Welcome...

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..

11/23/15

शरीर व मन

     आपले शरीर आणि मन या एकदम जादुई गोष्टी आहेत या जमीनीवरच्या.
     हे शरीर आणि मन या चैतन्याने सळसळणार्या जिवंत गोष्टी आहेत. परंतु यांत्रिकतेने आयुष्य जगताना आपण हे वेळोवेळी विसरू पाहतो.
     वयाच्या २८ व्या वर्षी मी मनाने भयंकर निराश आणि शरीराने भरपूर जाडी झाले होते. अशा अवस्थेत मला जशी काही मी ५0 वर्षाची म्हातारी झाली आहे असे वाटू लागले होते. सर्व आशा संपलेली. आयुष्यावरची श्रद्धा संपून गेलेली. सौंदर्य शिल्लक नाही. काही करायची इच्छा उरली नाही. शेवटी ८३ किलो असे भयंकर वजन आणि निराशेच्या खोल गर्तेत अडकलेले मन यांत गुदमरून गेलेले मन यांना अचानक एका क्षणी जाग आली, कि अरे काहीतरी चुकतेय. असे जगून चालणार नाही. हे बदलायला हवे. It's now or never..!
            जर मी यावर काही उपाय शोधला नाही तर कदाचित आत्ता झालेली ही जाणीव अशीच पुसली जाईल. या असल्या सडलेल्या आयुष्याची सवयच होऊन जाईल आणि मग परत बदलावेच वाटणार नाही कदाचित कधी .
      मग खूप विचार केला कि ही अवस्था का आली ? काही वर्षांपूर्वी तर मी अशी मुळीच नव्हते.
       शरीराच्या या अवस्थेचे कारण तर obvious होते. मनाच्या नैराश्येमुळे शरीराची मंदावलेली हालचाल, काहीही व्यायाम नाही, मनात येईल तेव्हा हवे तितके काहीही विचार न करता अनियंत्रितपणे खाणे, याने वजन वाढून शरीर बेढब नाही होणार तर काय होणार ? उत्तर सापडले, मग उपाय पण ठरवला कि रोज व्यायाम, प्राणायाम व आहारनियंत्रण, योग्य खाणे.
  खरेतर शरीर व मन एकमेकांशी connected असतात. एक बिघडले कि त्याचा परिणाम दुसर्यावर होतो. तसेच उलट पण होते कि आपण एकाची काळजी घेतली कि दुसर्यावर पण परिणाम होतो. उदाहरण द्यायचे झाले तर, मन दुःखी असले कि शरीर मंदावते. काहींना भूक लागत नाही तर काहीजण दुःख झाले कि खूप जास्त खाऊ लागतात, junk food, sweets, chocolates अति खाऊन वजन वाढते. तसेच उलट पण होते. रोज न चुकता व्यायाम केल्याने, सकाळी उठून walk किंवा jogging केल्याने मनाचे नैराश्य दूर होऊन मन आतून आनंदी होते.
         शरीराचे उत्तर सापडले होते.
          मन इतके रसातळाला का गेले होते ? घटस्फोट झाला होता हे महत्वाचे कारण होतेच. पण तेवढे पुरेसे नव्हते. आणखी पण बरेच काही होते. त्यात पुन्हा divorce मुळे आलेलं नैराश्य.
        यातून बाहेर कसे पडायचे ?
  अशाच एका रविवारी 'सप्तरंग' वाचत होते. त्यातील नेहमीच मी सर्वप्रथम संदीप वासेलकरांचा लेख वाचते. त्या दिवशीच्या लेखाचा आशय होता कि आजच्या तरूणांनी फक्त भौतिक सुखसोईंमध्ये अडकून न पडता सामाजिक सुधारणांसाठीही झटले पाहिजे. त्यांचा प्रश्न होता आजची तरूणाई हरवली आहे भौतिक सुखाच्या मागे धावत. सामाजिक जबाबदारीचे भान कमी होते आहे आजच्या तरूंणामध्ये.
     मला ते कुठेतरी click झालं. अंधारात उजेडाची तिरिप पडावी तसं झालं. आयुष्यात पुढे काय करायचे ते अचानक उमजून आले. लक्षात आले की मी भौतिक यशाच्या मागे आंधळेपणाने इतकी धावत सुटले होते कि त्यात माझी जीवनमूल्येच मी हरवून गेले होते. दिशेविना रस्ता जसा भरकटतो तसेच Principles आणि श्रद्धा यांच्या शिवाय माझं आयुष्यच भरकटलं होतं. यावर उपाय काय ?
      तेव्हा आठवले, अकरावीत असताना वाचलेले डॉ. अभय बंग यांचे पुस्तक "माझा साक्षात्कारी ह्दय रोग". तेव्हापासून डोक्यात होते कि कधीतरी या Great व्यक्तीकडे जायचे. आता तो क्षण आला होता. निर्णय घेतला आणि गडचिरोलीजवळ असणार्या डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांच्या शोधग्राम येथील SEARCH च्या दवाखान्यात मी Medical Officer म्हणून रूजू झाले.
      तिथे रोज संध्याकाळी प्रार्थना असते. त्यानंतर नायना (डॉ. अभय बंग) हे सर्वांना मार्गदर्शन करतात. ते ऐकणे, दिवसभर campus मध्ये त्यांचे होणारे दर्शन, morning walk ला त्यांच्यासोबत गेल्यावर होणार्या गप्पा या सर्वातून मी घडत गेले. Principles आणि faith पुन्हा सापडले. तिथे माझ्यावर निरपेक्ष प्रेम करणारी, माझ्यातील विश्वास पुन्हा जागवणारी, जीव लावणारी, हक्काने रागवणारी, काळजी करणारी, अशी माणसे भेटली. भरभरून प्रेम केले सार्यांनी माझ्यावर. तेथे जसा पुन्हा नव्याने जन्म झाला माझा.
     तसेच तिथे मी नियमित व्यायाम सुरू केला. तिथे campus च्या आजूबाजूला जंगल पसरलेले आहे. खूप सुंदर वृक्ष , झाडे वेली व त्यावर असंख्य सुंदर पक्षी, मधेच तलाव असा सुंदर निसर्ग. Duty तून वेळ मिळेल तसे सकाळी चालायला जायचे व एखाद्या प्रचंड व सुंदर मोहाच्या वृक्षाखाली ध्यान करायचे असा नित्यक्रम बनून गेला. मग मी सायकल विकत घेतली गडचिरोलीवरुन. संध्याकाळी आजूबाजूच्या खेड्यात माझी सायकल रपेट होऊ लागली. त्याने शरीरावरची चरबी जशी वितळत गेली. आहार तर सुधारला होताच. तिथे junk food तर नव्हतेच. या सर्वामुळे वजन कमी झाले. पुन्हा मी पंचवीशीची दिसू लागले. त्यामुळे आत्मविश्वास वाढला व मन प्रसन्न राहू लागले.
       तेथे गेल्यावर नायनांना मी पहिला प्रश्न विचारला होता, नायना, माझी आयुष्यावरची श्रद्धा संपली आहे. काय करू ?
     "स्वतःच्या दुःखापेक्षा मोठं ध्येय समोर ठेव. स्वच्या पलीकडे जाणारं ध्येय ठेव."