी..घरे.
आणि या सगळ्यावर उमटलेली
तुमच्या शुभ्र कर्तृत्वाची मोहोर
हे सारं सारं तर आवडतं मला..


उघड्या नागड्या पोरांना
छातीशी धरणार्या
अतिसुंदर आणि अतिकठीण आया.
पोटातील भूक गच्च दाबून
गोड हसणार्या आदिवासी बाया..
जंगलात लाकूड, करवंदे, महूआ
ढुंढाळणारे हे जंगल वासी.
या सर्वांवर मायेची पाखर धरणारे
त्यांच्या जगण्याचा टेकू बनणारे ,
आधार देणारे तुमचे काम..
त्या कामामागचा तुमचा कळवळा
तुमची दूरदृष्टी
तुमचा सारासार विचार
हे सारं सारं तर आवडतं मला..


तुमच्याकडे कोणतीही अडचण
घेऊन येणाऱ्या प्रत्येकाला
तुमच्याकडून
मिळणारा दिलासा
एखाद्या अवघड समस्येवर
तुमच्याकडे असलेले असंख्य उपाय
समोरच्या व्यक्तीला समजून घेऊन
तुमच्या विशाल अंतरंगात
सामावून घेणारे
तुमचे प्रेमळ, सहज भान
तुमचे हसून बोलणे,
सांभाळून घेणे
हे सारं सारं आवडतं मला..

हेच तर बळकट करते आयुष्यावरची श्रद्धा
आणि तुमच्यावरचा विश्वासही.

