Welcome...

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..

2/21/17

उत्तराखंड भाग ३


पहाड आणि तेथील जंगल, झाडे, घरे याबद्दल थोडेफार लिहिलेय. पण पहाडी लोकांबद्दल लिहायचे अजून राहिलेय.
खरेतर पहाडी लोक असा शब्दप्रयोग खूपवेळा वाचनात आला होता. परंतु त्या शब्दावर कधी विचार करायची गरज पडली नाही किंवा तसा विचारच केला नाही. हलद्वानी या गावापासून जेव्हा मी सतोलीला टेक्सीने निघाले आणि लवकरच सपाट प्रदेश संपून आम्ही पहाडातून प्रवास सुरु केला , तेव्हा कुठे मला पहाडी प्रदेश या शब्दाचा खरा अर्थ लक्षात येऊ लागला. कारण आम्ही नुसते एका पहाडावरून दुसऱ्या , तेथून तिसऱ्या असे फक्त पहाडातच प्रवास करत होतो. जी काही गावे लागत होती, ती त्या पहाडांवरच होती. जेवायला आम्ही थांबलो, ते गाव सुद्धा असेच एका पहाडावर वसलेले होते. मी टेक्सीतून उतरले, एका रोडसाईड धाब्याकडे गेले. आजूबाजूला नुसते पहाडच पहाड, आणि हा धाबापण असाच एका पहाडी वळणावर विसावलेला. तिथे पराठे आणि पहाडी आलू स्पेशल डिश खाताना माझे विचार चालू होते, “अरे, खरेच हे लोक शब्दशः पहाडावरच राहतात, यांची गावे, शेती, बाजार, जगणे मरणे सगळे पहाडावरच तर आहे.”
पुढे एका वळणावर तर मला आणखी एक दृश्य दिसले. एका पहाडाच्या रस्त्याला लागून असलेल्या उतरणीवर एक भलामोठा वृक्ष होता आणि त्याच्या एका बऱ्याच उंचीवरच्या फांदीवर एक स्त्री चढलेली. मला तर आश्चर्याचा धक्काच बसला. हे मला झालेले धाडसी पहाडी स्त्रीचे पहिले दर्शन!! त्यानंतर मग रस्त्यांवर गवताचे प्रचंड मोठे मोठे भारे आपल्या डोक्यावर वाहणाऱ्या पहाडी स्त्रिया दिसतच राहिल्या. ते भारे जवळ जवळ त्या स्त्रियांच्या उंची एवढेच मोठे मोठे असायचे, डोक्यावरच्या भाऱ्यामुळे त्यांचा चेहरा दिसायचाच नाही, त्यांना पुढचा रस्ता कसा काय दिसत असेल याचेच मला नवल वाटत राहिले. एकही पुरुष मला असा भारा वाहताना दिसला नाही. स्त्रियांच्या या कष्टांची किंमत त्यांचे शरीर कशाप्रकारे मोजते आहे, याची झलक एक डॉक्टर म्हणून मला पुढल्या काही दिवसात पहायला मिळणार आहे, याची मला किंचितही कल्पना त्यावेळेला नव्हती.
सतोलीच्या हॉस्पिटलमध्ये असताना , माझा दुसराच दिवस होता तेव्हा, एक स्त्री व तिचा नवरा तपासणीसाठी आले. तिचे वय फक्त २४ वर्षेच होते. मी तिला तपासले आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण तिची गर्भपिशवी पूर्णपणे बाहेर आलेली होती. बरेच दिवस ती तशीच बाहेर लटकत राहिल्याने त्यावर जखमा झालेल्या होत्या. वास येत होता. खरेतर अशा प्रकारचा आजार हा पाळी निघून गेलेल्या, ५०-६० वयाच्या वयस्कर स्त्रियांमध्ये दिसून येतो. याला आम्ही प्रोलाप्स असे म्हणतो. महिला याला “अंग बाहेर येणे” असा शब्दप्रयोग वापरतात. गर्भपिशवी ही लीगामेंटस व स्नायूच्या सपोर्टने तिच्या नॉर्मल जागेवर धरून ठेवलेली असते. विविध कारणांनी हा सपोर्ट कमजोर पडून गर्भपिशवी व तिच्यासोबत लघवीची पिशवी, संडासची जागा हे नॉर्मल जागेवरून हळूहळू खाली सरकू लागतात. त्यानुसार आम्ही त्याचे 1st , 2nd , 3rd डिग्री व complete prolapse वर्गीकरण करतो. जास्त म्हणजे 2nd, 3rd डिग्री व complete prolapse ला स्त्रियांच्या वयानुसार विविध शस्त्रक्रिया लागतात. अशा आजाराच्या खेड्यातल्या वयस्कर स्त्रिया लाजेने वेळीच दवाखान्यात येत नाहीत आणि मग आजार वाढतो, जखमा होतात तेव्हा येतात. तोपर्यंत मग शस्त्रक्रियेची गुंतागुंत वाढलेली असते. गडचिरोली जिल्ह्यात मी होते, तिथे तर एक अंधश्रद्धा होती की ज्या स्त्रियांचे लग्नाबाहेर परपुरुषासोबत संबंध असतात, त्यांना हा आजार होतो. त्यामुळे तर मग तिथे अशा आजाराच्या स्त्रिया कोणालाच काही सांगत नाहीत. सहन होण्याच्या पलीकडे त्रास गेल्यावर मगच दवाखान्यात येतात.
