Welcome...

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..

3/16/24

सांगली

 विहिरीची मुलगी या कादंबरीतील मीरेच्या प्रवासाची सुरुवात सांगलीपासून होते. याचं कारण सांगलीनं माझ्या मनात कायमसाठी हक्काचं स्थान मिळवलं आहे. MBBS नंतर माझे DGO हे PG झाल्यानंतर, मी 3 महिने सांगलीत होते. 2014 साली बहुतेक. सांगलीतील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. हेमंत लिमये सर यांना गडचिरोलीतील शस्त्रक्रिया शिबिरात कमी वेळात, कौशल्यपूर्ण सर्जरी करताना मी पाहिलं होतं. तेव्हाच ठरवलेलं की सरांकडे जाऊन गर्भपिशवी काढण्याची शस्त्रक्रिया म्हणजेच Hysterectomy, सरांच्या टेक्निकने शिकून घ्यायची. त्यासाठी मग तीन महिने मी सांगलीत मुक्काम ठोकलेला. सांगलीला शिकलेल्या शस्त्रक्रिया, पुढे जाऊन सास्तूर या ठिकाणी नियमित केल्याने मीही त्यात expert झाले. कारण त्या भूकंपग्रस्त भागात गरीब रुग्णांना अगदी माफक दरात NGO ने चालवलेल्या स्पर्श या जिल्हा रुग्णालयात चांगल्या सुविधा मिळायच्या. त्यामुळे गरजू रुग्णांची गर्दी असायची. पुढे छत्तीसगडला माझ्या रुग्णांचे जीव वाचायला ते कौशल्य खूप जास्त उपयोगी आले, तेव्हा मला लिमये सरांच्या प्रती कृतज्ञता वाटलेली. छत्तीसगड सोडताना, तिथल्या इतर स्त्रीरोगतज्ञ डॉक्टरांना ते कौशल्य शिकवून मला समाधान वाटले. सांगलीत आणि जयसिंगपूर, शिराळा अशा आजूबाजूच्या गावांत जाऊन शस्त्रक्रिया चालायच्या, त्यामुळे फिरणं व्हायचं. कुठं काय चांगलं खायला मिळतं हे सर आणि सोबतच्या सहकाऱ्यांमुळे डेमोसकट माहिती व्हायचं. काम संपल्यावर संध्याकाळी मी पूर्ण रिकामी असायचे. मग सायकल काढून भटकायला जायचे. कधी सांगलीतील नदीचा घाट तर अनेकवेळा हरिपूरला एकटीने जाऊन बसायचे. सुंदर प्रसन्न जागा पाहून वाटायचं की कोणी बॉयफ्रेंड असता तर त्याला इकडे तिकडे फिरवलं असतं. 2017 मध्ये कादंबरी लेखन सुरु झालं तेव्हा मीराचा पहिला मुक्काम कुठे पडावा या प्रश्नासरशी सांगली आठवलं आणि ते लिहिलं गेलं. सोबतच आला नायक मल्हार. मला आयुष्यात कधीही न भेटलेला. पण हे पात्र लिहिताना मीच त्याच्या प्रेमात पडत गेले. असा मल्हार खऱ्या वास्तवात नाहीये हे स्विकारायला जडच गेलं. काही पात्रं लेखकाचे बोलणे आज्ञाधारकपणे पाळतात, काही लेखकाला पारच धुडकावून लावतात. तर काही लेखकालाच मोहात पाडतात. Anywes तर मागच्या आठवड्यात कोल्हापूरला असताना, वाट वाकडी करून, मीरा मल्हारचे आवडते ठिकाण हरीपूर इथे जायचा मोह टाळता आला नाहीये. ती जागा आता खूप बदलली आहे, पण तिथल्या माझ्या आठवणी अजून तशाच जपलेल्या आहेत. इथे दोन नद्यांचा संगम, त्यांच्या वेगळ्या उठून दिसणाऱ्या प्रवाहांसोबत पहायला मिळतो. Between कादंबरी वाचून एका मित्राचा आज फोन आला. त्याच्या वाईट काळात साथ दिलेल्या प्रेयसीबद्दल बोलताना तो म्हणाला की "ती माझ्या आयुष्यात मल्हारसारखी आली." प्रेमाची भाषा अशी स्थळ काळ लिंग ओलांडून पोहोचते. कादंबरी घेण्यासाठी संपर्क New Era PublishingHouse 9373553349

3/1/24

नवीन कादंबरी

माझी नवीन येणारी कादंबरी कशाबद्दल आहे ? 
तर एका बावीस तेवीस वर्षाच्या, मीरा नावाच्या बंडखोर मुलीची ही कहाणी. या वयात एक विश्वास असतो की मी म्हणेल ते बरोबर, माझ्या आयुष्याचा निर्णय मीच घेणार. तारुण्याच्या उत्साहात आपण आयुष्य घडवायला पाहतो. सगळं व्यवस्थित चाललं आहे म्हणतानाच अचानक सगळे गड किल्ले कोसळतात आणि सोबत आपणही भुइसपाट होऊन जातो. हे कोसळणे प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी घडतेच. पण या पडझडीनंतर पुन्हा स्वतःला उभं करताना, कोणती मूल्यव्यवस्था कामी येते, कोण आपल्याला आधार देतं आणि जगाला सामोरं जात असतानाच स्वतःला ही पुन्हा एकवार कसं समर्थ बनवायचं, अशा प्रकारची ही एका तरुणीची कथा आहे. तरुणीची यासाठी, कारण आपल्या समाजात पुरुष आणि स्त्री हा भेदभाव आजही पाहायला मिळतो. पुरुषांना जे अनेक प्रकारचे स्वातंत्र्य सहज मिळते, स्त्रीची मात्र प्रत्येक ठिकाणी अडवणूक केली जाते. कधी इतर लोक तिला बंधने घालतात तर कधी ती स्वतः च हरवलेल्या आत्मविश्वासामुळे स्वतः ला गमावून बसते. तर भेदभाव करणारी ही समाजव्यवस्था समजून घेत, तिच्यासमोर एक मुलगी कशी स्वतःचे विश्व घडवू शकते, या आत्मशोधाची ही कादंबरी आहे.  अनेक वर्षे पुरुष त्यांच्या नजरेतून आपल्याला स्त्रियांची कहाणी सांगत राहिले. पण या पुस्तकात मात्र स्वतः स्त्रीच्या नजरेतून नायिकेची कहाणी सांगितली आहे. तिच्या मनासकट आणि शरीरासकटसुद्धा. ज्या गोष्टी बोलायच्या नाहीत हे सांगितले जाते, त्याच गोष्टी बोलून, बदल घडवून आणायची आशा आहे.

या कादंबरीमध्ये मी या ब्लॉग वरचे अनेक तुकडे वापरले आहेत. कादंबरीमधील नायिका मीरा ही ब्लॉग लिहीत असते. फक्त ब्लॉगचे नाव मातीची मुलगी ऐवजी, विहिरीची मुलगी असे आहे. 

कादंबरीचे नाव - विहिरीची मुलगी.
प्रकाशक - New Era Publication, Pune
पृष्ठे 275
येत्या आठवडाभरात कादंबरी उपलब्ध होईल.