बरेच दिवस लिहीले नाही काही.
कितीतरी गोष्टी सांगायच्या राहिल्या आहेत.
म्हणजे प्रत्येक वेळेस मनात सारे तयार होयचे काय सांगायचे ते, पण net access नसायचा, कधी laptop नाही. तर कधी सगळं असलं तरी मनच ताळ्यावर नाही लिहायला. असे बेशिस्तीचे प्रकार घडले. आता थोडा मनाला शिस्त लावायचा प्रयत्न करायला हवा.
दोन छान गंमती तुमच्याशी share करायच्या आहेत. एक म्हणजे माझी birthday special solo कोकण trip. धम्माल केली एकटीने. दुसरे म्हणजे सध्या माझी भटकभवानीची पावले सांगलीला घेऊन आली आहेत. इथले अनुभव सांगायचेत.
hope लवकर शिस्तीत लिहीणं होईल !!
Pages
Welcome...
Labels
- Love (1)
- कविता (23)
- मीराची डायरी (17)
- ललित (32)
- संवाद (6)
- सुचेल ते.. (10)
- हिंदी कविता (3)
7/12/15
लिहिण्यातली बेशिस्त
5/28/15
Being A GypSycho
Whats app वर status काय टाकायचं ?
रोजच्या जगण्यातील महत्त्वाचा प्रश्न !
Status कसं , जुळून आलं पाहिजे तुमच्या व्यक्तिमत्त्वाला आणि त्यावेळेच्या mood ला . कधी एखादं गाणं, कधी thought , तर कधी नुसतीच गंमत. कधी एखाद्या गोष्टीची आलेली मनस्वी चीड.
असंच विचार करताना आज नवीनच शब्द सापडला. "GypSycho "
Status टाकलं. "Being A GypSycho "
लगेच सर्वांची उत्सुकता.
"म्हणजे काय गं"
म्हटलं, " Gypsy plus psycho "
त्यात त्याचा टोमणा. "self -actualisation झालंय का ? "
"हो, झालंयच." त्याला ठणकावलं.
हे पाय काही थांबायचं नावच घेत नाहीत. अंगात वारा शिरल्यासारखं होतं. सारखी नव्याची ओढ, नव्याचा ध्यास. नव्या ठिकाणी जाण्यासाठी जिवाची तगमग.
वाटतं जणू पायाला चाकंच आहेत.
दर सहा महिन्यांनी नव्या ठिकाणी जायची हौस. पण practiacally आणि नोकरीच्या दृष्टीने ते शक्य नसते. मग दर एक वर्षाने बदलायची जागा. एक वर्ष टिकून रहायचे.
मग अशी दर एक वर्षाने नव्या ठिकाणी पोहोचलेली मी पाहिली की सगळ्यांचे judgement आलेच.
"Unstable आहेस तू."
झालं.
नुकतेच केस कापले. बॉयकट. काही महिन्यांनी असं स्वतःला पूर्ण बदलून टाकायला आवडते मला. स्वतःला renew करत रहायचे periodically.
नवा Dp पाहून पुन्हा messages.
"पुन्हा केस कापले ?"
कंटाळा येतो मला केस विंचरायचा. आयुष्यात बाकीची इतकी महत्त्वाची कामे असताना या dead cells उर्फ केस maintain करण्यात वेळ का वाया घालवायचा ?
पिकूमधल्या दिपीकाचे मस्त केस पाहून वाईट वाटत असतानाच त्याचा message.
" मस्त दिसतेय." हुं, याला तर सगळंच आवडतं.
असं वार्यावर भिरभिरतं आयुष्य मला जाम आवडतं.
आवडतं मला explore करायला.
नवीन ठिकाणांना , वेगवेगळ्या लोकांना , तरूणाईला , सामाजिक प्रश्नांना आणि त्याच्या उत्तरांना explore करणं . हे करता करताच स्वतःच्या आत दडलेल्या उर्मींना चाळून, छानून समजून घेणं.
Risk ?
Risk तर असतेच. अंधारात चाचपडायची, ठेच लागून धडपडायची, रस्ता चुकायची. हट्टाने घेतलेले निर्णय अपयशी ठरल्यावर स्वतःवरचा विश्वास हरवण्याची. आनंदाचे क्षण वेचताना निराशेच्या खोल गर्तेत अडकायची.
Risk तर असतेच.
पण ती तर घ्यावीच लागेल. त्याशिवाय स्वतःला शोधता कसे येणार ? स्वतःचा थांगपत्ता कसा धुंडाळणार ?
सगळ्यातून तावूनसुलाखून गेल्याशिवाय काळजाचं पातं धारदार कसं होणार ?
रोज मी cycling, walking , जमेल तो exercise करते. कारण शरीरावर वयाचा गंज नाही चढू द्यायचा मला.
पोटात अन्न टाकताना शक्यतो healthy food च निवडते. कारण चरबीचे थप्पे नको आहेत चढायला माझ्या रक्तवाहिन्यांमध्ये.
मनाचे काय ?
आत्म्याचे काय ?
त्याची पण काळजी घ्यायला हवी ना ?
मनावर नाही चढू द्यायचा गंज भूतकाळाचा, निराशेचा, आळशीपणाचा, समाजाच्या आंधळ्या समजूतींचा, एवढेच काय, तर Security आणि comfort zone चा पण गंज नको.
त्यासाठी Exploration..!
नायना (डॉ. अभय बंग) सांगतात , "खरी लढाई तर आत असते. "
बरोबर आहे नायना. सगळी लढाई आतच. बाहेर उमटतात ते त्याचे पडसाद.
ही आतली तगमग बसूच नाही देत शांत. ही जागवत राहते कित्येक रात्री. ही पेटवत राहते नवनवीन उर्मींचे होमकुंड.
ही चेतवत राहते मेंदूच्या तंतूंना.
या सगळ्यात मी काय गमावते आणि काय मिळवते ?
याचा हिशोब कसा करणार ? समाजाच्या ठरलेल्या चौकटीमध्ये नाही मांडणार मी याचा जमाखर्च.