प्रोलाप्स होण्याच्या कारणांमध्ये सतत होणारी बाळंतपणे, दोन बाळंतपणामध्ये अगदी कमी कालावधी असणे, लहान वयातच बाळंतपणे होणे, चुकीच्या पद्धतीने कळ देणे, घरीच बाळंत होणे, रजोनिवृत्तीनंतर आधीच कमजोर झालेले लिगामेंट आणि स्नायू नैसर्गिकरित्या आणखी कमजोर होऊन गर्भपिशवी खाली सरकणे. या कारणांशिवाय कुपोषण, गर्भवतीने पौष्टिक आहार न घेणे, गर्भवतीला रक्तक्षय असणे ही कारणे पण आहेत. तसेच स्त्री बाळंत झाल्यानंतर तिने दीड महिना आराम केला पाहिजे, कष्टाची कामे बिलकुल करू नयेत. कारण बाळंतपणाच्या वेळेस स्त्रीच्या शरीरावर ओटीपोटाच्या स्नायूंवर ताण आलेला असतो, त्याला आराम मिळून त्यांची ताकद पुनः भरून यायला तेवढा वेळ द्यावा लागतो.
आपल्या भागातील तरुण स्त्रियांमध्ये 1st 2nd डिग्री प्रोलाप्स दिसून येतात. परंतु त्यापेक्षा जास्त मात्र चुकून एखादीला दिसतो.
इथे सतोलीमध्ये मात्र २४ वर्षाच्या स्त्रीला इतक्या टोकाचा आजार पाहून मी विचारात पडले. तिथल्या नर्सचे मात्र म्हणणे पडले की हे खूप कॉमन आहे या पहाडी भागात. खूप स्त्रियांना असा आजार दिसून येतो. मी मात्र खूप अस्वस्थ झाले होते त्या स्त्रीला पाहून. तिच्या गर्भपिशवीला १५ दिवस औषधाने ड्रेसिंग करून, जखमा बऱ्या करून, सूज कमी होऊ देऊन मग तिचे ऑपरेशन करता येणार होते.
इतक्या कमी वयात हिला कसा काय पूर्ण प्रोलाप्स झाला ? हिने कमी त्रास असतानाच का नाही तपासणी करून घेतली ? हिला एक वर्षापासून इतका जास्त त्रास आहे, तर ही त्रास सहन करत कशी काय काम करत असेल ? डॉ. सुशील सरांशी बोलून माझ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली. तेथील गरिबी, भौगोलिक परिस्थिती, स्त्रियांवरचा कष्टांचा बोजा आणि आरोग्य सुविधांचा अभाव या सर्व गोष्टींमध्ये तिच्या आजाराचे मूळ सामावले होते. गरिबीमुळे लहानपणिपासूनचे कुपोषण, गर्भवतीला न मिळणारा पौष्टिक आहार, कष्टांची कामे, त्यात महत्वाचे म्हणजे जड गवताचे भारे डोक्यावरून वाहून नेणे. भौगोलिक परिस्थिती यासाठी की तिथल्या महाकाय डोंगरांवरून सततची चढ उतरण चालूच, त्यात डोक्यावर मोठाले गवताचे भारे किंवा इतर जड सामान. यामुळे स्त्रीच्या ओटीपोटात जास्त ताण येतो व तिथल्या स्नायूंवर, लिगामेंटस वरचा ताण वाढतो, पर्यायाने गर्भपिशवीचा सपोर्ट हळूहळू कमजोर होत जातो. तसेच भौगोलिक परिस्थितीचा आणखी एक तोटा की स्त्रीला बाळंतपणाच्या कळा सुरु झाल्यावर तिला तिच्या डोंगरातील प्रदेशातून आरोग्यसुविधा असलेल्या शहराच्या ठिकाणी जायला वाहन मिळत नाही. बऱ्याच वेळा तिला कॉटची पालखी करून काही किलोमीटर चढ उतार पार करून, तेथून डांबरी रस्ता असलेल्या ठिकाणी नेले जाते. तेथून मग बरेच पैसे मोजून शहरापर्यंत पोहोचवले जाते. ही पूर्ण प्रक्रिया होईपर्यंत बऱ्याच स्त्रिया घरीच बाळंत होऊन जातात. तर काही लोकांकडे वाहनासाठी पैसा नसल्याने, शहराची भीती वाटत असल्या कारणाने ते घरीच बाळंतपणाचा पर्याय स्वीकारतात. तिथे काही ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रे व त्यापेक्षा लहान डीस्पेन्सरीज आहेत. परंतु