2/25/17

उत्तराखंड भाग ४



आजपासून, म्हणजे १ सप्टेंबरपासून ते ८ सप्टेंबरपर्यंत आमच्या फिरत्या दवाखान्याचा कालावधी होता. दर महिन्याचे पहिले ८ दिवस आरोही हा फिरता दवाखाना चालवते. गावोगावच्या आशा व आरोहीच्या हेल्थ असिस्टंट मार्फत कोणत्या दिवशी कोणत्या गावी फिरत्या दवाखान्याचा थांबा ठरलेला असेल त्याची माहिती पसरवली जाते. त्यानुसार त्या गावचे व आजूबाजूचे रुग्ण ठरलेल्या दिवशी तिथे तपासणीसाठी येतात.
आरोहीसोबत ८ दिवस मानधनावर काम करायला नेहमी दिल्लीवरून येणाऱ्या डॉ. रितू म्हणून स्त्रीरोगतज्ज्ञ असतात. काही कारणाने त्या या महिन्यात येऊ शकल्या नसल्याने डॉ. सुशील यांनी मला बोलावले होते. आमच्या टीम सोबत एक सोनोग्राफी तज्ञ डॉ. प्रशांत नातू हे होते. ते लखनौमध्ये प्रायवेट प्रक्टिस करतात व दर महिन्यातील ८ दिवस आरोहीच्या या फिरत्या दवाखान्यासोबत काम करायला येतात.
पहिल्या दिवशी आमचा कॅम्प सतोलीलाच होता. पेशंटची झुंबड उडाली होती. त्यात हिमांशु जेवणासाठी ब्रेक घ्यायचा नाही. जोपर्यंत सर्व पेशंट तपासून होत नाहीत तोपर्यंत आम्ही सर्वांनी त्याला कितीही जेवायला बोलावले तरी तो काही यायचा नाही, मग अशाने त्याला दुपारी ४-५ वाजायचे जेवायला. आम्ही बाकीची टीम मात्र २-३ वाजता ब्रेक घेऊन जेवायचो, जेवल्याशिवाय आम्हाला काम करणे शक्य होत नसायचे. परंतु हिमान्शुला सोडून जेवताना मला खूप अपराधी भावना यायची आणि त्याचे पर्यवसन माझी त्याच्यावर चिडचिड होण्यात होयचे. मग मी जेवून आले की त्याच्याकडील रुग्णांना माझ्याकडे बोलवायचे, मग हिमांशु जेवायला जायचा.
दुसऱ्या दिवशी पहाटे सतोली सोडून आम्ही निघणार होतो व पुढचा मुक्काम सरगाखेत या ठिकाणी पडणार होता. एक मोठी बस, ज्यामध्ये फिरत्या दवाखान्याचे पूर्ण सामान आणि २ जीप अशा रीतीने आमचा प्रवास होणार होता. या बसमध्ये टेबल, खुर्च्या, औषधे, रक्त तपासणीची lab, एक्सरे मशीन, सोनोग्राफी मशीन, स्टेथो, बीपी मशीन, इत्यादी असं सगळा पसारा मावला होता.
दुसऱ्या दिवशी सरगाखेतला प्रचंड गर्दी होती. जवळ जवळ १५० गर्भवती स्त्रिया तपासणीसाठी व सोनोग्राफीसाठी आलेल्या होत्या. सरगाखेत हे एका दरीच्या कडेला, निसर्गरम्य परिसरात वसले होते. सकाळी आम्ही पोहोचलो तेव्हाच तेथील झाडे, फुले, दरीत दिसणारी घरे, रिसोर्ट्स, धुके या सगळ्यांना पाहून मी वेडावले होते. आमच्या खाण्यापिण्याची सोय एका सुंदरशा हॉटेलमध्ये केलेली होती. ते पूर्ण लाकडापासून बनवलेले व लाकडाच्याच वस्तूंनी सजवलेले कॅफे शॉप सारखे ते होते. रात्री आमची राहण्याची सोय केलेले हॉटेलही खूप सुंदर होते. मलातर एखाद्या छानशा ट्रीपला आल्याचा भास होत होता. कामासाठी मी आलेय असे वाटतच नव्हते.
पुढचे २ दिवस मात्र राहायला खूप साधीच सोय होती परंतु आम्ही सर्व एकत्र राहून खूप धमाल केली. सर्वच जणांचा स्वभाव मस्तीखोर असल्याने कंटाळा कधी यायचाच नाही. किंवा एकत्र हॉलमध्ये गप्पा मारत बसायला लाज वगैरे वाटायची नाही. मिळून चहा बनवणे, पत्ते खेळणे, हिमांशुच्या laptop वर गाणी ऐकणे, जोक सांगणे असे रिकाम्या वेळात उद्योग चालू राहायचे. प्रत्येक ठिकाणी सामानाची चढ उतार करावी लागायची. मग सगळे मिळून साखळी बनवायचो व सामान पास करत रूम पर्यंत पोहोचवायचो. आता खाण्यापिण्या साठी धाब्यावर सोय होती. पण ते धाब्यावरचे नॉर्थ इंडियन फूड, विविध प्रकारचे परोठे, छोले, ओम्लेट,पनीर, दही, लस्सी, दाल इत्यादी आम्ही मस्त एन्जॉय करत होते.
चौथ्या दिवशी आम्ही खनस्यू या ठिकाणी पोहोचलो. खनस्यू ही जागा तर मला स्वर्गासारखी भासली. या गावातून सुंदर नदी वाहत होती व गावाबाहेर २ नद्यांचा संगम होता. या गावात आमच्या टीममधील ३ ड्रायव्हर्स पैकी एक, राजुभैय्याचे कुटुंब राहत होते. त्याच्याकडेच आमच्या खाण्यापिण्याची जबाबदारी सोपवली होती. तिथे पोहोचताच एका धबधब्यावर सर्व गाड्या धुण्यात आल्या. सर्वांनी पाण्यात फुल धमाल केली.
दुसऱ्या दिवशी लवकर उठून मी नदीकिनारी फिरायला गेले. तिथे नदीवर एक प्रचंड पूल होता. त्याच्यापलीकडे जंगल व पहाडावर शेती होती. मी पूल पार करून गेले. पलीकडे गेल्यावर तिथे एक मोठी शिळा होती. त्यावर छान विसावले. तेथून खूप सुंदर नजारा दिसत होता. नदीचे स्फटिकासारखे दिसणारे पांढरे शुभ्र पाणी, पूल, आजूबाजूची दाट झाडी...इतके सुंदर दृश्य पाहून मी तर खनस्यूच्या प्रेमातच पडले. तो क्षण खूप सुंदर होता. एका क्षणात आयुष्य उलगडणे काय असते ते जाणवले. खूप दिवस मनात साचून राहिलेली तगमग, अस्वथता जाऊन, मन शांत व प्रसन्न झाले. असं वाटले की तिथेच कायमचे राहून जावे.
३ दिवस तिथे आमचा मुक्काम होता व रोज तेथून वेगवेगळ्या गावी आमचा फिरता दवाखाना जात होता. आमची व्यवस्था अशी होती की सर्वात पुढे बस जायची. गावातील शाळा, किंवा सरकारी आरोग्य केंद्र किंवा एखादे जुने घर असे जे मिळेल ते दवाखाना लावण्यासाठी निवडले जायचे. मग तेथे बस नेवून सर्व समान उतरवले जायचे. दोन डॉक्टरांसाठी २ जागी टेबल खुर्च्या लावून व्यवस्था केली जायची. मला गर्भवती महिला तपासण्यासाठी एका कॉटची सोय केली जायची. सोनोग्राफी, एक्सरे, रक्त तपासणी व औषधे वितरण याची सोय बसमध्येच केलेली असायची. नंतर जीप मधून मुन्नी दीदी व नर्स जायच्या. मुन्नीदी चा रुग्णांच्या नाव नोंदणीचा टेबल लागायचा. आम्ही पोहोचेपर्यंत नाव नोंदणी सुरु झालेली असायची. मग आम्ही रुग्ण तपासून त्यांना पुढील गोष्टीसाठी बसकडे पाठवायचो. दुपारी जेवणाची सोय तिथल्याच एखाद्या छोट्याशा टपरीमध्ये असायची. मधे मधे चहा मिळायचा.
एखाद्या दिवशी छोटे गाव असले व कमी रुग्ण असले की दुपारीच आम्ही रिकामे होयचो. मग रमत गमत सर्व परतायचो. मधेच शेत लागले की सर्व जण गाडीतून उतरायचे. ओळखीच्या लोकाकडे थांबायचो. तिथे पाहुणचाराची पद्धत म्हणजे जे कुठले सिझनल फळ असेल, ते भरपूर प्रमाणात खायला मिळणार. मी गेले होते तेव्हा काकडीचा मोसम होता. तिथे मोठ्याल्या रसरशीत काकडी मिळतात, त्याला ते खीरा म्हणतात. कुठेही गेलो की पहिले कोणीही मोठा खीरा कापून , त्यासोबत मिरचीची चटणी खायला देणार. सगळे नुसते तुटून पडायचे खीरा खायला. एकदा एक आजी घराच्या छतावर शेंगा वळत घालत होती. भावनाने जाऊन तिला शेंगा मागितल्या, ती आनंदाने देऊ लागली, इकडून मी फोटो काढत होते. फोटो काढलेले पाहताच ती खुश झाली आणि तिने नको म्हणत असताना खूप साऱ्या शेंगा दिल्या, आम्हाला त्या पुढे ३-४ दिवस पुरल्या. मग मधेच धबधब्यावर थांबून पाण्यात खेळणे व्हायचे, कोणी पोहायचे. मधेच रस्त्यावर धावण्याची शर्यत लावली जायची. कधी रानटी फळे दिसली की उतरून ती खाऊ लागायचो. कधी गवत जायला उशीर होतोय म्हणून मुन्नीदी रागावून आम्हाला खालीच सोडून जीपने पुढे जायची. मागून दुसरी जीप घेऊन येणारा राजुभैय्या मग आम्हाला लिफ्ट द्यायचा.