स्वतःवर असणारा घट्ट विश्वास आणि समोरच्यावर माणसावर प्रेम एवढं पुरेसं असतं मला जगण्यासाठी.
तू म्हणतोस, "समाज नाकारून चालत नाही."
समाज नाहीच नाकारत मी. पण समाजाची आंधळी धारणा व आंधळी बुद्धी नक्कीच नाकारते.
माझी वेगळी वाट मीच निवडलेली आहे. वेगळी वाट निवडल्यावर शक्यता असतेच इतरांपासून वेगळं व एकटं पडायची. पण ती शक्यता कितीही नकोशी असली तरी मला स्वीकारावी लागेलच. ती स्वीकारूनच ही वाट चालायची आहे मला.
Trust your strength dear..!!
5/12/15
"मी पूर्णपणे अशी कोणालाच नको असते"
म्हणजे तुम्हालाही येतं का असं feeling कधीकधी किंवा अनेकदा....?
आपल्यातील थोडासा. काहीसा selected भागच फक्त इतरांना हवा असतो.
तेवढ्याच भागापुरते त्यांना आपल्याशी देणेघेणे असते.
ते येतात, तेवढाच भाग पाहतात, तेवढ्याशीच नाते जपतात. तेवढ्याकडून त्यांना हवे ते काम काढून घेतात. त्यांचे येणे वसूल करून घेतात आणि जातात निघून उरलेल्या भागाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून.
अशी मी मग वेगवेगळ्या भागात विभागली जाते.
किंवा मग लोकांना सोप्पं जावं म्हणून मीच आधी तुकडे करून ठेवते स्वतःचे.
“घ्या, तुम्हाला हवा तो तुकडा घ्या. ”
असे मग नुसते तुकडे तुकडेच होऊन जातात.
मग कुणालातरी माझा अगदीच आतला तुकडा हवा असतो, काळजाचा. अलगद येऊन, माझे सारे बंदीपहारे सहजच चुकवून, ती व्यक्ती तो माझ्या जीवाचा तुकडाही अलगद जाते वापरून. मनात येईल तेव्हा येऊन गोंजारते. मन भरलं की पाठ फिरवून निघून जाते. पण तिच्या हाताळण्याने पोहोचते त्याला भरून न येणारी इजा. काळजाची इजा कोणाला दाखवणार ? आणि जी व्यक्ती ती देऊन गेली, तिला तर आठवण पण नाही राहत त्या भागाची अथवा मुद्दामच ती व्यक्ती सोंग करते, की अरे, मी तर तिकडे आलेच नाही. माझ्याकडे तर नसतात कसले साक्षी पुरावे.
इतकी पण शरम नसावी का अशा लोकांना ? इतका पण मर्दपणा नसावा का पुरुषांमध्ये की कबूल करण्याचा की मी वापरला तुझा काळजाचा भाग माझ्या आनंदासाठी ? एवढा basic प्रामाणिकपणा नसावा का एक माणूस म्हणून ?
आणखी दुसऱ्या कोणाला थोडा व्यावहारिक भाग हवा असतो. त्यांनी ते स्पष्ट ठेवलेलं असतं ते चांगलं. पण मी पडते मूर्ख. माझं तर नियंत्रण नसतंच त्यावर. त्या व्यक्तीला माझा व्यावसायिक भाग देत असतानाच अचानक दुसराच भावनिक भाग विरघळू लागतो, प्रेम पाझरू लागतो. ती व्यक्ती मग अगदीच विचित्र नजरेने पाहू लागते त्या माझ्या गरीब लाचार भागाकडे. त्या तिरस्काराच्या नजरेने माझं पूर्ण अस्तित्वच शहारून जातं. असं वाटतं, लपवून टाकावा अथवा मारून टाकावा तो भावनाविवश भाग. मी अशी विद्ध असताना ती व्यक्ती तिचं व्यावसायिक काम काढून घेऊन निघून जाते आणि मागे मी शरमेच्या, निराशेच्या गर्तेत अडकलेली.
काही असतात तापदायक, मला स्वतःलाही नकोसे वाटणारे. रागाचे, इर्षेचे, Insecurity चे, निराशेचे. दु:खाचे.. मलाच ते पेलवत नाहीत. वाटतं स्वतः पासून तोडून ते फेकून द्यावेत. पण तसं होत नाहीत. ते असतात माझ्या अस्तित्वाचे अविभाज्य अंग. अशा टोकदार, काटेदार, कुरूप भागांचे दर्शन ज्याला होते, ती व्यक्ती तर नाकारुनच टाकते माझ्या चांगल्या भागांचे अस्तित्व. तो माझा एक भागच बनून जातो मला Define करणारा केंद्रबिंदू त्या व्यक्तीसाठी. पाहत राहते मी हताशपणे फक्त. “अरे, मला स्वतःलाच या भागाचं कोडं सुटत नाही, ते मी तुला कसं समजावून सांगू. पण म्हणून मला त्या भागाने अधोरेखित करण्याचा तुला काहीच हक्क नाही...” हे सारं असतं आतल्याआत.
असे अखंड तुकडे पडलेले असतात मनाचे, माझ्या भाव विश्वाचे.
त्यात शरीराचाही एक तुकडा. त्याच्या मागण्यांचा प्रदेश तर वेगळाच. त्या मागण्या मलाही घाबरवून टाकणाऱ्या. नैतिकतेच्या कोड्यात अडकून त्यांचा सगळा घोळच होऊन जातो, जो ना त्यांना उमगतो, ना मला. कधी कधी त्या सुख पुरवणाऱ्या, तर कधी मनावर तप्त सळईने ओरखडे ओढणाऱ्या.
असे असंख्य घायाळ तुकडे. त्यांचे त्यांचे घायाळ प्रदेश. त्या प्रदेशाची मी नियंत्रण नसलेली मालकीण.
आणि मजा अशी की मी अख्खीच्या अख्खी कुणालाच नको असते. असं का होतं ? मी माझ्या काळ्या-पांढऱ्या सकट, वरचं आवरण आणि आतल्या गाभाऱ्यासकट, माझ्या सर्वच्या सर्व भागांसकट कोणालाच का हवीशी नसते ?