तिथे एकही डॉक्टर व नर्स नसते. तिथे दाईच बाळंतपण करतात. एकदा मी तिथे दाई मिटिंग मधे सर्वांना प्रश्न विचारला की तुम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात का जात नाहीत ? तर एका दाईने सांगितले, “आम्ही नेतो तिथे स्त्रियांना, आम्हाला पण वाटते की औषधे मिळावीत, बाळंतपणे सुखरूप व्हावीत परंतु एकदा गेलो तर तिथे डॉक्टर, नर्स कोणीच नाहीत. वर पाणी पण नाही. शेवटी मीच इकडून तिकडून पाणी गोळा करून आणले आणि केले त्या बाईचे बाळंतपण.” यावर मी निरुत्तर झाले.
घरी होणाऱ्या बाळंतपणामध्ये स्त्रियांना रक्तस्त्राव होऊन त्यांचे मृत्यू होण्याचे प्रमाण बरेच आहे. तसेच कुपोषण आणखी वाढणे, रक्तक्षय होणे, जंतुसंसर्ग होणे, बाळ पोटातच किंवा जन्मल्यानंतर मरणे, बीपी वाढून फिट येणे, सतत गर्भपात होणे, अशी बरीच गुंतागुंत निर्माण होते.
बाळंत झाल्यावर या स्त्रिया बिलकुल आराम करत नाहीत. लगेच १-२ दिवसात त्यांची कष्टांची कामे सुरु होतात. हेसुद्धा तरुण वयामध्ये प्रोलाप्स होण्याचे महत्वाचे कारण आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर व नर्स नसल्याने त्यांना कुंटुंब नियोजनाबद्दल माहिती द्यायला कोणीही उपलब्ध नाही. त्यामुळे प्रत्येक स्त्रीला दरवर्षी मुल होते व प्रत्येकीला कमीत कमी ४ मुले तरी होतात. एक गर्भवती स्त्री तर १० व्या वेळेस गरोदर होती, कारण पहिल्या ९ ही मुली होत्या.
संध्याकाळी आम्ही हॉस्पिटलमधून सुकूनकडे, म्हणजेच आमच्या राहण्याच्या ठिकाणी परत जाताना माझे मन खूप उदास होते. काही केल्या त्या स्त्रीला मी विसरू शकत नव्हते. सुशील सरांशी चर्चा करत रस्ता संपत होता. आता मला समजत होते की यांना स्त्रीरोग तज्ञाची इतकी तातडीची गरज का आहे ते. पुढचा माझा महिना पूर्ण प्लान केला होता. पहिले ८ दिवस मोबाईल मेडिकल युनिट म्हणजेच फिरत्या दवाखान्यासोबत स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम करणे, नंतर १५ दिवस दाई प्रशिक्षण कार्यक्रम आखणे व राबवणे आणि शेवटचे ७ दिवस पिंडारी ट्रेक मध्ये डॉक्टर म्हणून जॉईन होणे.
डॉ. हिमांशु सोबत आरोहीच्या हॉस्पिटलमध्ये डॉ. तेजस्वी म्हणून डेंटिस्त काम करते. ती शेजारच्या एका शहरातून जॉबसाठी तिथे आलेली. तिच्याकडे पाहिले की पहाडी सौंदर्य काय याचा प्रत्यय मला आला. सफरचंदासारखे गुलाबी गाल आणि लाघवी बोलणे हे तिचे स्पेशल फीचर्स. तिच्या गोड स्वभावाने आमची पक्की मैत्री जमली. मला सर्व माहिती सांगणे, तिथे अडजस्ट होयला मदत करणे, तेथील स्टाफशी ओळख करून देणे असे सगळे ती प्रेमाने करायची.
माझ्यासोबत आणखी २ मुली रिंकी व भावना तिथे नर्स म्हणून जॉईन झाल्या होत्या. दोघी पण पहाडी मुली. परंतु माझ्यावर त्यांचे फार प्रेम. तसेच कामात भरपूर उत्साह. सतत मला हे शिकवा , ते शिकवा म्हणून मागे लागणार. यातील भावना माझ्यासोबत फिरत्या दवाखान्यासाठी येणार होती. तर मुन्नी दीदी म्हणून, बऱ्याच वर्षांपासून आरोही सोबत काम करणारी, पेशंटच्या रजिस्ट्रेशनची जबाबदारी सांभाळणारी व स्टाफची व्यवस्थापक म्हणून काम पाहणारी बोल्ड स्त्री होती. एक त्रास देणारी नर्स पण होती. फार्मसी सांभाळणारा तरुण प्रदीप, रक्त तपासणी करणारे जगदीशदा , एक्स रे करणारे प्रकाशदा असे सारे माझ्या चांगल्या ओळखीचे झाले होते. आमची छान टीम जुळली होती. पुढचे ८ दिवस फिरत्या दवाखान्यामध्ये आम्ही सारे एकत्र काम आणि फुल दंगामस्ती करणार होतो.