रात्री जेवणाआधी अंताक्षरी चालायची. हिमांशु पत्त्यांच्या ट्रिक्स करून दाखवायचा, माईंड गेम्स करायचा. भरपूर मेडिटेशन करून तो त्यात एकदम निष्णात झाला होता. एकदा मुन्नीदीचा वाढदिवस होता. मग सर्वांनी मिळून गाणे लावून, तुफान डान्स केला. आमच्या टीममधील कोणीही कधी वेडेवाकडे वागायचे नाही, मुलींकडे वाईट नजरेने पहायचे नाही, कधी आमच्यासमोर घाणेरडे जोक करणे असे कारायचे नाही, दारू तर पिणे निषिद्धच होते. या गोष्टींचे मला खूप कौतुक वाटायचे. मुन्नीदी बेस्ट लीडर होती. ती पूर्ण व्यवस्था सांभाळायची, कामे करवून घ्यायची, कोणी रुसलं चिडले तर समजावून घ्यायची, समस्या उत्कृष्टरित्या सोडवायची, तिच्या शिस्तीमुळे सर्व कामे वेळेत व योग्य पद्धतीने चालायची. हिमांशु सुद्धा शांत, नम्र आणि कष्टाळू डॉक्टर असल्याने सर्वजण त्याचे ऐकायचे. तोही चिडचिड न करता गोष्टी हाताळायचा.
मी आणि माझी असिस्टंट नर्स भावना, आमच्या दोघींची टीम गर्भवती महिला व इतर समस्या असलेल्या महिलांची तपासणी करण्यासाठी होती. पहिले रूम मध्ये गेलो की आम्ही दोघी सामानाची योग्य रीतीने मांडामांड करायचो. रोज वेगवेगळ्या प्रकारची कंडीशन असायची. कधी अगदीच स्वच्छ खोली मिळायची तर कधी अगदीच गलिच्च खोली मिळायची. गर्भवती महिलेला झोपवण्यासाठी कॉट लागायचा. एकदा तर एक अडगळीची खोली तपासणी रूम म्हणून मिळाली. तिथे खूप कमकुवत दिसणारा, तुटायला आलेला कॉट होता. आम्हाला भीती वाटली की एखादी महिला पडेल यावरून. मग कॅम्पच्या वेळेस सर्वत्र फिरून व्यवस्था पाहणारे, चहा आणणारे ड्रायवर काका आले आणि त्यांनी त्यावर उडी मारून, झोपून दाखवले, मग तो कॉट आमच्या परीक्षेत पास झाला. एकदा एका जुन्या घरात आमची सोय होती. तर तिथे एका कोपऱ्यात एक आजारी कुत्रा झोपलेला होता. पूर्ण खोलीभर त्याचा घाण वास पसरलेला. आम्हाला काळजी की चुकून हा कुत्रा एखाद्या रुग्णाला चावला बिवाला तर ? मग भावनाने बराच प्रयत्न करून त्याला बाहेर काढले. तो कुत्रा मधेच आत पुनः यायचा व भावना त्याला बाहेर हाकलत राहायची.
अशी रोज विविधता असायची आमच्या फिरत्या दवाखान्यामधे. एका ठिकाणी एका प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर आलेली होती. मला आश्चर्य वाटले. ती कानपूरची होती. म्हणजे इथून ८-९ तास अंतरावर. नंतर कळले की ती कधीच यायची नाही तिथे. फक्त पगार घ्यायची घरी बसून. परंतु त्यादिवशी आम्ही तिथे येणार आहोत हे आशा वर्कर मार्फत तिला कळाले, आम्ही तिच्या गैरहजेरीची नोंद करून तिची तक्रार करू अशी भीती वाटल्याने त्या दिवशी ती आली होती.
फिरत्या दवाखान्याला खूप गर्दी व्हायची. कारण शहरात जाऊन उपचार घेणे त्यांना परवडत नाही. गर्भवती महिला तर दर महिन्याला फिरत्या दवाखान्यातच यायच्या. त्यांच्या बीपी, पोट, रक्त तपासणीपासून सोनोग्राफी व औषधोपचार सर्व मोफत उपलब्ध होते.
या तपासणीमध्ये मला तिथल्या स्त्रियांचे राहणीमान, समस्या, कष्टाचे काम, कुटुंबव्यवस्था , त्यांचे सामाजिक स्थान, कुपोषण, वारंवार राहणारा गर्भ, कधी गर्भपात, तर कधी पोटात किंवा जन्मल्यावर मुल दगावणे अशा बऱ्याच आरोग्य समस्या लक्षात येऊ लागल्या. प्रोलाप्सचे प्रमाण तर भरपूर होते. कुटुंब नियोजनाबद्दल तर तिथे खूप अज्ञान होते व सुविधा उपलब्ध नव्हत्या.
एक स्त्री आली , ती तर १० व्या वेळेस गर्भवती होती. का तर, आधीच्या ९ मुलीच होत्या. ती खूप कुपोषित होती, त्याहीपेक्षा जास्त ती उदास व निराश दिसत होती. तिचा चेहरा भावशून्य होता, असे वाटत होते जशी ती सर्व संवेदनांच्या पार गेली होती. बराच वेळ मी तिला समजावत होते, पण मला हेही कळत होते की तिच्या कुटुंबाने तिला जबरदस्तीने हे ओझे लादले होते. तिचा यात काय दोष ? आजही तिचा तो माणूसपणाच्या पलीकडे गेलेला भावविरहित चेहरा मी विसरू शकत नाही. एका गर्भवती महिलेच्या सोनोग्राफी मध्ये दोष आढळला. लवकरात लवकर सीझर करून बाळ वाचवणे आवश्यक होते. नाहीतर कोठल्याही क्षणी बाळ पोटात मरून गेले असते. मी त्यांना आधी शांत भाषेत समजावले, परंतु तिची सासू ऐकायलाच तयार नव्हती, गर्भवतीला दवाखान्यात न नेता घरीच बाळंतपण करायची तिची घाई होती. शेवटी मला बाळ कधीही पोटात मरेल असे स्पष्ट भाषेत सांगावे लागले, ते ऐकून रडारड सुरु झाली. हिमांशु येऊन मलाच विचारू लागला की तू असे काय बोललीस की सर्व कुटुंब घाबरले ? पण भीतीमुळे त्यांनी लवकर तिला शहरात दवाखान्यात हलवले व तिथे सीझर होऊन आई व बाळ सुखरूप राहिले.
खनस्यूला एक रुग्ण भेटली. तिला तपासल्यावर मी तिची सोनोग्राफी सांगितली. तर तिला एक्टोपिक गर्भ होता. म्हणजे नॉर्मली जो गर्भ गर्भपिशवीत असतो, तो तिच्या गर्भनलिकेत होता. असा गर्भ मोठा होऊ लागला की कधीही पोटात फुटू शकतो व अशा स्थितीत महिलेला लवकरात लवकर, काही तासांच्या आत दवाखान्यात नेऊन ऑपरेशन करावे लागले. दवाखान्यात पोहोचायला उशीर झाला तर महिलेचा जीव जाऊ शकतो. आम्ही तिच्यावर जीवघेणी परिस्थिती ओढवायच्या आधीच तिचे निदान केले होते. ती एकटीच आली होती, तिला आम्ही सर्व समजावले. ती म्हणाली की घरी जाऊन ती नवऱ्याशी बोलेल व लगेच शहराकडे रवाना होईल. संध्याकाळी मुन्नीदी व भावना दोघी त्या स्त्रीच्या घरी गेल्या, ती दवाखान्यात गेली की नाही, नसेल तर कधी जाणार ते विचारायला. तिथे तिचा नवरा भेटला. त्याने सांगितले की तो त्याच्या बायकोला दवाखान्यात नेणार नाही. भावनाने सोनोग्राफी दाखवून, चित्र काढून त्याला त्याच्या बायकोचा आजार समजावला, जीवाला असलेला धोका सांगितला, तरी तो ऐकतच नव्हता. शेवटी भावनाने त्याला चिडून विचारले की “अगर वोह मर गयी तोह क्या करोगे ?” त्यावर तो हसून तिला म्हणाला, “दुसरी शादी कर लूंगा.” भावनाला ते ऐकून धक्काच बसला. नंतर २ दिवस तिला एकसारखे तेच आठवत होते, “माम, वोह ऐसे कैसे बोल सकता है ?”
कधी गर्दी कमी असली की आम्ही निवांत रुग्णांशी गप्पा मारत तपसणी करायचो. त्यामुळे त्यांच्या समस्या, घरची काळजी समजायची. कधी मी एखाद्या स्त्रीला कॉट वर झोपायला सांगायचे. तपासायचे. तपासून झाले की परत टेबलपाशी येऊन औषधे लिहायचे. मग पुढच्या पेशंटला बोलवायचे. असेच एकदा गडबडीत एक पेशंट कॉट वर झोपली आहे ते मी विसरले. नंतर थोड्या वेळाने पुढची पेशंटला तिकडे नेले, तर बरीच आधी तपासलेली ती महिला तशीच झोपली होती. म्हटलं, “आप अभीभी इधर लेटे हो ?” तर तिचे उत्तर, “आपले बोला नाही उठने के लिये”
रोज सकाळी उठले की मी पहाडावर किंवा नदीकिनारी फिरायला जायची. तो पूर्ण प्रदेशच खूप सुंदर होता. तिथे बिबट्यांचा वावर पुष्कळ होता. बिबट्याच्या गोष्टी खूप ऐकल्या पण पहायला मिळाला नाही. लांडगे मात्र दिसले फिरताना. ८ तारखेला शेवटचा कॅम्प संपवून आम्ही सतोलीला परत निघालो. माझ्या मनात मात्र या ८ दिवसातील, वेगवेगळ्या गावांच्या असंख्य आठवणी होत्या.