असं स्वतःचे लचके तोडून आणि त्या तुकड्यांचा बाजार मांडून जगणं खरंच आवश्यक आहे का ?
4/16/15
सुशीला आणि हृषीची कहाणी
नॉर्मली गर्भावस्थेचा काळ हा नऊ ते साडेनऊ महिन्यांचा राहतो.परंतु सुशीलालामात्र सातव्या कि आठव्या महिन्यातच कळा सुरू झाल्या. त्यावेळेस गावातील नर्स हजर नव्हती. गावातील दाई म्हातारपणाने थकलेली आणि गुडघेदुखीने हैराण झालेली . तिला निरोप देऊन सुशीलाचा नवरा हृषी बाळंतपणासाठी नर्सला शोधायला निघाला . पण इकडे सुशीलाच्या कळा वाढल्या आणि बिचारी संडासातच बाळंतीण झाली . हडकुळी सुशीला , तिचं कमी वजनाचे बाळ, बाळाची नाळ, वार सारंच कितीतरी वेळ रक्ताच्या थारोळ्यात तसंच पडलेलं.काही वेळाने MMV तिथे पोहोचली आणि सर्चच्या डॉ. भूषणने बाळाला उचलून स्वच्छ केले. दाई पण पोहोचली. MMV मधून आई व बाळ सर्च दवाखान्यात दाखल झाले . कमी दिवसांचे, कमी वजनाचे , दूध ओढू न शकणारे, तापमान कमी होत जाणारे ,त्यात संडासात जन्म
ले असल्याने जंतुसंसर्गाचा धोका या सर्व कारणांमुळे उपचारांना प्रतिसाद न देता बाळ दोन दिवसांत दगावले. त्यावेळेस बाळाचा बाप सोबत नव्हता . बाळाच्या अंत्यसंस्कारांसाठी आईला बाळाच्या मृतदेहासोबत अँम्बुलन्सने तिच्या 'कोंदावाही' या गावी पाठवायचे ठरले . पण मी व माझा सहकारी डॉ. वैभव आम्हांला चिंता होती की हिला पाठवतोय खरे , पण ही परत दवाखान्यात आलीच नाही तर ? कारण सुशीलाला ताप येऊ लागला होता व आम्हाला आता तिची काळजी वाटत होती . तसे आम्ही तिला समजावून सांगू लागलो की तिचे परत दवाखान्यात येणे कसे महत्त्वाचे आहे तेव्हा तीच स्वतःहून म्हणाली की "मला बरं वाटत नाहीये . मला औषधी हवी आहेत आणि म्हणून मी परत येणार आहे." एवढं सांगून ती तो लहानसा मांसाचा गोळा घेऊन गावी गेली .
इकडे आमची चर्चा चालायची की पहिल्या मुलीवर पुन्हा मुलगीच झाली म्हणून नवर्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले, तिच्यासोबत दवाखान्यात आला नाही. आता तरी तो तिला परत पाठवतोय की नाही शंकाच होती.
पण दुसऱ्या दिवशी मात्र सुशीला , तिचा नवरा हृषी, सोबत त्यांच्या चार वर्षाच्या बालीला घेऊन हजर झाले आणि त्यासोबतच आमचे 'सुशीला पर्व' सुरु झाले .
ती आली तेव्हा चालत आली पण हळूहळू तिची तब्येत ढासळत गेली. मला अजून आठवतं, ती आली तेव्हा तिला आमच्या मेन कॉरिडॉरमध्ये बसवून मी तिची हिस्ट्री घेत होते. तेव्हा तिला विचारलं , बाई गं, तुझं लग्न होऊन किती वर्षे झाली ? तर तिचं उत्तर की माझं लग्न झालेलं नाही. मी इकडे अवाक. म्हटलं , असं कसं, आधीची एक पोरगी, त्यात ही दुसरी आणि म्हणते की लग्न झालं नाही म्हणून..? आमचे हे संवाद ऐकून सिस्टर वर्षाताई माझ्या मदतीला धावल्या. "ताई, यांच्यात असंच असतं. बाई पुरूषाच्या घरात जाऊन राहते. त्यांना मुलंबाळं होतात; मग नंतर सावकाश ते लग्न करतात. तशी रूढीच आहे त्यांच्या समाजाने स्वीकारलेली."
येणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक तिची तब्येत ढासळत गेली व चालत आलेली सुशीला कॉरिडॉरमधील त्याच बेडवर आडवी झाली. आमचे सिनिअर डॉ. योगेश यांना तिला बाळंतपणानंतर होणारा एक विशिष्ट प्रकारचा हृदयरोग झाल्याची शंका होती आणि ज्यामध्ये रूग्णाचे वाचण्याचे प्रमाण फार कमी असते. तरीही तिचे नेमके निदान होत नव्हते. ज्या काही सुविधा आमच्याकडे उपलब्ध आहेत , त्यामध्ये जास्तीत जास्त चांगले उपचार देण्याची योगेशदादांची धडपड चालली होती.
या सगळ्यात सुशीलाचा नवरा हृषी याचे मला फार कौतुक वाटायचे. सुशीलाची तो पूर्ण वेळ व्यवस्थितपणे काळजी घ्यायचा. कधी तो कंटाळलाय, चिडलाय किंवा त्रासून जाऊन तिच्याशी भांडतोय असं मी कधी त्याला पाहिलं नाही. केव्हाही मी त्याच्याशी बोलायला गेले की तो शांतपणे ऐकून घ्यायचा व समजून घ्यायचा. त्याचा आमच्यावर पूर्ण विश्वास होता. सुशीलावर सतत लक्ष ठेवणे आवश्यक असल्याने आम्ही तिला मेन कॉरिडॉरमध्येच ठेवलेले होते. तिथे चार बेड ठेवलेले आहेत. दोन बेड सिरिअस रूग्णांसाठी, ज्यांचे पडदे ओढून घेतले कि आमचे 'आय. सी. यू.' तयार होते. दुसरे दोन बेड तातडीच्या रूग्णांसाठी, जिथे आम्ही त्यांना तपासून व प्राथमिक उपचार करून नंतर वॉर्डमध्ये अथवा कुटीमध्ये हलवतो.