2/3/17

Body positivity

शाळेतील मुलींना आरोग्य मार्गदर्शन करताना, मी त्यांना body positivity शिकवते , स्वतःच्या शरीराला स्विकारायला आणि सुंदर मानायला शिकवते.
आणि तीच मी कपड्यांच्या दुकानात जाते , तेव्हा माझ्या मोठ्या size चे कपडे हवे तसे मिळत नाहीत, limited stock पाहून स्वतःच्या शरीराचा तिरस्कार करते ,
तेव्हा मी किती confident आणि किती insecure या विचाराने गोंधळून जाते.
माझा नाराज चेहरा पाहून , counter मागची बारीक मुलगी जेव्हा म्हणते की ताई, तब्येत तुझ्यासारखीच हवी. आमच्यासारखी बारीक काय कामाची , तेव्हा धड ती पण सुखी नाही आणि मी पण नाही , याचा मला साक्षात्कार होतो.

12/28/16

स्वप्नांची किंमत काय ?

Being a Doctor as private consultant in your new clinic, waiting for patients, with professional & personal stress, night fired for admitted patient, ill health, bored mood,  broken heart and 4G internet connection makes you a poet !!

स्वप्नांची किंमत काय ?
माझ्या...तुझ्या...आपल्या दोघांच्या...
पूर्ण झालेल्या....
अर्ध्यातून सुटलेल्या..
आणि अशीही काही स्वप्ने...
जी सत्याचा प्रकाश पडताच हवेत विरून गेली..
आणि काही..डोळे उघडताच संपून गेली..
ही सर्व स्वप्ने जातात का कुठे ?
यांची किंमत काय.?
आणि कशामध्ये होते यांचे मोल ?
थोडे हसरे क्षण, काही आनंदाचे हेलकावे.
काही भावनांचे कल्लोळ..
बरेच सारे अश्रू..आनंदाचे..
आणि दुःखाचे....
आणि वेदनेचेही...
अशीच असते किंमत या स्वप्नांची...
पूर्ण झालेल्या..आणि भंगलेल्या..
आपण गोळा करत राहतो
हाताला येईल ते तुकडे..
आणि शिवत राहतो पुन्हा पुन्हा
आपणच स्वतः उसवलेली
हृदयाची काळीज शिवण.
हेच असते भागधेय
स्वप्ने पाहणाऱ्या
तुझे आणि माझे..