2/21/17

उत्तराखंड भाग ३


पहाड आणि तेथील जंगल, झाडे, घरे याबद्दल थोडेफार लिहिलेय. पण पहाडी लोकांबद्दल लिहायचे अजून राहिलेय.
खरेतर पहाडी लोक असा शब्दप्रयोग खूपवेळा वाचनात आला होता. परंतु त्या शब्दावर कधी विचार करायची गरज पडली नाही किंवा तसा विचारच केला नाही. हलद्वानी या गावापासून जेव्हा मी सतोलीला टेक्सीने निघाले आणि लवकरच सपाट प्रदेश संपून आम्ही पहाडातून प्रवास सुरु केला , तेव्हा कुठे मला पहाडी प्रदेश या शब्दाचा खरा अर्थ लक्षात येऊ लागला. कारण आम्ही नुसते एका पहाडावरून दुसऱ्या , तेथून तिसऱ्या असे फक्त पहाडातच प्रवास करत होतो. जी काही गावे लागत होती, ती त्या पहाडांवरच होती. जेवायला आम्ही थांबलो, ते गाव सुद्धा असेच एका पहाडावर वसलेले होते. मी टेक्सीतून उतरले, एका रोडसाईड धाब्याकडे गेले. आजूबाजूला नुसते पहाडच पहाड, आणि हा धाबापण असाच एका पहाडी वळणावर विसावलेला. तिथे पराठे आणि पहाडी आलू स्पेशल डिश खाताना माझे विचार चालू होते, “अरे, खरेच हे लोक शब्दशः पहाडावरच राहतात, यांची गावे, शेती, बाजार, जगणे मरणे सगळे पहाडावरच तर आहे.”
पुढे एका वळणावर तर मला आणखी एक दृश्य दिसले. एका पहाडाच्या रस्त्याला लागून असलेल्या उतरणीवर एक भलामोठा वृक्ष होता आणि त्याच्या एका बऱ्याच उंचीवरच्या फांदीवर एक स्त्री चढलेली. मला तर आश्चर्याचा धक्काच बसला. हे मला झालेले धाडसी पहाडी स्त्रीचे पहिले दर्शन!! त्यानंतर मग रस्त्यांवर गवताचे प्रचंड मोठे मोठे भारे आपल्या डोक्यावर वाहणाऱ्या पहाडी स्त्रिया दिसतच राहिल्या. ते भारे जवळ जवळ त्या स्त्रियांच्या उंची एवढेच मोठे मोठे असायचे, डोक्यावरच्या भाऱ्यामुळे त्यांचा चेहरा दिसायचाच नाही, त्यांना पुढचा रस्ता कसा काय दिसत असेल याचेच मला नवल वाटत राहिले. एकही पुरुष मला असा भारा वाहताना दिसला नाही. स्त्रियांच्या या कष्टांची किंमत त्यांचे शरीर कशाप्रकारे मोजते आहे, याची झलक एक डॉक्टर म्हणून मला पुढल्या काही दिवसात पहायला मिळणार आहे, याची मला किंचितही कल्पना त्यावेळेला नव्हती.
सतोलीच्या हॉस्पिटलमध्ये असताना , माझा दुसराच दिवस होता तेव्हा, एक स्त्री व तिचा नवरा तपासणीसाठी आले. तिचे वय फक्त २४ वर्षेच होते. मी तिला तपासले आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण तिची गर्भपिशवी पूर्णपणे बाहेर आलेली होती. बरेच दिवस ती तशीच बाहेर लटकत राहिल्याने त्यावर जखमा झालेल्या होत्या. वास येत होता. खरेतर अशा प्रकारचा आजार हा पाळी निघून गेलेल्या, ५०-६० वयाच्या वयस्कर स्त्रियांमध्ये दिसून येतो. याला आम्ही प्रोलाप्स असे म्हणतो. महिला याला “अंग बाहेर येणे” असा शब्दप्रयोग वापरतात. गर्भपिशवी ही लीगामेंटस व स्नायूच्या सपोर्टने तिच्या नॉर्मल जागेवर धरून ठेवलेली असते. विविध कारणांनी हा सपोर्ट कमजोर पडून गर्भपिशवी व तिच्यासोबत लघवीची पिशवी, संडासची जागा हे नॉर्मल जागेवरून हळूहळू खाली सरकू लागतात. त्यानुसार आम्ही त्याचे 1st , 2nd , 3rd डिग्री व complete prolapse वर्गीकरण करतो. जास्त म्हणजे 2nd, 3rd डिग्री व complete prolapse ला स्त्रियांच्या वयानुसार विविध शस्त्रक्रिया लागतात. अशा आजाराच्या खेड्यातल्या वयस्कर स्त्रिया लाजेने वेळीच दवाखान्यात येत नाहीत आणि मग आजार वाढतो, जखमा होतात तेव्हा येतात. तोपर्यंत मग शस्त्रक्रियेची गुंतागुंत वाढलेली असते. गडचिरोली जिल्ह्यात मी होते, तिथे तर एक अंधश्रद्धा होती की ज्या स्त्रियांचे लग्नाबाहेर परपुरुषासोबत संबंध असतात, त्यांना हा आजार होतो. त्यामुळे तर मग तिथे अशा आजाराच्या स्त्रिया कोणालाच काही सांगत नाहीत. सहन होण्याच्या पलीकडे त्रास गेल्यावर मगच दवाखान्यात येतात.
प्रोलाप्स होण्याच्या कारणांमध्ये सतत होणारी बाळंतपणे, दोन बाळंतपणामध्ये अगदी कमी कालावधी असणे, लहान वयातच बाळंतपणे होणे, चुकीच्या पद्धतीने कळ देणे, घरीच बाळंत होणे, रजोनिवृत्तीनंतर आधीच कमजोर झालेले लिगामेंट आणि स्नायू नैसर्गिकरित्या आणखी कमजोर होऊन गर्भपिशवी खाली सरकणे. या कारणांशिवाय कुपोषण, गर्भवतीने पौष्टिक आहार न घेणे, गर्भवतीला रक्तक्षय असणे ही कारणे पण आहेत. तसेच स्त्री बाळंत झाल्यानंतर तिने दीड महिना आराम केला पाहिजे, कष्टाची कामे बिलकुल करू नयेत. कारण बाळंतपणाच्या वेळेस स्त्रीच्या शरीरावर ओटीपोटाच्या स्नायूंवर ताण आलेला असतो, त्याला आराम मिळून त्यांची ताकद पुनः भरून यायला तेवढा वेळ द्यावा लागतो.
आपल्या भागातील तरुण स्त्रियांमध्ये 1st 2nd डिग्री प्रोलाप्स दिसून येतात. परंतु त्यापेक्षा जास्त मात्र चुकून एखादीला दिसतो.
इथे सतोलीमध्ये मात्र २४ वर्षाच्या स्त्रीला इतक्या टोकाचा आजार पाहून मी विचारात पडले. तिथल्या नर्सचे मात्र म्हणणे पडले की हे खूप कॉमन आहे या पहाडी भागात. खूप स्त्रियांना असा आजार दिसून येतो. मी मात्र खूप अस्वस्थ झाले होते त्या स्त्रीला पाहून. तिच्या गर्भपिशवीला १५ दिवस औषधाने ड्रेसिंग करून, जखमा बऱ्या करून, सूज कमी होऊ देऊन मग तिचे ऑपरेशन करता येणार होते.