तर बरेच दिवस सुशीला त्याच बेडला खिळून होती. पलीकडच्या बेडवर हृषी व त्याची पोर दिवसरात्र पडून असायचे. सुशीलाच्या हृदयावर ताण पडू नये म्हणून तिला बेडवरून खाली उतरायची परवानगी नव्हती. त्यानुसार तिला शौचासाठी जागेवरच बेडपँन द्यायची सोय केली गेली. पण तीही हट्ट धरायची कि "मला संडासात जाऊ द्या. मी बेडपँन घेणार नाही ." पण तिच्या शरीरात मात्र थोडेही त्राण नसायचे. या गोंधळात मग तिची कपड्यांमध्येच घाण होऊन जायची. ते साफ करून तिचे कपडे बदलणं आमची मावशी व अर्थातच हृषीवर यायचं . वास येऊ नये म्हणून आम्ही पडदे ओढून दूर व्हायचो पण माझ्या नजरेसमोर बायकोचं
हगणं मुतणं साफ करणारा हृषी तरळत रहायचा.
सुशीलाचा आजार वाढत चालल्याने तिला वेगवेगळी औषधे लागायची. आदिवासी भागातील असल्याने तिला भरती व उपचार मोफत होते. परंतु औषधे आणावी लागत. त्यावरही ५०% सवलत मिळत असल्याने तशी महागडी औषधे कमी दरात उपलब्ध होतात. परंतु तो खर्चही त्यांच्यापरीने खूप जास्त असायचा. आजूबाजूच्या लोकांकडून मला समजायचं की हृषीकडील पैसे कधीच संपले होते. ओळखीच्या लोकांकडे मागून तो पैसे जमवत होता. प्रत्येक वेळी सकाळी औषधे लिहून त्याच्या हाती चिठ्ठी ठेवताना माझ्या छातीत धडधडायचं की आता याच्याकडे पैसे आहेत की नाहीत. तो मात्र खालमानेने ती चिठ्ठी घेऊन पसार व्हायचा आणि दुपारी
नर्सबाईकडे औषधे पोहोचती करायचा. एकदा मी त्याला पैशांबाबत विचारलं तेव्हा
त्याने सांगितले की त्या दोघांना त्यावर्षी तेंदूपत्त्याचे मिळालेले २५०० रूपये बँकेत होते ते त्याने काढून आणले होते. मीही काही करु शकत नव्हते कारण येणार्या प्रत्येकच रूग्णाचा खिसा फाटका, त्यामुळे
विचार तरी कुणाकुणाचा करणार..?
बरेच दिवस सुशीलाचा मुक्काम आमच्या दवाखान्यात पडल्याने हृषी चांगलाच रूळला होता. नवे रूग्ण आले की तो कुतुहलाने पहायचा. जमेल ती मदत करायचा. कधी मला आदिवासी भाषा समजली नाही कि दुभाषाचं काम करायचा. मीही त्याला मग उत्साही कार्यकर्त्याप्रमाणे कामे सांगायचे. नव्या बुजणार्या नातेवाईंकासोबत पेपर बनवायला पाठव तर कधी एखाद्या म्हातारीसाठी मेसमधून जेवण आणायला पाठव अशी कामे मी त्याला हक्काने सांगायची. मला तो आवडू लागला होता.त्याला 'हृषी' म्हणून हाक मारताना मला आशावादी आणि प्रसन्न वाटायचे. पैसे तो कसा कोठून घेऊन येतो हे जसे मला कोडे होते तसेच सुशीला इतकी गंभीर असताना हा जगण्याचे बळ आणि चेहर्यावरचे उमदे हसू कोठून मिळवतो हेही मला कोडेच होते. त्याच्या पोरीला घेऊन तो पूर्ण कँपसमध्ये फिरायचा. कधी मॉर्निंग वॉकला माझ्या वेळूबनसमोर दिसायचा. त्याचा चेहरा सदोदित निरागस व उत्साही दिसायचा. एकदा मला म्हणाला, " माझ्या पोरीचं पोट तपासा; बोंबली बाहेर येतेय तिची." पण ती पोट्टी मला पोटच दाखवेना. खदाखदा हसत सुटायची. मग आमचा रोजचा कार्यक्रम ठरून गेला. मी तिला म्हणायची, "तुझी बोंबली पाहू दे मला" आणि तिनं हसत पळत सुटायचं. हृषी आणि बाकीचे लोक मजा वाटून हसत रहायचे.
इकडे सुशीला हळूहळू आमच्या उपचारांनी बरी होत चालली होती. एक रात्र अशीही होती कि योगेशदादांना व मला वाटलं ही सकाळपर्यंत राहते कि नाही. पण ती तगली. मध्येच वेडसरपणा यायचा. पण आता बरीच सुधारली. उठून बसू लागली. खाऊ लागली. मग कुठुनतरी तिची आई उगवली. ती तिला धरून संडासात नेऊ लागली. आंघोळ घालू लागली. हृषी गावी जाऊन त्याच्या २-४ एकर शेतात धानकापणी करून आला. तिच्या बेडवरून आम्ही तिला साईडरूममध्ये हलवले. हिमोग्लोबिन कमी असल्याने तिला एक बाटली रक्त चढवले. मग गोळ्या - औषधे देऊन त्या कुटुंबाला घरी पाठवताना आम्ही समाधानी होतो.
परंतु काही दिवसांनी सुशीलाला घेऊन हृषी परत आला. यावेळेस मात्र तिची तब्येत अतिशय खालावलेली होती. चालण्याचेही तिच्यात त्राण शिल्लक नव्हते. वेडसरपणा वाढला होता. खाणं बंद होतं. हाताला सुई लावूच देत नव्हती. मग तिला सलाईन लावले की हृषीला मी तिथे बसवून ठेवायचे. हृषीने सांगितले कि तिने घरी कोणतीच औषधे खाल्ली नाहीत.गोळ्या दिल्या कि फेकून द्यायची. पुन्हा आमचे तिच्यावरचे उपचार सुरू झाले. पण कशालाच तिचा प्रतिसाद मिळत नव्हता. तिचे हिमोग्लोबिन पुन्हा प्रचंड कमी झालेले, अवघे साडेपाच ग्रँम. रक्त द्यावे तर तिला हृदयरोग असल्याने हृदयावर ताण यायची भिती.