11/28/16

उत्तराखंड भाग - २


उत्तराखंड - २

पहाडावरील त्या लाकडी घरात राहणे खूपच आनंददायी होते. लाकडाचे असल्याने त्याला वेगळेच देखणेपण लाभले होते. आजूबाजूला पूर्ण जंगल पसरलेले होते. त्या पूर्ण पहाडावर वेगवेगळ्या ठिकाणी घरे वसली होती. आरोहीचे ऑफिस व हॉस्पिटल पहाड उतरून गेल्यावर खाली पायथ्याजवळ होते.
आम्ही, म्हणजेच मी व हिमांशु सकाळी ९ ला निघायचो. कधीकधी माधुरी, जमाल हे आरोही सोबत काम करणारे volunteers भेटायचे. काधीकोणी foreigner visitor, medical student किंवा माझ्यासारखेच short time volunteer पण सोबत असायचे. बाहेर पडले की सुशील सरांचा डोरेमोन व आणखी एक कुत्रा आमच्या मागे मागे थोडे अंतर यायचे. त्यांची हद्द संपली की परत फिरायचे. रस्त्यात जाताना दूर दूर अंतरावर एखादे घर लागायचे. तिथे घराच्या आजूबाजूला विविध फळझाडे,फुलझाडे , भाज्या लावलेल्या असायच्या. मधेच कोणी शेतकरी गायी, बकऱ्या चरायला घेऊन जाताना भेटायचा. पहाडावर नैसर्गिकरीत्या खूप सुंदर, आकर्षक रंगाची फुले फुललेली दिसायची. ना कोणी लावलेली, ना कोणाची निगराणी असलेली ती जंगली फुले कुठल्याही बागेतल्या शोभिवंत फुलांपेक्षा सुंदर होती. विविध प्रकारचे मशरूम, शेवाळेही दिसायचे.
तिथे सर्वत्र दिसत होती ती पाईन जातीची झाडे. खरेतर त्या प्रदेशात पूर्वी मुबलक प्रमाणात देवदार व ओक वृक्ष होते. ते वृक्ष त्या त्या प्रदेशातील जमिनीमध्ये पाणी टिकवून ठेवणारे व हवेत ओलावा निर्माण करणारे आहेत. परंतु ब्रिटीश लोकांनी बऱ्याच प्रदेशातील ती झाडे पूर्णपणे तोडून टाकून पाईन लावले. पाईनचे फायदे हे की त्यापासून रंग, टर्पेनटाइन मिळते. परंतु त्यांचे तोटे असे की ते जमिनीतील पाणी जास्त वापरतात व हवामान उष्ण करतात. याचा परिणाम होऊन सतोली मधलेही पूर्वीचे नैसर्गिक थंड हवामान जाऊन तिथे उष्ण हवामान झाले आहे.
त्या रस्त्यावरून जाताना चढ उतार असायचा. मी पूर्ण थकून जायचे. मग मधे मधे ब्रेक घेत मी हॉस्पिटलमध्ये पोहोचायचे. संध्याकाळी ५- साडे ५ ला आम्ही परत निघायचो. कधी ६-साडे ६ वाजले तर अंधार पडायला सुरुवात होयची. मग घाई-घाईमध्ये आम्ही झपझप पाय उचलत चालायचो. कधी पाउस सुरु झाला की मग तर तारांबळ उडायची. पावसामुळे आणखी एक समस्या निर्माण व्हायची...जळवांची! पाउस पडला की जळवा बाहेर पडायच्या. त्या पायाला चिटकल्या व रक्त पिऊ लागल्या तरी बिलकुल दुखत नाही. त्यामुळे त्या पायाला लागलेल्या पण समजत नाही. मग त्या तशाच रक्त पीत राहतात व फुगून मोठय टम्म झाल्या की त्यांच्याच भाराने आपोआप गळून पडतात. अशीच एके दिवशी मी घरी परतले तेव्हा पाय धुवायला बाथरूममध्ये गेले. पायांकडे पाहिला तर काळे काळे ठिपके दिसले. मी पायांवर पाणी सोडले तरी ते जाईना. उलट ते लांब लांब होऊ लागले, वळवळू लागले. तेव्हा माझ्या लक्षात आले की ते दुसरे तिसरे काही नसून जळवा आहेत. मी आयुष्यात पहिल्यांदाच जळवा पाहत होते. मी घाबरून ओरडत बाहेर आले. पण नेमका हिमांशु जमालच्या घरी गेलेला. शेवटी पायाला लागलेल्या त्या ५-६ जळवा मी ओढून काढल्या. त्यानंतर २०-२५ मिनिटे तेथून रक्त येत राहते. त्याला मग कागद चिटकून टाकला. थोडा वेळाने हिमांशु परतला तेव्हा त्याने मला उपाय सांगितला की जळवा लागल्या की त्यांच्यावर मीठ टाकायचे म्हणजे त्या आपोआप गळून पडतात. ओढून काढल्या की मग महिनाभर त्या जागी खाज सुटत राहते. हाय !! त्याला म्हटलं , इतके दिवस सर्वांनी मला जळवांच्या स्टोऱ्या ऐकवल्या, पण एकाने पण इतका सोपा उपाय सांगितला नाही.