इतक्या कमी वयात हिला कसा काय पूर्ण प्रोलाप्स झाला ? हिने कमी त्रास असतानाच का नाही तपासणी करून घेतली ? हिला एक वर्षापासून इतका जास्त त्रास आहे, तर ही त्रास सहन करत कशी काय काम करत असेल ? डॉ. सुशील सरांशी बोलून माझ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली. तेथील गरिबी, भौगोलिक परिस्थिती, स्त्रियांवरचा कष्टांचा बोजा आणि आरोग्य सुविधांचा अभाव या सर्व गोष्टींमध्ये तिच्या आजाराचे मूळ सामावले होते. गरिबीमुळे लहानपणिपासूनचे कुपोषण, गर्भवतीला न मिळणारा पौष्टिक आहार, कष्टांची कामे, त्यात महत्वाचे म्हणजे जड गवताचे भारे डोक्यावरून वाहून नेणे. भौगोलिक परिस्थिती यासाठी की तिथल्या महाकाय डोंगरांवरून सततची चढ उतरण चालूच, त्यात डोक्यावर मोठाले गवताचे भारे किंवा इतर जड सामान. यामुळे स्त्रीच्या ओटीपोटात जास्त ताण येतो व तिथल्या स्नायूंवर, लिगामेंटस वरचा ताण वाढतो, पर्यायाने गर्भपिशवीचा सपोर्ट हळूहळू कमजोर होत जातो. तसेच भौगोलिक परिस्थितीचा आणखी एक तोटा की स्त्रीला बाळंतपणाच्या कळा सुरु झाल्यावर तिला तिच्या डोंगरातील प्रदेशातून आरोग्यसुविधा असलेल्या शहराच्या ठिकाणी जायला वाहन मिळत नाही. बऱ्याच वेळा तिला कॉटची पालखी करून काही किलोमीटर चढ उतार पार करून, तेथून डांबरी रस्ता असलेल्या ठिकाणी नेले जाते. तेथून मग बरेच पैसे मोजून शहरापर्यंत पोहोचवले जाते. ही पूर्ण प्रक्रिया होईपर्यंत बऱ्याच स्त्रिया घरीच बाळंत होऊन जातात. तर काही लोकांकडे वाहनासाठी पैसा नसल्याने, शहराची भीती वाटत असल्या कारणाने ते घरीच बाळंतपणाचा पर्याय स्वीकारतात. तिथे काही ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे व त्यापेक्षा लहान डीस्पेन्सरीज आहेत. परंतु तिथे एकही डॉक्टर व नर्स नसते. तिथे दाईच बाळंतपण करतात. एकदा मी तिथे दाई मिटिंग मधे सर्वांना प्रश्न विचारला की तुम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात का जात नाहीत ? तर एका दाईने सांगितले, “आम्ही नेतो तिथे स्त्रियांना, आम्हाला पण वाटते की औषधे मिळावीत, बाळंतपणे सुखरूप व्हावीत परंतु एकदा गेलो तर तिथे डॉक्टर, नर्स कोणीच नाहीत. वर पाणी पण नाही. शेवटी मीच इकडून तिकडून पाणी गोळा करून आणले आणि केले त्या बाईचे बाळंतपण.” यावर मी निरुत्तर झाले.
घरी होणाऱ्या बाळंतपणामध्ये स्त्रियांना रक्तस्त्राव होऊन त्यांचे मृत्यू होण्याचे प्रमाण बरेच आहे. तसेच कुपोषण आणखी वाढणे, रक्तक्षय होणे, जंतुसंसर्ग होणे, बाळ पोटातच किंवा जन्मल्यानंतर मरणे, बीपी वाढून फिट येणे, सतत गर्भपात होणे, अशी बरीच गुंतागुंत निर्माण होते.
बाळंत झाल्यावर या स्त्रिया बिलकुल आराम करत नाहीत. लगेच १-२ दिवसात त्यांची कष्टांची कामे सुरु होतात. हेसुद्धा तरुण वयामध्ये प्रोलाप्स होण्याचे महत्वाचे कारण आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर व नर्स नसल्याने त्यांना कुंटुंब नियोजनाबद्दल माहिती द्यायला कोणीही उपलब्ध नाही. त्यामुळे प्रत्येक स्त्रीला दरवर्षी मुल होते व प्रत्येकीला कमीत कमी ४ मुले तरी होतात. एक गर्भवती स्त्री तर १० व्या वेळेस गरोदर होती, कारण पहिल्या ९ ही मुली होत्या.
संध्याकाळी आम्ही हॉस्पिटलमधून सुकूनकडे, म्हणजेच आमच्या राहण्याच्या ठिकाणी परत जाताना माझे मन खूप उदास होते. काही केल्या त्या स्त्रीला मी विसरू शकत नव्हते. सुशील सरांशी चर्चा करत रस्ता संपत होता. आता मला समजत होते की यांना स्त्रीरोग तज्ञाची इतकी तातडीची गरज का आहे ते. पुढचा माझा महिना पूर्ण प्लान केला होता. पहिले ८ दिवस मोबाईल मेडिकल युनिट म्हणजेच फिरत्या दवाखान्यासोबत स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम करणे, नंतर १५ दिवस दाई प्रशिक्षण कार्यक्रम आखणे व राबवणे आणि शेवटचे ७ दिवस पिंडारी ट्रेक मध्ये डॉक्टर म्हणून जॉईन होणे.
डॉ. हिमांशु सोबत आरोहीच्या हॉस्पिटलमध्ये डॉ. तेजस्वी म्हणून डेंटिस्त काम करते. ती शेजारच्या एका शहरातून जॉबसाठी तिथे आलेली. तिच्याकडे पाहिले की पहाडी सौंदर्य काय याचा प्रत्यय मला आला. सफरचंदासारखे गुलाबी गाल आणि लाघवी बोलणे हे तिचे स्पेशल फीचर्स. तिच्या गोड स्वभावाने आमची पक्की मैत्री जमली. मला सर्व माहिती सांगणे, तिथे अडजस्ट होयला मदत करणे, तेथील स्टाफशी ओळख करून देणे असे सगळे ती प्रेमाने करायची.
माझ्यासोबत आणखी २ मुली रिंकी व भावना तिथे नर्स म्हणून जॉईन झाल्या होत्या. दोघी पण पहाडी मुली. परंतु माझ्यावर त्यांचे फार प्रेम. तसेच कामात भरपूर उत्साह. सतत मला हे शिकवा , ते शिकवा म्हणून मागे लागणार. यातील भावना माझ्यासोबत फिरत्या दवाखान्यासाठी येणार होती. तर मुन्नी दीदी म्हणून, बऱ्याच वर्षांपासून आरोही सोबत काम करणारी, पेशंटच्या रजिस्ट्रेशनची जबाबदारी सांभाळणारी व स्टाफची व्यवस्थापक म्हणून काम पाहणारी बोल्ड स्त्री होती. एक त्रास देणारी नर्स पण होती. फार्मसी सांभाळणारा तरुण प्रदीप, रक्त तपासणी करणारे जगदीशदा , एक्स रे करणारे प्रकाशदा असे सारे माझ्या चांगल्या ओळखीचे झाले होते. आमची छान टीम जुळली होती. पुढचे ८ दिवस फिरत्या दवाखान्यामध्ये आम्ही सारे एकत्र काम आणि फुल दंगामस्ती करणार होतो.

