Welcome...

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो ... माझ्या ब्लॉगवर आपले स्वागत आहे..

4/11/24

रत्नागिरी

मीराच्या प्रवासातील पहिला मुक्काम सांगली होता. ती सांगली सोडते आणि प्रवास पुढे सुरू होतो, तेव्हा पुढे तिला काही बऱ्यावाईट गोष्टींना तोंड द्यावं लागणार होतं. बरेच धक्के पचवावे लागणार होते. हे लेखक म्हणून मला माहिती असल्यानं, पुढे कोणतं गाव निवडावं या विचारासरशी डोक्यात कोकण आलं.
कोकण का...तर अर्थात समुद्र.....
मीरेचा कादंबरीतील प्रवास हा फक्त बाह्य नाही, तर अर्थात आंतरिकसुद्धा आहे. आंतरिक प्रवासात प्रत्येकच व्यक्तीला, मग कोणतेही जेंडर असो, एका टप्प्यावर अस्वस्थतेचा, एकटेपणाचा शाप हा भोगावाच लागतो. ही घालमेल, तडफड अनुभवत असताना, मी स्वतः नेहमी निसर्गाचा आधार घेते. 
2015 मध्ये खूप अस्वस्थतेतून जात असताना, कोकणात पहिल्यांदाच मी एकटीने ट्रीप मारली होती. स्वारगेटला गेले. समोर चिपळूणची बस दिसली, बसले. मग खेड, दापोली, हर्णे, आंजर्ले इथे कधी बसने तर कधी चालत एकटीनेच फिरलेले. हर्णेच्या lighthouse खाली दुपारी झोपले होते. आंजर्ल्याच्या रिकाम्या समुद्र किनाऱ्यावर स्वतःला समुद्राच्या स्वाधीन केलेलं. वाटलेलं, समुद्र मनाच्या सगळ्या जखमा धुवून टाकतो. समुद्राच्या लाटा आपल्याला अंतरबाह्य निर्मळ करून टाकतात. समुद्र माणसाच्या अपुरेपणावर पांघरून घालत, मायेने पोटाशी धरतो.
समुद्राची हीच साथ मला मीरेला अनुभवायला द्यायची होती.
मग 2018 मध्ये कादंबरी लिहायची ठरवले तेव्हा नोकरीतून बिनपगारी रजा घेऊन दहा एक दिवस रत्नागिरीला मुक्काम ठोकला. दिवसाच्या वेगवेगळ्या क्षणी वेगवेगळ्या रुपातला समुद्र अनुभवला. समुद्रकिनारीच रिसॉर्टमध्ये राहून जे जे मनात येईल ते लिहित राहिले...तिथेच मीराची नवीन रूपं सापडली. तिची मल्हारबद्दलची आसक्ती. प्रेम. वाट पाहणं. एकटेपणातील भ्रम. सगळं.
कादंबरीत आलेलं रत्नागिरीजवळचं गाव सापडलं. तिथे जाण्याचा आतला आणि बाहेरचा रस्ता सापडला. 
समुद्र भरभरून देतो. आपली जितकी कुवत असेल तितकं घ्यावं. त्याच्यासारखीच काही माणसं पण असतात. प्रेम, माया, मैत्र, सोबत, सगळं सगळं देणारी या जगात खूप माणसे आहेत...आपल्याला आपलं मन शांत करत, ते समजून घेत, स्वीकारता आलं पाहिजे. 
जोपर्यंत ते जमत नाही, तोपर्यंत स्वतः च निर्माण केलेल्या मनाच्या वावटळीमध्ये आपणच भिरभिरत राहतो. मग मनाची भुणभुण थांबवून, मन बथ्थड व्हावे यासाठी एकतर दारू पीत राहायची, चंगळवादी जगत निब्बर व्हायचं, नाहीतर सतत जगावरच कचकच करत राहायची. 
म्हणून वाटतं, आयुष्यात प्रत्येकाने थोडा ठहराव आणावा. Pause घ्यावा. बसावं निसर्गासोबत, स्वतःला समजून घेत. या कादंबरीच्या आत आणि बाहेरही तो ठहराव मला समुद्र आणि हिमालय देत राहतात. 
Between विहिरीची मुलगी मधील सगळी पात्रे काल्पनिक आहेत. फक्त एकच पात्र अगदी खरंखुरं आहे. ते पात्र मला रत्नागिरीच्या रिसोर्टमध्ये भेटलेलं. ते म्हणजे जर्मन शेफर्ड प्रजातीची कुत्री डॉली. माझ्या तिथल्या मुक्कामात ती माझ्या मागे मागेच असायची. ती जशी खरी होती,  मी अगदी तशीच कादंबरीत,तिच्या चाळ्यांसकट लिहीली आहे. लॅपटॉपमध्ये जुने फोटो चाळताना तिचे फोटो सापडले. सोबत डकवते आहे.

No comments:

Post a Comment