सकाळी ७ ला उठून मी बाल्कनी मधे यायचे. समोर पाहिले तर मस्त धुक्याने भरलेली दरी दिसायची. घर पूर्ण धुक्यात हरवलेले असायचे. जसा दिवस सुरु होईल तसे तसे ते धुके निवळत जायचे. असेच एके दिवशी आम्ही खाली म्हणजेच हॉस्पिटलकडे जात असताना पूर्ण धुके निवळले व दूरवर डोळ्यांच्या लेवलला हिमालयाची बर्फाच्छादित शिखरे स्पष्टपणे नजरेस दिसू लागली. आम्ही दोघेही आनंदाने , भरल्या मनाने ती पाहू लागलो. हिमांशूने सांगितले की बऱ्याच महिन्यानंतर आज धुके निवळून ती शिखरे दृष्टीस पडली होती. तो उत्साहाने मला त्यांची नावे सांगू लागला.. त्रिशुल, नंदादेवी, पंचचौली. मला तर किती फोटो काढू आणि किती नको असे झाले होते. पुढे मी एक महिना तिथे असेपर्यंत रोज त्या शिखरांचे दर्शन होतच राहिले.
संध्याकाळी परत येताना तो रस्ता वेगळाच वाटायचा. पाईन वृक्षांच्या त्या जंगलातून जाताना मला सतत लॉर्ड ऑफ रिंग्ज या मूवीमधल्या जंगलाचाच भास होयचा. घरी पोहोचेपर्यंत ७ वाजलेले असायचे व बऱ्याच वेळा घर धुक्यामध्ये हरवून गेलेले असायचे. आमची हद्द सुरु होताच डोरेमोन व त्याचा मित्र आमच्या स्वागताला हजर असायचे. रस्त्यात आजूबाजूला राहणारे कोणीनाकोणी भेटायचे. एक वंदना आणि तिच्या २ लहान मुलांचे घर लागायचे. गप्पा मारत आम्ही यायचो. घरी पोहोचले की मी मस्त चहा बनवून बाल्कनीमध्ये खुर्ची टाकून बसायचे. खालच्या मजल्यावर हिमांशुचा गिटारचा रियाज चालायचा. त्याचे सूर कानावर पडायचे. कधी तो अर्जित सिंगची किंवा हरिहरनची गाणी लावायचा. ती सुरेल गाणी ऐकून मन प्रसन्न होऊन जायचे. घरचा किंवा मित्र-मैत्रिणीचा फोन आला की मी घराचा एक कोपरा पकडायचे. फक्त तिथेच रेंज चांगली असायची आणि मी व्यवस्थित बोलू शकायचे. रात्री कधी ब्रेड ओम्लेट तर कधी दाल खिचडी तर कधी कोणी मशरूम पास्ता बनवायचो. तिथल्या ४-५ घरांची मिळून जशी काही एक चाळच बनली होती. कधीही कोणीही कुणाच्याही घरी जाऊन खायचो, प्यायचो. सगळेजण तिथे मजेत असायचे. कोणी घाईमध्ये , टेन्शनमधे दिसायचे नाही. हिमान्शुचे यावर म्हणणे असे की पहाडावरचे भाज्या, फळे यातच एक प्रकारची शांत उर्जा असते, असे अन्न खाल्ल्याने आणि पहाडाच्या मोकळ्या हवेत राहिल्याने आपोआपच इथे राहणारी माणसेही शांत होऊन जातात.
रात्री झोपताना एक नवीनच समस्या उभी राहिली. तिथे खूप सारे मोठ-मोठ्या आकाराचे कोळी असायचे. रात्र झाली की ते किडे शोधात भिंतीवर यायचे. सुमारे १०-१२ मोठाले कोळी भिंतीवर फिरताना बघून माझी झोपच उडून जायची. एक तर सर्वात मोठ्ठा आणि जाडा, चांगला पंजाएवढा होता. भीतीने मी लाईट पण चालूच ठेवायचे. मी सुशील सरांकडे तक्रार केली त्या स्पाईडर्सची. तर त्यांचे म्हणणे की “They are so innocent. They also get scared because of us. Make friends with them!!” आणि खरेच तसे झाले. काही दिवसांतच माझी भीती जाऊन उलट मला त्यांची सवय होऊन गेली. म्हटलं , उलट आता परत गेल्यावर मी मिस करेन त्यांना.
कधीकधी मला मध्यरात्री जाग यायची. पाहते तर लाईट गेलेली असायची. सगळीकडे मिट्ट काळोख पसरलेला. अशा रात्री आपण पहाडावर एका जंगलाच्या मध्यात एका लाकडी घरात एकट्याच आहोत, या विचारानेच मला भीती वाटायची. काचेच्या खिडक्यांवर मी पडदे ओढून घेतलेले असायचे. परंतु वरती छतावर एक मोठा काचेचा चौकोन होता दिवसा प्रकाश आणि ऊन येण्यासाठी. पण रात्रीच्या वेळी फार भीती वाटायची. किती प्रकारचे प्राणी आपल्या घराच्या अवतीभवती , या छतावर यावेळी फिरत असतील अशा विचारांनी माझी झोप उडायची. मग टोर्च लावून तिच्या उजेडात भीती घालवायचा प्रयत्न करत मी कधितरी झोपी जायचे.
पण अशाच एका अंधाऱ्या रात्री विचार आला की माणसाला आगीचा शोध लागण्याआधी माणूस या पृथ्वीवर, कसा जगत असेल, हिंस्त्र प्राण्यांपासून स्वतःचा बचाव कसा करत असेल. आगीचा शोध म्हणजे APES च्या Evolution मधील किती महत्त्वाची पायरी अथवा Turning point होता हे पहिल्यांदाच जाणवले.