11/28/16

उत्तराखंड भाग - २


उत्तराखंड - २

पहाडावरील त्या लाकडी घरात राहणे खूपच आनंददायी होते. लाकडाचे असल्याने त्याला वेगळेच देखणेपण लाभले होते. आजूबाजूला पूर्ण जंगल पसरलेले होते. त्या पूर्ण पहाडावर वेगवेगळ्या ठिकाणी घरे वसली होती. आरोहीचे ऑफिस व हॉस्पिटल पहाड उतरून गेल्यावर खाली पायथ्याजवळ होते.
आम्ही, म्हणजेच मी व हिमांशु सकाळी ९ ला निघायचो. कधीकधी माधुरी, जमाल हे आरोही सोबत काम करणारे volunteers भेटायचे. काधीकोणी foreigner visitor, medical student किंवा माझ्यासारखेच short time volunteer पण सोबत असायचे. बाहेर पडले की सुशील सरांचा डोरेमोन व आणखी एक कुत्रा आमच्या मागे मागे थोडे अंतर यायचे. त्यांची हद्द संपली की परत फिरायचे. रस्त्यात जाताना दूर दूर अंतरावर एखादे घर लागायचे. तिथे घराच्या आजूबाजूला विविध फळझाडे,फुलझाडे , भाज्या लावलेल्या असायच्या. मधेच कोणी शेतकरी गायी, बकऱ्या चरायला घेऊन जाताना भेटायचा. पहाडावर नैसर्गिकरीत्या खूप सुंदर, आकर्षक रंगाची फुले फुललेली दिसायची. ना कोणी लावलेली, ना कोणाची निगराणी असलेली ती जंगली फुले कुठल्याही बागेतल्या शोभिवंत फुलांपेक्षा सुंदर होती. विविध प्रकारचे मशरूम, शेवाळेही दिसायचे.
तिथे सर्वत्र दिसत होती ती पाईन जातीची झाडे. खरेतर त्या प्रदेशात पूर्वी मुबलक प्रमाणात देवदार व ओक वृक्ष होते. ते वृक्ष त्या त्या प्रदेशातील जमिनीमध्ये पाणी टिकवून ठेवणारे व हवेत ओलावा निर्माण करणारे आहेत. परंतु ब्रिटीश लोकांनी बऱ्याच प्रदेशातील ती झाडे पूर्णपणे तोडून टाकून पाईन लावले. पाईनचे फायदे हे की त्यापासून रंग, टर्पेनटाइन मिळते. परंतु त्यांचे तोटे असे की ते जमिनीतील पाणी जास्त वापरतात व हवामान उष्ण करतात. याचा परिणाम होऊन सतोली मधलेही पूर्वीचे नैसर्गिक थंड हवामान जाऊन तिथे उष्ण हवामान झाले आहे.
त्या रस्त्यावरून जाताना चढ उतार असायचा. मी पूर्ण थकून जायचे. मग मधे मधे ब्रेक घेत मी हॉस्पिटलमध्ये पोहोचायचे. संध्याकाळी ५- साडे ५ ला आम्ही परत निघायचो. कधी ६-साडे ६ वाजले तर अंधार पडायला सुरुवात होयची. मग घाई-घाईमध्ये आम्ही झपझप पाय उचलत चालायचो. कधी पाउस सुरु झाला की मग तर तारांबळ उडायची. पावसामुळे आणखी एक समस्या निर्माण व्हायची...जळवांची! पाउस पडला की जळवा बाहेर पडायच्या. त्या पायाला चिटकल्या व रक्त पिऊ लागल्या तरी बिलकुल दुखत नाही. त्यामुळे त्या पायाला लागलेल्या पण समजत नाही. मग त्या तशाच रक्त पीत राहतात व फुगून मोठय टम्म झाल्या की त्यांच्याच भाराने आपोआप गळून पडतात. अशीच एके दिवशी मी घरी परतले तेव्हा पाय धुवायला बाथरूममध्ये गेले. पायांकडे पाहिला तर काळे काळे ठिपके दिसले. मी पायांवर पाणी सोडले तरी ते जाईना. उलट ते लांब लांब होऊ लागले, वळवळू लागले. तेव्हा माझ्या लक्षात आले की ते दुसरे तिसरे काही नसून जळवा आहेत. मी आयुष्यात पहिल्यांदाच जळवा पाहत होते. मी घाबरून ओरडत बाहेर आले. पण नेमका हिमांशु जमालच्या घरी गेलेला. शेवटी पायाला लागलेल्या त्या ५-६ जळवा मी ओढून काढल्या. त्यानंतर २०-२५ मिनिटे तेथून रक्त येत राहते. त्याला मग कागद चिटकून टाकला. थोडा वेळाने हिमांशु परतला तेव्हा त्याने मला उपाय सांगितला की जळवा लागल्या की त्यांच्यावर मीठ टाकायचे म्हणजे त्या आपोआप गळून पडतात. ओढून काढल्या की मग महिनाभर त्या जागी खाज सुटत राहते. हाय !! त्याला म्हटलं , इतके दिवस सर्वांनी मला जळवांच्या स्टोऱ्या ऐकवल्या, पण एकाने पण इतका सोपा उपाय सांगितला नाही.
सकाळी ७ ला उठून मी बाल्कनी मधे यायचे. समोर पाहिले तर मस्त धुक्याने भरलेली दरी दिसायची. घर पूर्ण धुक्यात हरवलेले असायचे. जसा दिवस सुरु होईल तसे तसे ते धुके निवळत जायचे. असेच एके दिवशी आम्ही खाली म्हणजेच हॉस्पिटलकडे जात असताना पूर्ण धुके निवळले व दूरवर डोळ्यांच्या लेवलला हिमालयाची बर्फाच्छादित शिखरे स्पष्टपणे नजरेस दिसू लागली. आम्ही दोघेही आनंदाने , भरल्या मनाने ती पाहू लागलो. हिमांशूने सांगितले की बऱ्याच महिन्यानंतर आज धुके निवळून ती शिखरे दृष्टीस पडली होती. तो उत्साहाने मला त्यांची नावे सांगू लागला.. त्रिशुल, नंदादेवी, पंचचौली. मला तर किती फोटो काढू आणि किती नको असे झाले होते. पुढे मी एक महिना तिथे असेपर्यंत रोज त्या शिखरांचे दर्शन होतच राहिले.
संध्याकाळी परत येताना तो रस्ता वेगळाच वाटायचा. पाईन वृक्षांच्या त्या जंगलातून जाताना मला सतत लॉर्ड ऑफ रिंग्ज या मूवीमधल्या जंगलाचाच भास होयचा. घरी पोहोचेपर्यंत ७ वाजलेले असायचे व बऱ्याच वेळा घर धुक्यामध्ये हरवून गेलेले असायचे. आमची हद्द सुरु होताच डोरेमोन व त्याचा मित्र आमच्या स्वागताला हजर असायचे. रस्त्यात आजूबाजूला राहणारे कोणीनाकोणी भेटायचे. एक वंदना आणि तिच्या २ लहान मुलांचे घर लागायचे. गप्पा मारत आम्ही यायचो. घरी पोहोचले की मी मस्त चहा बनवून बाल्कनीमध्ये खुर्ची टाकून बसायचे. खालच्या मजल्यावर हिमांशुचा गिटारचा रियाज चालायचा. त्याचे सूर कानावर पडायचे. कधी तो अर्जित सिंगची किंवा हरिहरनची गाणी लावायचा. ती सुरेल गाणी ऐकून मन प्रसन्न होऊन जायचे. घरचा किंवा मित्र-मैत्रिणीचा फोन आला की मी घराचा एक कोपरा पकडायचे. फक्त तिथेच रेंज चांगली असायची आणि मी व्यवस्थित बोलू शकायचे. रात्री कधी ब्रेड ओम्लेट तर कधी दाल खिचडी तर कधी कोणी मशरूम पास्ता बनवायचो. तिथल्या ४-५ घरांची मिळून जशी काही एक चाळच बनली होती. कधीही कोणीही कुणाच्याही घरी जाऊन खायचो, प्यायचो. सगळेजण तिथे मजेत असायचे. कोणी घाईमध्ये , टेन्शनमधे दिसायचे नाही. हिमान्शुचे यावर म्हणणे असे की पहाडावरचे भाज्या, फळे यातच एक प्रकारची शांत उर्जा असते, असे अन्न खाल्ल्याने आणि पहाडाच्या मोकळ्या हवेत राहिल्याने आपोआपच इथे राहणारी माणसेही शांत होऊन जातात.
रात्री झोपताना एक नवीनच समस्या उभी राहिली. तिथे खूप सारे मोठ-मोठ्या आकाराचे कोळी असायचे. रात्र झाली की ते किडे शोधात भिंतीवर यायचे. सुमारे १०-१२ मोठाले कोळी भिंतीवर फिरताना बघून माझी झोपच उडून जायची. एक तर सर्वात मोठ्ठा आणि जाडा, चांगला पंजाएवढा होता. भीतीने मी लाईट पण चालूच ठेवायचे. मी सुशील सरांकडे तक्रार केली त्या स्पाईडर्सची. तर त्यांचे म्हणणे की “They are so innocent. They also get scared because of us. Make friends with them!!” आणि खरेच तसे झाले. काही दिवसांतच माझी भीती जाऊन उलट मला त्यांची सवय होऊन गेली. म्हटलं , उलट आता परत गेल्यावर मी मिस करेन त्यांना.
कधीकधी मला मध्यरात्री जाग यायची. पाहते तर लाईट गेलेली असायची. सगळीकडे मिट्ट काळोख पसरलेला. अशा रात्री आपण पहाडावर एका जंगलाच्या मध्यात एका लाकडी घरात एकट्याच आहोत, या विचारानेच मला भीती वाटायची. काचेच्या खिडक्यांवर मी पडदे ओढून घेतलेले असायचे. परंतु वरती छतावर एक मोठा काचेचा चौकोन होता दिवसा प्रकाश आणि ऊन येण्यासाठी. पण रात्रीच्या वेळी फार भीती वाटायची. किती प्रकारचे प्राणी आपल्या घराच्या अवतीभवती , या छतावर यावेळी फिरत असतील अशा विचारांनी माझी झोप उडायची. मग टोर्च लावून तिच्या उजेडात भीती घालवायचा प्रयत्न करत मी कधितरी झोपी जायचे.
पण अशाच एका अंधाऱ्या रात्री विचार आला की माणसाला आगीचा शोध लागण्याआधी माणूस या पृथ्वीवर, कसा जगत असेल, हिंस्त्र प्राण्यांपासून स्वतःचा बचाव कसा करत असेल. आगीचा शोध म्हणजे APES च्या Evolution मधील किती महत्त्वाची पायरी अथवा Turning point होता हे पहिल्यांदाच जाणवले.