यावेळेसही हृषी सारी कामे करत होता परंतु त्याच्या चेहर्यावरचा उमदेपणा जाऊन तिथे निराशा पसरली होती.सुशीला पासून तो दूर दूर रहायचा. मी गेले कि हाका मारून त्याला बोलवायचे पण वातावरणात विचित्र ताण भरून रहायचा. योगेशदादा, मी, वैभव आम्ही प्रयत्न करतच होतो पण फारशी आशा नव्हती. यावेळेस तिची पोरगीही हसत नव्हती. बोंबली दाखव म्हटलं कि निमूटपणे झोपून तिने मला तिचा पोटाचा हर्निया तपासू दिला.
मग शेवटी ती वेळ आली. एका संध्याकाळी प्रार्थनेला जात असता दवाखान्याची मावशी मला बोलवायला आली. मी गेले तर सुशीला पोटातील असह्य वेदनांनी तळमळत होती. पोट कडक झालेलं. तिच्या लक्षणांवरून तिच्या
आतड्याला भोक पडल्याची शक्यता वाटत होती. अशा स्थितीत तातडीने सोनोग्राफी करून गरज असल्यास तत्काळ शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते. परंतु सुशीलाच्या शरीरात आधीच रक्त कमी, त्यात पुन्हा हृदयविकार व रक्तपेशींच्या आजाराची शक्यता. अशा स्थितीत शस्त्रक्रिया करतानाच तिच्या जिवाला धोका होण्याची शक्यता जास्त होती. योगेश दादा व अम्मांनी हृषीला सर्व स्पष्ट कल्पना देऊन शेवटचा प्रयत्न म्हणून सुशीलाला गडचिरोलीला नेण्याचा सल्ला दिला. हृषी सुशीलाशी जाऊन बोलला. दोघांनी मिळून निर्णय घेतला कि आम्ही घरी जाऊ. शेवटचे श्वास घेण्यासाठी तिला घरी परतायचं होतं. आम्ही अँम्बुलन्स तयार ठेवली.
जेव्हा रूग्णाला गडचिरोलीला नेऊन फायदा होईल अशी आशा असते तेव्हा आम्ही नातेवाईकांना ते पटवून देऊन पाठवतो. परंतु जेव्हा आशा नसते तेव्हा तो निर्णय आम्ही नातेवाईंकांवर सोपवतो.
अखेरचे क्षण मोजणारी सुशीला नवरा व बालीसोबत घरी परतली. पण "मला बरं वाटत नाहीये. औषधे घ्यायला मी परत येणार आहे" अशी म्हणणारी सुशीला , तिचा निस्तेज होत गेलेला चेहरा आणि उमद्या मनाचा , बायकोची सर्व सेवा करणारा, पैसे जमवणारा हृषी ...या सर्व आठवणी रेंगाळल्या आहेत मागेच.. दुःखाची गडद छाया पडलेलं त्यांचं झाकोळलेलं सहजीवन तरळत राहतं नजरेसमोर अजूनही.
4/6/15
मी आणि बाईपण
मग एक ४५ वर्षाची रुग्ण आली. तिच्या तक्रारी सांगणे सुरु झाले. पहिले तर तिचे गुडघे आणि मांड्या खूपच दुखत आहेत अशी तक्रार. इतके की ती त्या दुखण्याने रडकुंडीला आलेली. मग बाकीचा त्रास की सगळेच सांधे दुखताहेत, सूज येते, पूर्ण अंग सुजते इत्यादी. तिला तपासताना माझे तिच्या चेहर्याकडेही लक्ष होते. तिच्या अंगावर तर कुठेच सूज नव्हती. पण ती मात्र दुखण्याला वैतागलेली दिसत होती. पण तिचा चेहरा काही वेगळेच सांगत होता. घासून पुसून लक्ख केल्यासारखा व चेहऱ्यावर एकही आठी न पडण्याची काळजी घेत ती बोलत होती. अनुभवावरून आम्हाला लक्षात येते की असे रुग्ण काहीतरी लपवू पाहत असतात. एकदम नवीन ठिकाणी, नवीन डॉक्टर समोर रडू फुटू नये याची काळजी घेत असतात. आम्हाला उपचार करण्यासाठी समोरच्या व्यक्तीचा खरा त्रास समजून तर घ्यायचा असतोच. नाहीतर मी ते समजून न घेता नुसत्याच दुखण्याच्या गोळ्या खरडल्या आणि तिला पाठवून दिले तर माझे डॉक्टर असणे निरुपयोगी आहे असे मी मानते.
तिला तपासता तपासता मी तिच्याशी बोलत राहिले. तिला थोडा विश्वास वाटतोय असे दिसताच तिला विचारले, “कसली चिंता आहे तुम्हाला ? नक्की काय होतेय ?”
ती तिथेच रडू लागली. कोंडलेले अश्रू बाहेर पडले.
“ काय सांगू ताई तुला. नवरा सोडतच नाही. एक दिवस पण त्याला जमत नाही जवळ आल्याशिवाय. पोटच्या पोरी लग्नाला आल्या तरी हा माणूस रोज ओरबाडतो. तंगड्या वर करून झोपावं लागतं रोज, त्यानी गुडघे नी मांड्या भरून येतात. या वयात खूप त्रास होतो, कळा येतात.
रोज तो दारू पिऊन येतो आणि माझ्या मागे लागतो. त्याला नाही म्हटलं तर तुझं बाहेर काय आहे, कोणासोबत आहे म्हणून म्हणून शिव्या घालतो आणि मारतो.”
मी सुन्न. तिच्याकडे पाहत राहण्याशिवाय काही करू शकत नव्हते.
“तू भांडत का नाहीस? मार का खाते ?” माझा साळसूद प्रश्न.