11/25/16

उत्तराखंड भाग १

कालच तर मी दिल्लीला पोहोचले होते. पहिल्यांदाच दिल्ली पाहिली. उत्साहात कुतुबमिनाराच्या आजूबाजूला फिरले, फोटोग्राफी केली. आज सकाळी दिल्लीवरून ट्रेनने ४-५ तासांचा प्रवास करून मी काठगोदामला उतरले. तिथे दिनेश Taxi थांबवून माझी वाटच पाहत होते. तेथून पुढे तीन तास प्रवास करून आम्ही सतोलीला पोहोचणार होतो.
या पूर्ण प्रवासात मी मनोमन आश्चर्य करत होते की हे सर्व घडलेच कसे. खरेतर १५ दिवसांपूर्वी माझा कन्याकुमारीला जायचा बेत होता. कन्याकुमारीच्या विवेकानंद आश्रमात मी योगा क्लासचे बुकिंग पण केले होते. फक्त आता विमानाचे तिकीट बुक करणे बाकी होते आणि अचानक मी डेंगूने आजारी पडले. तापाने मी बरीच खंगून गेल्याने माझा कन्याकुमारीचा कार्यक्रम आपसूकच रद्द झाला.
मी जुना जॉब नुकताच सोडला होता. जुन्या कामाच्या ठिकाणी माझी बरीच ओढाताण झाली होती, मानसिक त्रास झाला होता. त्यामुळे दूर कुठेतरी जाऊन मनन चिंतन करावे, महिनाभर शांत जागी जाऊन राहावे असे विचार मनात येत होते. घरी बसल्याबसल्या माझे कुठे जावे यावर गुगलिंग चालूच होते. अशातच whats app वर एक मेसेज येऊन थडकला. “ Urgently need a female gynecologist, who loves mountains and likes trekking, need to take health check camps in villages of Uttrakhand for 1 month, good salary “. हा मेसेज वाचताच मी तेथे जायचे नक्की केले. परंतु मला विश्वासच बसत नव्हता की हा मेसेज खराखुरा आहे. जसे काही मी स्वप्न पाहत होते. मला हवी ती गोष्ट अशी आश्चर्यकारक रित्या सत्यात उतरली होती. हा मेसेज आरोही या उत्तराखंडमध्ये काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेतर्फे पाठवला गेला होता. त्यांच्यासोबत नेहमी काम करणारी स्त्रीरोगतज्ञ एका महिन्यासाठी येऊ शकत नसल्याने त्यांना तातडीने दुसऱ्या स्त्रीरोगतज्ञाची गरज होती.
मेसेजला रिप्लाय करताच आरोही या NGO चे प्रमुख डॉ. सुशील शर्मा यांच्याशी फोनवर माझे बोलणे झाले. त्यांचा आवाज मला खूप आश्वासक वाटला व आमच्या अर्ध्या तासाच्या बोलण्यातच माझ्या सर्व शंका दूर होऊन पुढील आठवड्यातच माझे उत्तराखंडला जाण्याचे नक्की झाले व प्रवासाचे सर्व बुकिंगही झाले. आरोही ही N.G.O उत्तराखंडमधील नैनिताल जिल्ह्यातील खेड्यांमध्ये शिक्षण, रोजगार व आरोग्य या घटकांवर काम करते. सतोली या पहाडी गावात संस्थेचे मुख्य कार्यालय व दवाखाना असून आजूबाजूच्या ५०-६० गावात आरोहीचे काम चालते.
तर अशाप्रकारे गेल्या १५ दिवसात कन्याकुमारी ऐवजी मी दिल्लीला पोहोचले होते. उत्तरेला प्रवासाची ही माझी पहिलीच वेळ. पहाडी प्रदेश, पहाडी लोग हे फक्त ऐकुनच माहित होते. त्यामुळे डॉ. सुशील यांनी मला, तुला पहाडी भागात काम करायचे आहे, असे सांगितले असले तरी पहाडी भाग कसा असतो याची मला काहीही कल्पना नव्हती. गुगल map वर मी सतोली व काठगोदाम शोधले होते. आम्ही नैनिताल जिल्ह्यात असल्याने काठगोदाम रेल्वे स्थानकावर पर्यटकांची भरपूर गर्दी होती. आमचा काठगोदाम ते सतोली प्रवास सुरु झाला. जाताना बऱ्याच ठिकाणी नैनितालचे बोर्ड दिसत होते, ते नाव वाचूनच मी उल्हसित होऊन गेले. मग हळूहळू खरेखुरे पहाड नजरेस पडायला सुरुवात झाली. एक पहाड संपला की लगेच पुढचा. रस्ता पूर्ण वळणा-वळणांचा. रस्त्यात आम्हाला भीमताल गाव लागले. तिथे थोडावेळ आम्ही थांबलो. तिथल्या अत्यंत सुंदर तलावाच्या दर्शनाने मी भारावून गेले. ताल म्हणजे तलाव. इथे खूप सारे सुंदर नयनरम्य तलाव आहेत आणि त्यांच्या वैशिष्ट्यानुसार त्यांना विविध नावे दिलेली आहेत. तिथेच बाजूला दिनेश पाणी भरून घेत होते. कुठून पाणी येत आहे हे पाहिले तर ते नैसर्गिक रित्या डोंगरावरून खाली वाहत आलेले झरे होते. त्याचे पाणी अतिशय थंड असते.
तिथून पुढे आम्ही निघालो. आता मात्र खूपच जास्त पहाड दिसू लागले. मी खुश होऊन फोटो काढायला सुरुवात केली. पण काहीच वेळात माझा उत्साह ओसरू लागला. वळणा-वळणांच्या त्या घाटदार रस्त्याने पार मला दमवून टाकले. एक तासाने तर माझी फोटोग्राफी पूर्ण बंद झाली. थकव्याने कधी एकदा मी सतोलीला पोहोचेन असे झाले.
तेवढ्यात डॉ. सुशील यांचा फोन आला. तुला ट्रेकिंग आवडते ना, असे विचारून त्यांनी मला कल्पना दिली की Taxi चा रस्ता संपल्यानंतर पुढे मला अर्धा ते एक तास चढाई करायची आहे. माझ्यासोबत बरेच सामान होते. ते न्यायला कोणीतरी येईल. मी खरेतर प्रवासाने बरीच थकून गेले होते. त्यात आणखी चढाई म्हणजे मी थोडी घाबरलेच. Taxi ने मला तेथील एका आश्रमाच्या गेटवर उतरवले. तेथून पुढे कच्चा रस्ता असल्याने चालत जावे लागणार होते. तिथे अर्धा तास आम्ही आरोहीच्या माणसाची वाट पाहत उभे होतो. त्या अर्धा तासात मनात कितीतरी विचार येऊन गेले. मुख्य विचार हाच होता की सर्व सामान परत Taxi मध्ये भरावे आणि परत माघारी जावे.
एकदाची आरोहीची २ माणसे आली आणि त्यांना मला सामानासकट सुकूनला पोहोचवले. सुकून म्हणजे डॉ. सुशील यांची पहाडावरची ४-५ घरे मिळून बनलेली प्रायवेट प्रॉपर्टी. तेथील एका दुमजली घराच्या वरच्या मजल्यावर माझी राहण्याची सोय करण्यात आलेली होती. खालच्या मजल्यावर डॉ. हिमांशू राहत होता. त्याच्याकडेच सुशील सरांनी मला सर्व माहिती देण्याची व मदत करण्याची जबाबदारी सोपवली होती.
माझ्या रूमला वेगळे किचन होते. त्यात मी नाश्ता व जेवण बनवू शकणार होते. ते पहाडावरचे जंगलाच्या मध्ये असलेले असे, लाकडाचे सुंदररीत्या बनवलेले घर होते. माझ्या रूमला मस्त गच्ची होती. तेथून समोरची दरी आणि ढग दिसत होते. सुकूनमधे त्या संध्याकाळी मी एक वेगळीच शांती अनुभवली, जी बरेच वर्षे मी हरवून बसले होते. त्या शांतीच्या अनुभवाने अक्षरशः मला रडू आले.
हिमांशुसोबत कॉफी पिताना त्याने सांगितले की धुके निवळल्यावर समोर हिमालयाची बर्फाच्छादित शिखरे दिसतात. त्या रात्री सुशील सरांनी त्यांच्या घरी मला व हिमांशुला जेवणासाठी बोलावले. जेवण सुरु करण्यापूर्वी मला सुशील सरांना पहिले अगदी मनापासून Thank you म्हणावेसे वाटले.
“ I am so much grateful to you for you invited me here.”