11/25/16

उत्तराखंड भाग १

कालच तर मी दिल्लीला पोहोचले होते. पहिल्यांदाच दिल्ली पाहिली. उत्साहात कुतुबमिनाराच्या आजूबाजूला फिरले, फोटोग्राफी केली. आज सकाळी दिल्लीवरून ट्रेनने ४-५ तासांचा प्रवास करून मी काठगोदामला उतरले. तिथे दिनेश Taxi थांबवून माझी वाटच पाहत होते. तेथून पुढे तीन तास प्रवास करून आम्ही सतोलीला पोहोचणार होतो.
या पूर्ण प्रवासात मी मनोमन आश्चर्य करत होते की हे सर्व घडलेच कसे. खरेतर १५ दिवसांपूर्वी माझा कन्याकुमारीला जायचा बेत होता. कन्याकुमारीच्या विवेकानंद आश्रमात मी योगा क्लासचे बुकिंग पण केले होते. फक्त आता विमानाचे तिकीट बुक करणे बाकी होते आणि अचानक मी डेंगूने आजारी पडले. तापाने मी बरीच खंगून गेल्याने माझा कन्याकुमारीचा कार्यक्रम आपसूकच रद्द झाला.
मी जुना जॉब नुकताच सोडला होता. जुन्या कामाच्या ठिकाणी माझी बरीच ओढाताण झाली होती, मानसिक त्रास झाला होता. त्यामुळे दूर कुठेतरी जाऊन मनन चिंतन करावे, महिनाभर शांत जागी जाऊन राहावे असे विचार मनात येत होते. घरी बसल्याबसल्या माझे कुठे जावे यावर गुगलिंग चालूच होते. अशातच whats app वर एक मेसेज येऊन थडकला. “ Urgently need a female gynecologist, who loves mountains and likes trekking, need to take health check camps in villages of Uttrakhand for 1 month, good salary “. हा मेसेज वाचताच मी तेथे जायचे नक्की केले. परंतु मला विश्वासच बसत नव्हता की हा मेसेज खराखुरा आहे. जसे काही मी स्वप्न पाहत होते. मला हवी ती गोष्ट अशी आश्चर्यकारक रित्या सत्यात उतरली होती. हा मेसेज आरोही या उत्तराखंडमध्ये काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेतर्फे पाठवला गेला होता. त्यांच्यासोबत नेहमी काम करणारी स्त्रीरोगतज्ञ एका महिन्यासाठी येऊ शकत नसल्याने त्यांना तातडीने दुसऱ्या स्त्रीरोगतज्ञाची गरज होती.
मेसेजला रिप्लाय करताच आरोही या NGO चे प्रमुख डॉ. सुशील शर्मा यांच्याशी फोनवर माझे बोलणे झाले. त्यांचा आवाज मला खूप आश्वासक वाटला व आमच्या अर्ध्या तासाच्या बोलण्यातच माझ्या सर्व शंका दूर होऊन पुढील आठवड्यातच माझे उत्तराखंडला जाण्याचे नक्की झाले व प्रवासाचे सर्व बुकिंगही झाले. आरोही ही N.G.O उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यातील खेड्यांमध्ये शिक्षण, रोजगार व आरोग्य या घटकांवर काम करते. सतोली या पहाडी गावात संस्थेचे मुख्य कार्यालय व दवाखाना असून आजूबाजूच्या ५०-६० गावात आरोहीचे काम चालते.
तर अशाप्रकारे गेल्या १५ दिवसात कन्याकुमारी ऐवजी मी दिल्लीला पोहोचले होते. उत्तरेला प्रवासाची ही माझी पहिलीच वेळ. पहाडी प्रदेश, पहाडी लोग हे फक्त ऐकुनच माहित होते. त्यामुळे डॉ. सुशील यांनी मला, तुला पहाडी भागात काम करायचे आहे, असे सांगितले असले तरी पहाडी भाग कसा असतो याची मला काहीही कल्पना नव्हती. गुगल map वर मी सतोली व काठगोदाम शोधले होते. आम्ही नैनिताल जिल्ह्यात असल्याने काठगोदाम रेल्वे स्थानकावर पर्यटकांची भरपूर गर्दी होती. आमचा काठगोदाम ते सतोली प्रवास सुरु झाला. जाताना बऱ्याच ठिकाणी नैनितालचे बोर्ड दिसत होते, ते नाव वाचूनच मी उल्हसित होऊन गेले. मग हळूहळू खरेखुरे पहाड नजरेस पडायला सुरुवात झाली. एक पहाड संपला की लगेच पुढचा. रस्ता पूर्ण वळणा-वळणांचा. रस्त्यात आम्हाला भीमताल गाव लागले. तिथे थोडावेळ आम्ही थांबलो. तिथल्या अत्यंत सुंदर तलावाच्या दर्शनाने मी भारावून गेले. ताल म्हणजे तलाव. इथे खूप सारे सुंदर नयनरम्य तलाव आहेत आणि त्यांच्या वैशिष्ट्यानुसार त्यांना विविध नावे दिलेली आहेत. तिथेच बाजूला दिनेश पाणी भरून घेत होते. कुठून पाणी येत आहे हे पाहिले तर ते नैसर्गिक रित्या डोंगरावरून खाली वाहत आलेले झरे होते. त्याचे पाणी अतिशय थंड असते.
तिथून पुढे आम्ही निघालो. आता मात्र खूपच जास्त पहाड दिसू लागले. मी खुश होऊन फोटो काढायला सुरुवात केली. पण काहीच वेळात माझा उत्साह ओसरू लागला. वळणा-वळणांच्या त्या घाटदार रस्त्याने पार मला दमवून टाकले. एक तासाने तर माझी फोटोग्राफी पूर्ण बंद झाली. थकव्याने कधी एकदा मी सतोलीला पोहोचेन असे झाले.
तेवढ्यात डॉ. सुशील यांचा फोन आला. तुला ट्रेकिंग आवडते ना, असे विचारून त्यांनी मला कल्पना दिली की Taxi चा रस्ता संपल्यानंतर पुढे मला अर्धा ते एक तास चढाई करायची आहे. माझ्यासोबत बरेच सामान होते. ते न्यायला कोणीतरी येईल. मी खरेतर प्रवासाने बरीच थकून गेले होते. त्यात आणखी चढाई म्हणजे मी थोडी घाबरलेच. Taxi ने मला तेथील एका आश्रमाच्या गेटवर उतरवले. तेथून पुढे कच्चा रस्ता असल्याने चालत जावे लागणार होते. तिथे अर्धा तास आम्ही आरोहीच्या माणसाची वाट पाहत उभे होतो. त्या अर्धा तासात मनात कितीतरी विचार येऊन गेले. मुख्य विचार हाच होता की सर्व सामान परत Taxi मध्ये भरावे आणि परत माघारी जावे.
एकदाची आरोहीची २ माणसे आली आणि त्यांना मला सामानासकट सुकूनला पोहोचवले. सुकून म्हणजे डॉ. सुशील यांची पहाडावरची ४-५ घरे मिळून बनलेली प्रायवेट प्रॉपर्टी. तेथील एका दुमजली घराच्या वरच्या मजल्यावर माझी राहण्याची सोय करण्यात आलेली होती. खालच्या मजल्यावर डॉ. हिमांशू राहत होता. त्याच्याकडेच सुशील सरांनी मला सर्व माहिती देण्याची व मदत करण्याची जबाबदारी सोपवली होती.
माझ्या रूमला वेगळे किचन होते. त्यात मी नाश्ता व जेवण बनवू शकणार होते. ते पहाडावरचे जंगलाच्या मध्ये असलेले असे, लाकडाचे सुंदररीत्या बनवलेले घर होते. माझ्या रूमला मस्त गच्ची होती. तेथून समोरची दरी आणि ढग दिसत होते. सुकूनमधे त्या संध्याकाळी मी एक वेगळीच शांती अनुभवली, जी बरेच वर्षे मी हरवून बसले होते. त्या शांतीच्या अनुभवाने अक्षरशः मला रडू आले.
हिमांशुसोबत कॉफी पिताना त्याने सांगितले की धुके निवळल्यावर समोर हिमालयाची बर्फाच्छादित शिखरे दिसतात. त्या रात्री सुशील सरांनी त्यांच्या घरी मला व हिमांशुला जेवणासाठी बोलावले. जेवण सुरु करण्यापूर्वी मला सुशील सरांना पहिले अगदी मनापासून Thank you म्हणावेसे वाटले.
“ I am so much grateful to you for you invited me here.”


2/25/16

जातीचे रंग

खरेच जात आडनावात असते का ?

आपण भारतीय एवढे शिष्टाचार पाळणारे आहोत का ? कि नाव विचारून hello how are you, करून गप्प बसू ?

कामाच्या ठिकाणी एकटी मुलगी दिसली की लग्न झालं कि नाही असे थेट विचारणारे आपण. 

गाव कुठलं , या पाठोपाठ कोणत्या समाजाचे हा प्रश्न हमखास येतो.

मी डॉक्टर. निम्मे पेशंटतरी हमखास लग्न झालंय का आणि जात कोणती हे विचारतात.

गळ्यात मंगळसूत्र शोधणे व आडनावावरून जात ओळखण्याचे खेळ कोणीही करत नाही.

बोलायचा मुद्दा हा की जात काही आडनावात नसते. कपाळावरच्या टिळ्यात नसते. कि कपड्याच्या रंगात नसते.

जात दबा धरून बसलेली आहे आपल्याच मना-मनात.  सोयीनुसार आणि गरजेनुसार प्रकट होते वेळोवेळी.

जात आहेच आपल्या रोजच्या व्यवहारात.  

इतरांशी वागण्या बोलण्यात. छोट्या आणि मोठ्या गोष्टींत येतेच जात.

पण ती येते दोन्ही बाजूंनी.

जो अन्याय करतोय असं दिसतं त्याच्याही बाजूने आणि ज्यावर अन्याय होतोय असं वाटतं त्याच्याही बाजूने सुप्तपणे येतेच जात.

आजकाल आपल्या विचारांना, आवडी निवडींना, आवडत्या लेखकांना, संमेलनांना, विरोधकांना.......सगळ्याना चिकटून बसते आहे चिवट जात..

उठल्या उठल्या पहिले डोळ्यावर   आणि मेंदूवर जातीचा चष्मा घातला कि झालं . मग सोप्पं जातं चूक काय बरोबर काय, आपलं कोण परकं कोण ठरवायला.

 अशातच कोणी समर्थनाचा झेंडा घेऊन आणि कोणी विरोधाचा झेंडा घेऊन उभं राहतं लढायला. त्यांची नजर नेहमी विरूद्ध दिशेकडेच असल्याने स्वतःच्या झेंड्याचा जातीत रंगलेला गडद रंग दिसतच नाही. फक्त so called शत्रूवर मारा करणं इतकंच limited focus.

त्रयस्थाला दिसतात दोन्ही रंग. पण त्याच्यावरही विचार जबरदस्ती केली जाते एक बाजू निवडण्याची, मोठ्या आवाजातल्या घोषणा, इतिहासाचे दाखले, अन्यायाचे पुरावे, supporters ची  झुंड.. सगळं सगळं !