“ खूप शक्ती आहे त्याच्या अंगात. नाही चालत माझा जोर. Delivery नंतर फक्त ४ दिवस सोडला त्याने. पोरी तान्ह्या असतानाच सुरु. MC मध्ये पण नाही सोडायचा. आता त्याला देवाची भीती घालते म्हणून तेवढे चार दिवस तरी सुटका होते. नाहीतर गावाला पण नाही जाऊ देत. कारण मग त्याला ते कसं मिळणार.
आजूबाजूच्या बाया म्हणतात किती खराब झालीये तुझी तब्येत. त्यांना काय सांगणार.
ताई, असं वाटतं, जेवणात काहीतरी कालवून द्यावं म्हणजे मरेल तरी एकदाचा. “
मी नुसतीच ऐकतेय. मन अस्वस्थ झालेलं.
“ तो दारू पिऊन येतो. त्याचा वास तरी कसा सहन करतेस गं तू ? आणि त्यात तो जवळ येणार काय होतं गं तुझ्या मनाचं ?”
यावर ती बिचारी तरी काय बोलणार ?
मी वेगळ्याच पेचात अडकले. एकवेळ तिला कसला आजार असता तर देऊ शकले असते त्याची औषधे. संधिवात असता तर त्याचे विशेष उपचार. पण तिची समस्या माझ्या आणि तिच्याही नियंत्रणा बाहेरची होती.
“ दवाखान्यात आण एकदा त्याला. आम्ही बोलू त्याला. दारू सोडवायची औषधे देऊ.”
पण मी बोलत असतानाच माझे शब्द किती फोल आहेत ते जाणवत होते मला.
दारू पिऊन मारझोड करणाऱ्या नवर्यांच्या गोष्टी सार्याच सांगतात. पण ही बाई इतकी व्यक्तिगत गोष्ट घडाघडा बोलून गेली आणि मी विचारत पडले.
दीपिकाच्या video वरून चाललेला वाद आठवला. त्यातील pre-marital sex आणि extra-marital sex मध्येच लोक इतके अडकून पडले की मूळ उद्देश बाजूलाच राहिला.
स्त्रीच्या शरीरावर फक्त तिचाच हक्क असावा आणि संबंध ठेवावे की नाही हे तिला ठरवता यावे हे का नाही होत प्रत्यक्षात ? लग्न झालेल्या जोडप्यात नवर्याने स्त्रीच्या संमतीशिवाय केलेला संभोग हा बलात्कार च ठरतो. तो नाकारण्याचा अधिकार याबद्दल नाहीच कोणी बोलत. स्त्री ने लग्न आधी कुमारिका असावे यावर बोलण्यात आपली इतकी शक्ती खर्ची होते की स्त्रीच्या मनावर व शरीरावर चालणारे असंख्य प्रकारचे बलात्कार आपण सोयीस्कररित्या नजरे आड करतो.
नजरेनी बलात्कार करणारे तर मी गिणतच नाहीये.
पण केवळ मंगळसूत्र गळ्यात बांधले म्हणून स्त्रीच्या शरीरावर पुरुषाचा हक्क प्रस्थापित झाला व तो हक्क तो कशाही रीतीने हवा तेव्हा तिच्या शरीराचा, मनाचा , तिच्या सन्मानाचा चुराडा करून तो वापरू शकतो हीच आहे ना आपली आदर्श लग्न व्यवस्था ?????????
किती तरी अशा स्त्रिया भेटतात मला रुग्ण म्हणून. गर्भपिशवी काढण्याचे ऑपरेशन झाल्यावर आम्ही त्यांना सूचना देतो की “बाई गं, ३ महिने नवऱ्यापासून दूर रहा, संबंध नको. तेव्हा ती म्हणते, “ ताई, तुम्हीच त्याला सांगा. ऐकतच नाही. आणि चांगले ६ महिने नाहीतर सरळ वर्ष १ वर्ष सांगा. तेवढीच माझी सुटका...!!”
खूप अस्वथ व्ह्यायला होतं मग. कळतच नाही याला मी काय उत्तर देऊ ?
त्यांचे प्रश्न मग माझे होऊन जातात. मी लग्नाळू मुलगी. मलाही ती भीती वाटू लागते मग की अशी परिस्थिती माझ्या सोबत घडली तर मी काय करणार ?
त्याही आधी मी घटस्पोटीत मुलगी असते. त्यामुळे फार प्रेमाच्या गप्पा करणारी मुले माझे divorcee status कळले की आपसूक दूर होतात. बायको तर virgin हवी.
ही सगळी भारतीय संस्कृती घेर धरून नाचते माझ्या अवती भोवती.
मी, माझे रुग्ण आम्ही लढतोय या सर्वांशी. मला हरायचं नाहीये. खूप strong रहायचं आहे. माझे सामर्थ्य माझ्या बायांना द्यायचं आहे आणि मी थकते तेव्हा त्यांच्याकडूनच मिळवायचं आहे या दांभिक समाजाविरुद्ध पुन्हा उभं रहायचं बळ.
3/15/15
एका फुलांच्या वृक्षाची गोष्ट
लहान असताना कुठल्याशा भाषेतला, मल्याळम की तमीळ भाषेतला एक सिनेमा पाहिला होता. थोडासा सुंदर, पुष्कळसा वेदनादायी. तो पाहिला आणि मनात रुतून बसला. अधेमधे उगाच आठवत राहतो आणि अस्वस्थ करत राहतो. एका मित्राशी फुलांच्या गप्पा रंगल्या आणि पुन्हा तो सिनेमा आठवला. त्याच्याशी ती आठवण share करू वाटली म्हणून हे लिहीणं ..
दोन बहिणी आई वडिलांसोबत गावात राहत असतात. त्यातली थोरली असते तिला एक सिध्दी प्राप्त असते. एक मंत्र म्हणाला की तिचं रूपांतर मोठ्या वृक्षात होतं, त्याला सुवासिक आणि शुभ्रधवल फुले असतात. त्या वृक्षाला कळशीतल्या पाण्याने तीन वेळा पाणी घातले की पुन्हा ती माणूस होते. ही गोष्ट फक्त दोघींनाच ठाऊक असते.