6/15/16

पुरूष नेहमी पुरूषच असतो..!

पुरूष  नेहमी पुरूषच असतो 

दारू पिणारा,

शिवीगाळ मारपिट करणारा

बिड्या फुंकणारा ,

नपुंसक असला तरीही..

पत्ते कुटत,

बायकोच्या पैशावर मजा मारणारा

गावभर उकिरडे फुंकणारा

पुरूषच असतो !! 

पुरूष  नेहमी पुरूषच असतो 

फार फार तर मर्द म्हणवतो 

स्त्री ?

ती कधी बाईमाणूसही म्हणवते 

नाहीच असे नाही

बर्याचदा 

जेवणात मीठ कमी पडले

तर ती हराम होते

पुरूषाने ठेवली की

रखेल होते

मूल न देऊ शकणारी

वांझोटी असते

कधी वेश्या असते

आणि नवर्याने टाकून दिली तर

गावजेवण होते

दुर्गा म्हणतात कधीकधी तिला

पण ती पुराणातच परवडते सार्यांना

जिवंत जाळली जाते सहजच

हलक्या चारित्र्याची म्हणून

किंवा भोगली जाते

तिच्या मर्जीविरूद्ध

बंद दाराआड

किंवा उघड्यावरच

ती छिनाल असते

पुरूषाला जाळ्यात फसवणारी

ती रांड असते

अशी तशी ती कोणकोण असते

फक्त माणूस तेवढी नसते

2/25/16

जातीचे रंग

खरेच जात आडनावात असते का ?

आपण भारतीय एवढे शिष्टाचार पाळणारे आहोत का ? कि नाव विचारून hello how are you, करून गप्प बसू ?

कामाच्या ठिकाणी एकटी मुलगी दिसली की लग्न झालं कि नाही असे थेट विचारणारे आपण. 

गाव कुठलं , या पाठोपाठ कोणत्या समाजाचे हा प्रश्न हमखास येतो.

मी डॉक्टर. निम्मे पेशंटतरी हमखास लग्न झालंय का आणि जात कोणती हे विचारतात.

गळ्यात मंगळसूत्र शोधणे व आडनावावरून जात ओळखण्याचे खेळ कोणीही करत नाही.

बोलायचा मुद्दा हा की जात काही आडनावात नसते. कपाळावरच्या टिळ्यात नसते. कि कपड्याच्या रंगात नसते.

जात दबा धरून बसलेली आहे आपल्याच मना-मनात.  सोयीनुसार आणि गरजेनुसार प्रकट होते वेळोवेळी.

जात आहेच आपल्या रोजच्या व्यवहारात.  

इतरांशी वागण्या बोलण्यात. छोट्या आणि मोठ्या गोष्टींत येतेच जात.

पण ती येते दोन्ही बाजूंनी.

जो अन्याय करतोय असं दिसतं त्याच्याही बाजूने आणि ज्यावर अन्याय होतोय असं वाटतं त्याच्याही बाजूने सुप्तपणे येतेच जात.

आजकाल आपल्या विचारांना, आवडी निवडींना, आवडत्या लेखकांना, संमेलनांना, विरोधकांना.......सगळ्याना चिकटून बसते आहे चिवट जात..

उठल्या उठल्या पहिले डोळ्यावर   आणि मेंदूवर जातीचा चष्मा घातला कि झालं . मग सोप्पं जातं चूक काय बरोबर काय, आपलं कोण परकं कोण ठरवायला.

 अशातच कोणी समर्थनाचा झेंडा घेऊन आणि कोणी विरोधाचा झेंडा घेऊन उभं राहतं लढायला. त्यांची नजर नेहमी विरूद्ध दिशेकडेच असल्याने स्वतःच्या झेंड्याचा जातीत रंगलेला गडद रंग दिसतच नाही. फक्त so called शत्रूवर मारा करणं इतकंच limited focus.

त्रयस्थाला दिसतात दोन्ही रंग. पण त्याच्यावरही विचार जबरदस्ती केली जाते एक बाजू निवडण्याची, मोठ्या आवाजातल्या घोषणा, इतिहासाचे दाखले, अन्यायाचे पुरावे, supporters ची  झुंड.. सगळं सगळं !

तटस्थतेने पाहणार्याला दिसतो एक देश..शतकांपासून जाती नुसार विभागून भांडणारा.

तर दुसरीकडे देशासमोरचे असांख्य प्रश्न ज्यांना जातीचा किंचितही वास नाही. , कदाचित त्यामुळेच त्यात कुणाला रस नसावा.

 दुष्काळ, बेकारी, पर्यावरणाचा ह्रास, प्रदूषण, चंगळवाद,  भू क, गरीबी, शहरातील वाढती लोकसंख्या,  लैंगिक शोषण,  इत्यादीना नाहीये कौणतीच जात.

ठरवलाच द्यायचा रंग त्यांनाही तर देता येऊ शकेल  आणि  मग छान रंगातील भांडणे.

समस्यांवरचे  उपाय ? तो शोधू नंतर निवांत. वेळ मिळाला तर.

इथे पहिले जातींचा खेळ आणि  राजकारण तर रंगू दे.