तटस्थतेने पाहणार्याला दिसतो एक देश..शतकांपासून जाती नुसार विभागून भांडणारा.

तर दुसरीकडे देशासमोरचे असांख्य प्रश्न ज्यांना जातीचा किंचितही वास नाही. , कदाचित त्यामुळेच त्यात कुणाला रस नसावा.

 दुष्काळ, बेकारी, पर्यावरणाचा ह्रास, प्रदूषण, चंगळवाद,  भू क, गरीबी, शहरातील वाढती लोकसंख्या,  लैंगिक शोषण,  इत्यादीना नाहीये कौणतीच जात.

ठरवलाच द्यायचा रंग त्यांनाही तर देता येऊ शकेल  आणि  मग छान रंगातील भांडणे.

समस्यांवरचे  उपाय ? तो शोधू नंतर निवांत. वेळ मिळाला तर.

इथे पहिले जातींचा खेळ आणि  राजकारण तर रंगू दे. 

11/23/15

शरीर व मन

     आपले शरीर आणि मन या एकदम जादुई गोष्टी आहेत या जमीनीवरच्या.
     हे शरीर आणि मन या चैतन्याने सळसळणार्या जिवंत गोष्टी आहेत. परंतु यांत्रिकतेने आयुष्य जगताना आपण हे वेळोवेळी विसरू पाहतो.
     वयाच्या २८ व्या वर्षी मी मनाने भयंकर निराश आणि शरीराने भरपूर जाडी झाले होते. अशा अवस्थेत मला जशी काही मी ५0 वर्षाची म्हातारी झाली आहे असे वाटू लागले होते. सर्व आशा संपलेली. आयुष्यावरची श्रद्धा संपून गेलेली. सौंदर्य शिल्लक नाही. काही करायची इच्छा उरली नाही. शेवटी ८३ किलो असे भयंकर वजन आणि निराशेच्या खोल गर्तेत अडकलेले मन यांत गुदमरून गेलेले मन यांना अचानक एका क्षणी जाग आली, कि अरे काहीतरी चुकतेय. असे जगून चालणार नाही. हे बदलायला हवे. It's now or never..!
            जर मी यावर काही उपाय शोधला नाही तर कदाचित आत्ता झालेली ही जाणीव अशीच पुसली जाईल. या असल्या सडलेल्या आयुष्याची सवयच होऊन जाईल आणि मग परत बदलावेच वाटणार नाही कदाचित कधी .
      मग खूप विचार केला कि ही अवस्था का आली ? काही वर्षांपूर्वी तर मी अशी मुळीच नव्हते.
       शरीराच्या या अवस्थेचे कारण तर obvious होते. मनाच्या नैराश्येमुळे शरीराची मंदावलेली हालचाल, काहीही व्यायाम नाही, मनात येईल तेव्हा हवे तितके काहीही विचार न करता अनियंत्रितपणे खाणे, याने वजन वाढून शरीर बेढब नाही होणार तर काय होणार ? उत्तर सापडले, मग उपाय पण ठरवला कि रोज व्यायाम, प्राणायाम व आहारनियंत्रण, योग्य खाणे.
  खरेतर शरीर व मन एकमेकांशी connected असतात. एक बिघडले कि त्याचा परिणाम दुसर्यावर होतो. तसेच उलट पण होते कि आपण एकाची काळजी घेतली कि दुसर्यावर पण परिणाम होतो. उदाहरण द्यायचे झाले तर, मन दुःखी असले कि शरीर मंदावते. काहींना भूक लागत नाही तर काहीजण दुःख झाले कि खूप जास्त खाऊ लागतात, junk food, sweets, chocolates अति खाऊन वजन वाढते. तसेच उलट पण होते. रोज न चुकता व्यायाम केल्याने, सकाळी उठून walk किंवा jogging केल्याने मनाचे नैराश्य दूर होऊन मन आतून आनंदी होते.
         शरीराचे उत्तर सापडले होते.
          मन इतके रसातळाला का गेले होते ? घटस्फोट झाला होता हे महत्वाचे कारण होतेच. पण तेवढे पुरेसे नव्हते. आणखी पण बरेच काही होते. त्यात पुन्हा divorce मुळे आलेलं नैराश्य.
        यातून बाहेर कसे पडायचे ?
  अशाच एका रविवारी 'सप्तरंग' वाचत होते. त्यातील नेहमीच मी सर्वप्रथम संदीप वासेलकरांचा लेख वाचते. त्या दिवशीच्या लेखाचा आशय होता कि आजच्या तरूणांनी फक्त भौतिक सुखसोईंमध्ये अडकून न पडता सामाजिक सुधारणांसाठीही झटले पाहिजे. त्यांचा प्रश्न होता आजची तरूणाई हरवली आहे भौतिक सुखाच्या मागे धावत. सामाजिक जबाबदारीचे भान कमी होते आहे आजच्या तरूंणामध्ये.
     मला ते कुठेतरी click झालं. अंधारात उजेडाची तिरिप पडावी तसं झालं. आयुष्यात पुढे काय करायचे ते अचानक उमजून आले. लक्षात आले की मी भौतिक यशाच्या मागे आंधळेपणाने इतकी धावत सुटले होते कि त्यात माझी जीवनमूल्येच मी हरवून गेले होते. दिशेविना रस्ता जसा भरकटतो तसेच Principles आणि श्रद्धा यांच्या शिवाय माझं आयुष्यच भरकटलं होतं. यावर उपाय काय ?
      तेव्हा आठवले, अकरावीत असताना वाचलेले डॉ. अभय बंग यांचे पुस्तक "माझा साक्षात्कारी ह्दय रोग". तेव्हापासून डोक्यात होते कि कधीतरी या Great व्यक्तीकडे जायचे. आता तो क्षण आला होता. निर्णय घेतला आणि गडचिरोलीजवळ असणार्या डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांच्या शोधग्राम येथील SEARCH च्या दवाखान्यात मी Medical Officer म्हणून रूजू झाले.
      तिथे रोज संध्याकाळी प्रार्थना असते. त्यानंतर नायना (डॉ. अभय बंग) हे सर्वांना मार्गदर्शन करतात. ते ऐकणे, दिवसभर campus मध्ये त्यांचे होणारे दर्शन, morning walk ला त्यांच्यासोबत गेल्यावर होणार्या गप्पा या सर्वातून मी घडत गेले. Principles आणि faith पुन्हा सापडले. तिथे माझ्यावर निरपेक्ष प्रेम करणारी, माझ्यातील विश्वास पुन्हा जागवणारी, जीव लावणारी, हक्काने रागवणारी, काळजी करणारी, अशी माणसे भेटली. भरभरून प्रेम केले सार्यांनी माझ्यावर. तेथे जसा पुन्हा नव्याने जन्म झाला माझा.
     तसेच तिथे मी नियमित व्यायाम सुरू केला. तिथे campus च्या आजूबाजूला जंगल पसरलेले आहे. खूप सुंदर वृक्ष , झाडे वेली व त्यावर असंख्य सुंदर पक्षी, मधेच तलाव असा सुंदर निसर्ग. Duty तून वेळ मिळेल तसे सकाळी चालायला जायचे व एखाद्या प्रचंड व सुंदर मोहाच्या वृक्षाखाली ध्यान करायचे असा नित्यक्रम बनून गेला. मग मी सायकल विकत घेतली गडचिरोलीवरुन. संध्याकाळी आजूबाजूच्या खेड्यात माझी सायकल रपेट होऊ लागली. त्याने शरीरावरची चरबी जशी वितळत गेली. आहार तर सुधारला होताच. तिथे junk food तर नव्हतेच. या सर्वामुळे वजन कमी झाले. पुन्हा मी पंचवीशीची दिसू लागले. त्यामुळे आत्मविश्वास वाढला व मन प्रसन्न राहू लागले.
       तेथे गेल्यावर नायनांना मी पहिला प्रश्न विचारला होता, नायना, माझी आयुष्यावरची श्रद्धा संपली आहे. काय करू ?
     "स्वतःच्या दुःखापेक्षा मोठं ध्येय समोर ठेव. स्वच्या पलीकडे जाणारं ध्येय ठेव."