तर अशा त्या दोघी बहिणी भल्या पहाटे उठून दररोज जंगलात जात असतात, मग तिथे थोरली सुंदर फुलांचा वृक्ष बनत असते व धाकटी फुले वेचते. ती फुलं त्या मग बाजारात विकत असतात. एकदा एक मुलगा त्या फुलांच्या प्रेमात पडतो. त्यांना म्हणतो कि मी खूप पैसे देईल , मला या फुलांचं झाड दाखवा. त्या त्याला हाकलून लावतात. पण त्याला कसंही करून ते झाड हवं असतं. मग तो दोघींवर पाळत ठेवतो आणि चोरून सारं पाहून घेतो.
मग तिच्या घरच्यांना पटवून तिच्याशी लग्न करतो. लग्नाच्या पहिल्याच रात्री तिला सांगतो मला सारं माहिती आहे आणि आत्ताच तू मला तो वृक्ष बनून दाखव. ती खूप घाबरते, रडते, त्याला विनवते. पण तो जबरदस्तीने तिला वृक्ष व्हायला भाग पाडतो. नंतर तिने सांगून ठेवले तसे पाणीही टाकतो. रोजच रात्री हा प्रकार चालू राहतो.
तिची धाकटी नणंद रोज सकाळी त्यांच्या खोलीत फुले पाहत असते. तो घमघमणारा वास तिला वेडं करत असतो. मग ती चोरून एका रात्री पाहून घेते व तिलाही ते गुपित माहिती होतं.
एके दिवशी नणंद तिच्या वहिनीला घेऊन गप्पा मारत दाट जंगलात जाते. तिथे मग तिला गळ घालते कि मलि झाड बनून दाखव. रडून खूप हट्ट करते तेव्हा ती भोळी वहिनी तयार होते , म्हणते पण कळशी कुठेय ? तर या नणंदेने सगळी तयारी आधीच करुन ठेवली असते. मग मंत्र म्हणून ती वृक्ष होते आणि लगेच ती नणंद तिच्या सर्व मित्रमैत्रिणींना आवाज देते. सगळे जमतात. फुले गोळा करतात. मग त्यांचे खेळ सुरू होतात. मध्येच पोरं पोरी त्या वृक्षाच्या फांद्यांवर चढतात. पोरं बेभान असतात. फांद्या तुटल्याचे आवाज येतात. नणंद घाबरते अरे ही माझी वहिनी आहे, असं करु नका. कोणालाच फिकिर नसते. जमेल तशा फांद्या तोडत , उड्या मारत पोरे पळून जातात. नणंद घाबरत, रडत कळशीने पाणी टाकते व किंकाळी फोडून पळून जाते.
इकडे तिचा नवरा तिची वाट पाहतोय. अंधार पडला तरी येईना म्हणून काळजी करतोय. बहिण भीतीने काही सांगत नाही. हा तिला बरेच दिवस सगळीकडे शोधत राहतो पण ती सापडत नाही. तो तिच्या विरहाने रडतो , तडफडतो. बहीण गुपचुप राहते.
शेवटी त्याला शंका येते आणि शोधत तो त्या जंगलात येतो. प्रत्येक वृक्ष पाहू लागतो. मग अचानक एका लाकडाच्या ओंडक्याला अडखळतो, पडतो. पाहतो तर "ती" असते. तिच्या शरीराच्या जागी फांद्या तुटलेलं वृक्षाचं खोड असतं आणि वरती वेदनेने पिळवटलेला चेहरा.
शेवटचा scene असा आहे कि तो बैलगाडी चालवतो आहे आणि camera मागे तिचा तुटलेला वृक्षदेह पहुडलेला दाखवतो.
पाहणाऱ्याच्या काळजावर वेदनेचे चरचरणारे निखारे ठेवून सिनेमा संपतो.
1/5/15
स्त्री आरोग्यदूत आणि गावाला भेट
रोजचा दिवस काहीतरी शिकवतो आहे. इथे भेटणारे लोक आणि त्यांची कामावरची श्रद्धा मलाही स्वतःच्या आयुष्यात कसे आणखी चांगले माणूस म्हणून जगता येईल हे जाणते अजाणते पणाने शिकवत आहेत. इथल्या अनुभवांबद्दल खूप लिहू वाटतेय म्हणून आज हे लिखाण सुरु करतेय.
सर्चने गावांचे आरोग्य त्यांच्या हाती सोपवण्यासाठी त्यांच्यातीलच काही व्यक्तींना निवडून त्यांना आरोग्य प्रशिक्षण दिले आणि ते सर्चचे आरोग्यदूत म्हणून गावां-गावांमध्ये आरोग्यसेवा देतात. मी आणि अमेरिकेहून इथे आलेली Heather Gardner, त्यांचे काम पाहण्यासाठी शनिवारी आणि रविवारी गावात एका जाऊन राहणार असे ठरले. त्यानुसार आम्ही शनिवारी संध्याकाळी 'पोर्ला' या गावी तिथली आरोग्यदूत 'अरुणाताई' यांच्या घरी राहायला गेलो. तिथे जो अनुभव मिळाला आणि जे माझे जीवन शिक्षण झाले ते मला बरेच विचारप्रवृत्त करणारे ठरले.
त्यादिवशी आम्ही अंधार पडल्याने प्रत्यक्ष काम करायला जाणार नव्हतो. म्हणून त्यांच्या घरातच आम्ही त्यांच्या कामाविषयी चर्चा करत होतो. मी स्वतः स्त्रीरोग तज्ञ असल्याने मी त्यांना प्रश्न विचारून त्यांचे ज्ञान पाहत होते आणि अरुणाताई त्यांची इतकी व्यवस्थित आणि सखोल उत्तरे देत होत्या की मी चाटच पडले. कारण अरुणाताई त्या गावातील विधवा बाई. शिक्षण किती तर सातवी पास. लग्नानंतर एक मुलगी झाली आणि ती एका वर्षाची असतानाच नवर्याचे १९९२मध्ये निधन झाले. १९९३मध्ये सर्चने आरोग्यदूत म्हणून काही निकषांच्या आधारे स्त्रिया निवडल्या त्यात शिक्षणामुळे त्यांचीही निवड झाली. तेव्हापासून त्या या कामात सक्रीय आहेत. त्यांची त्यांच्या कामाविषयीची सखोल माहिती, जे काम करू ते १००% जीव लावूनच करू हा दृष्टीकोन आणि समाजाच्या आरोग्याविषयीची तळमळ या सार्यांचा सुंदर संगम त्यांच्यामध्ये पाहून मी थक्क झाले.
आपण Women empowerment च्या नुसत्या गप्पा मारतो आणि सावित्रीबाई फुले जयंतीला भाषणे देतो. यापेक्षा एकटी स्त्री कंबर कसून स्वतःच्या पायावर उभी राहते आणि आरोग्यसेवा देते हे मला जास्त सुंदर आणि आशादायी चित्र वाटले.
खेड्यातील त्या घरात राहण्याचा अनुभव तर खूप सुंदर होता. त्यांचे आम्हाला प्रेमाने खाऊ घालणे. त्या सतत कामात मग्न असायच्या ते पाहून मला स्वतःच्या आळशीपणाची जाणीव झाली. मग मी मस्त स्वयंपाक पण बनवला त्या छोट्याश्या पण जिव्हाळ्याच्या सुबक खोलीमध्ये. थंडीमध्ये पहाटे उठून चुलीवरच्या गरम पाण्याने अंघोळ करणे ही तर माझ्यासाठी Luxury होती. बाहेर पडल्यावर आजूबाजूला पाहणे, लोकांशी गप्पा मारणे, अरुणाताई सोबत त्यांच्या कामाचा अनुभव घेणे यातून भरपूर शिकणे झाले.
मी बर्याच वेळा ऐकले होते की चार भिंतींच्या शाळेपेक्षा निसर्गाची मोकळी उघडी शाळा सहजपणे आणि जास्त शिकवून जाते ते मी आयुष्यात प्रथम अनुभवले. मला हे उघडे आणि मोकळे जग आवडले. असे वाटले आपण आयुष्यामध्ये स्वतःभोवती चार भिंती बांधतो, त्यात चैनीच्या वस्तू गोळा करतो, आपली म्हणून समजणारी माणसे साठवतो आणि मग बंदिस्त करून घेतो स्वतःला त्यात. त्यात मग आपल्याला खूप सुरक्षित वाटते, इतर जगापासून तोडून स्वतःला त्या भिंतीमध्ये कैद करण्यात स्वतःला आपण सुरक्षित म्हणवतो आणि त्याला म्हणतो "Settlement.."!!!!! Isn't it so much weird..? खरेच किती मुकतो आपण निसर्गाच्या आनंदाला ? समाजाच्या सहवासाला ? समाज म्हणजे काय ते जाणवूच देत नाही आपण स्वतःला आणि हरवून जातो स्वतःच्या Ego च्या छोट्याश्या डबक्यामध्ये.
आत्तापर्यंतचे सारे आयुष्य मला आठवले. tv पाहण्यात आणि अभ्यासाच्या चार पुस्तकांत डोके घालून मी मनाचे दरवाजे बंद करून टाकले आणि आयुष्यातील कितीतरी आनंदाला आणि खऱ्या शिकण्याला गमावून बसले असे वाटले उगाच. All those years, when i enclosed myself in four walls of my so called home, i missed life.
तिथे काळी चहा पीत होतो , बिनदुधाचा. म्हटले सवय करू. पण रात्री झोपताना असा त्रास झाला, वाटले मला दुधाचा चहा हवा आहे by hook or crook. मग जाणवले की किती घट्ट विळखा आहे मला चहाच्या व्यसनाचा. आणि आम्ही त्यांना तंबाखूचे व्यसन सोडा सांगत होतो. या स्वतःच्या निरीक्षणाने मलाच विचारात पाडले.
रात्री आजूबाजूच्या बायांना जमवून बसलो गप्पा मारायला. मग त्यांनी बोलून आणि प्रश्न विचारून मस्त भंडावून सोडले. जेवढी माहिती मला त्यांना देता आली तेवढी दिली आणि त्यांना बोलते करायचा प्रयत्न करून त्यांची माहिती, त्यांचे समज, त्यांचा दृष्टीकोन समजून घ्यायचा प्रयत्न केला.
दुसऱ्या दिवशी सकाळी परत निघालो तेव्हा अरुणाताईना सोडून येताना मन भरून आले होते.
काही वर्षांपूर्वी मी मेळघाटात आरोग्याच्या कामासाठी गेले होते तेव्हा अगदी वेगळा अनुभव आला होता. मी तिथल्या अंगणवाडी सेविकेच्या घरी राहिले होते. तिचा भोंगळ कारभार आणि कामाबद्दलची अनावस्था आणि तिचे शून्य काम, आम्ही घेतलेल्या सभेमध्ये लोकांची तडफड, तिच्याबद्दलच्या तक्रारी हे सर्व पाहून मला रडू कोसळले होते. सरकारच्या योजनांवरचा विश्वास संपून गेला होता. ते गाव सोडताना मनात उदासी आणि दु:ख पसरले होते. आज इथे मात्र उलट अनुभव आला. गावातून बाहेर पडताना मन एका नव्या आशेने आणि उमेदीने भरून पावले होते. या खेड्यात इतकी समर्थपणे काम करणार बाई आहे याचा आनंद आणि तिला घडवणाऱ्या 'सर्च' चा अभिमान यांनी मन भरून पावले होते. अशी स्त्री प्रत्येक खेड्यामध्ये घडली तर माझ्या भारताची आरोग्य व्यवस्था नक्कीच सुधारू शकेल अशी आशा तेवली मनामध्ये. I felt so much empowered for my community and proud of SEARCH..!! प्रकाशाने वाट उजळावी तसे काहीसे जाणवले. आत कुठेतरी प्रकाशाची तिरीप उमटते आहे आणि मनाला उभारी देते आहे. नवे काम करायचा विश्वास आणि उत्साह आणि उर्जा मिळते आहे.